स्वामींचे चावणे आणि जेटलींची सभ्यता
By Admin | Updated: June 29, 2016 05:35 IST2016-06-29T05:35:14+5:302016-06-29T05:35:14+5:30
मंत्र्यांनी विदेशात असताना आधुनिक पण भारतीय बनावटीच्या पोशाखात वावरावे, असा आदेश पक्षाने त्यांना द्यावा’ अशी सूचनाच स्वामींनी जेटलींचा तो ‘वेटरी’ पोशाख पाहून भाजपच्या नेतृत्वाला केली आहे.

स्वामींचे चावणे आणि जेटलींची सभ्यता
आपल्या उंची पोशाखाबद्दल अतिशय जागरुक असलेले आणि विदेशात असताना कायमच टाय-सुटात वावरणारे अर्थमंत्री अरुण जेटली हे सुब्रह्मण्यम स्वामी या भाजपाच्या पुढाऱ्याला वेटरसारखे दिसत असतील तर तो दोष जेटलींचा म्हणायचा की स्वामींचा? ‘आपल्या मंत्र्यांनी विदेशात असताना आधुनिक पण भारतीय बनावटीच्या पोशाखात वावरावे, असा आदेश पक्षाने त्यांना द्यावा’ अशी सूचनाच स्वामींनी जेटलींचा तो ‘वेटरी’ पोशाख पाहून भाजपच्या नेतृत्वाला केली आहे. स्वामी हे राजकारणातले एक उटपटांग व फारसे जबाबदार नसलेले पुढारी असले तरी त्यांनी आजवर नेहमीच भारतीय पोशाख वापरला आहे. हॉर्वर्ड रिटर्न्ड असलेले स्वामी नेहमीच पायजमा-धोतर आणि बंगाली कुर्ता यातच देशाला दिसले आहेत. त्यात अलीकडे त्यांनी ‘श्रीराम जयराम’ लिहिलेली शालही अंगावर पांघरायला सुरुवात केली आहे. दीर्घकाळ सत्तेबाहेर व पक्षाबाहेर रहावे लागलेल्या स्वामींना संघाने राज्यसभेत नुकतेच पाठविल्यामुळेही ते संघभक्ती आणि अयोध्येविषयीचे जास्तीचे कांदे खाऊ लागले असल्याचा तो दाखला आहे. संघाने त्यांना सोनिया गांधींवर तोफ डागण्यासाठी आणले असले तरी त्यांचा निशाणा आरंभापासून अरुण जेटली आणि त्यांचे अर्थ मंत्रालयातील सहकारी यांच्यावरच अधिक राहिला आहे. प्रथम रघुराम राजन नंतर अरविंद सुब्रह्मण्यन असे एकेक करून झाल्यानंतर ते आता सरळ जेटलींच्या विदेशी पोशाखामागे लागले आहेत. जेटली हे नरेंद्र मोदींच्या अतिशय जवळचे व विश्वासातले मंत्री मानले जातात. पण मोदी स्वामींना आवरत नाहीत आणि संघही त्यांना शिस्त लावत नाही. त्यामुळे मोदींनाच जेटली नकोसे झाले आहेत की काय अशी शंका राजकीय वर्तुळात घेतली जाऊ लागली आहे. वास्तव हे की जेटलींची आतापर्यंतची दोन्ही अंदाजपत्रके कमालीची निराशाजनक, सपक आणि देशाला जैसे थे ठेवणारी निघाली. जीएसटीसारख्या आर्थिक विधेयकांबाबतही त्यांना संसदेत फारसे काही करता आल्याचे दिसले नाही. भाजपा स्वत:ला शिस्तबद्ध म्हणवणारा पक्ष असल्याने जेटलींच्या तशा कामगिरीवर त्यातल्या कोणी बोल लावला नाही. त्यातून मोदी हे देशांतर्गत राजकारण, धर्मकारण, समाजकारण आणि पक्षकारण या साऱ्यांविषयीच मौन बाळगणारे असल्यामुळे जेटलींचे बेचव अर्थकारण त्यांना चालणारेच असावे असाही त्यातल्या अनेकांचा समज होता. स्वामींनी त्या साऱ्यांचे डोळे उघडले असावे किंवा आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची संधी चालून आली असल्याचे त्यांना दिल्लीत राहून जाणवले असावे. स्वामींचा डोळा देशाच्या अर्थ मंत्रीपदावर आहे हे आता साऱ्यांनाच कळून चुकले आहे. जोवर जेटली त्या पदावर आहेत तोवर स्वामींना आपला तो डोळा तसाच उघडा ठेवावा लागणार आहे. त्यातून त्यांच्या मनात खदखदणारी वेदना जुनी आणि खोलवरचीही आहे. एकेकाळी त्यांनी वाजपेयींवर अतिशय असभ्य टीका केली आहे. त्यांच्या माऱ्यातून अडवाणीही सुटले नाहीत. पक्षातील जुन्या पिढीतल्या ज्येष्ठांना बोल लावण्याचा आपला अधिकार असा अंगात मुरला असणाऱ्या स्वामींची पक्षाने आजवर एवढी वर्षे उपेक्षा केली याची त्यांना असलेली व्यथा मोठी आहे. आताचे पंतप्रधान मोदी त्यांच्यासकट कोणाचेही म्हणणे ऐकून न घेणारे नेते आहेत. अशावेळी त्यांच्या अपयशी निकटस्थांवर आपल्या टीकेचे शस्त्र उगारणे एवढाच मार्ग स्वामींजवळ उरणारा आहे. मोदी मौनी असणार आणि संघ आपण राजकारणात नसल्याची (अजूनही) बतावणी करीत राहणार या स्थितीत एवढी वर्षे सत्तेच्या वळचणीशी काढलेल्या त्या बिचाऱ्याने तरी काय करायचे असते? त्यातून जेटलींचे वागणे व बोलणे सभ्यपणाचे आहे. स्वामींनी त्यांचे कपडे फाडले तरी ते त्यांच्यावर डोळे काढायचे नाहीत याची स्वामींना जाणीव आहे. इतरांचे मौन, जेटलींचे सौजन्य आणि पक्षात या साऱ्याविषयी नसलेली जाण वा असलेली उपेक्षा हा सारा स्वामींसारख्या उतावीळाला बळ देणारा भाग आहे आणि स्वामी नेमके तेच करीत आहेत. स्वामींच्या माऱ्यामुळे जेटलींएवढीच सरकारची व पक्षाची प्रतिमा डागाळते असे आताशा काही माध्यमे म्हणू लागली आहेत. त्यांना आवर घालण्याचा विचार पक्षाएवढाच संघातही सुरू आहे असेही या माध्यमांकडून सांगितले जात आहे. पण स्वामी हा उलटणारा माणूस आहे. शिवाय तो कसा उलटेल याचा अंदाज बांधणे कोणालाही न जमणारे आहे. मोरारजीभाईंचे जनता सरकार सत्तेवर असल्याच्या काळापासूनच आपल्या विक्षिप्ततेत सातत्य राखत आलेला हा माणूस गृहीत धरता येणाराही नाही. त्यामुळे पक्ष आणि संघ या दोहोंनाही त्याचे उंडारणे दुरून पाहणे व गप्प राहणे एवढेच आजवर जमले आहे. अशा माणसांना सोडले तर ते दबा धरतात आणि अचानकपणे हल्ला चढवितात आणि धरून ठेवले तर चावून बेजार करतात. भाजपा व संघाने स्वामींना राज्यसभेत धरून ठेवण्याची खेळी केली असली तरी ते एकट्या काँग्रेसला चावून चावून असे कितीसे चावणार? मात्र स्वामींना चावायला सोडणारे मुत्सद्दी त्यांच्या पाठीशी घट्ट असतील तर जेटलींसारख्या सभ्य माणसाची मुकी होरपळ फार काळ चालणारी नसते. ती त्याना घालवणारीही ठरू शकते.