भक्कम पाया आवश्यक
By Admin | Updated: April 24, 2017 23:25 IST2017-04-24T23:25:00+5:302017-04-24T23:25:00+5:30
२००८ साली सुरू झालेल्या आयपीएलने क्रिकेटचे सर्व सूत्रेच बदलली. एकेकाळी कसोटी सामन्यांची चलती असलेल्या या खेळात एकदिवसीय क्रिकेटने जम बसवला.

भक्कम पाया आवश्यक
२००८ साली सुरू झालेल्या आयपीएलने क्रिकेटचे सर्व सूत्रेच बदलली. एकेकाळी कसोटी सामन्यांची चलती असलेल्या या खेळात एकदिवसीय क्रिकेटने जम बसवला. यानंतर टी-२०च्या वेगाने संपूर्ण क्रिकेट खेळच बदलला. टी-२० क्रिकेटच्या आक्रमक रूपामुळे आज कसोटी सामन्यांची रंगत कमी होत असल्याची बोंब आहे. काही प्रमाणात ते खरंही आहे. क्रिकेटची रंगत वाढवण्याच्या हेतूने पाच दिवसांचा कसोटी सामना व एकदिवसीय सामन्याला मागे टाकून तीन तासांमध्ये संपणारा टी-२० क्रिकेटचा थरार पुढे आला. पण, त्याचवेळी हे खरं क्रिकेट आहे का, असा प्रश्नही पडतो. जो खेळ तंत्रशुद्ध फलंदाजीचा, लयबद्ध गोलंदाजीचा म्हणून ओळखला जातो, त्या खेळाची ओळख आज आक्रमकता, विध्वंसक फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी अशी झाली आहे. टी-२०चे स्वरूप पाहता हे आवश्यक आहे हे जरी मान्य केले तरी हे खरेखुरे क्रिकेट नक्कीच नाही. यामुळे युवा खेळाडू आक्रमकतेला प्राधान्य देताना क्रिकेटचा मूळ पाया विसरत आहेत. क्रिकेटसाठी ही अत्यंत गंभीर बाब आहे. अगदी, १० ते १४ वर्षांखालील खेळाडूही एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल यांसारख्या टी-२० स्पेशालिस्ट फलंदाजांसारखे आक्रमक फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. क्रिकेटचा पाया भक्कम असणे आवश्यक का आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे चेतेश्वर पुजारा. सध्या भारताचे सर्वच खेळाडू टी-२० खेळत असताना पुजारा मात्र या प्रारूपमध्ये बसत नसल्याने त्याचा विचार आयपीएलसाठी होत नाही. मात्र, कसोटी सामन्यात इतर फलंदाज अपयशी ठरत असताना हाच पुजारा भारताचा तारणहार ठरतो. नुकताच झालेल्या आॅस्टे्रलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये हेच सिद्ध झाले. कसोटी क्रिकेटमध्ये लागणारा संयम टी-२०च्या भडीमारामुळे सध्याच्या खेळाडूंमध्ये कमी दिसतो. शेवटी क्रिकेट हा तंत्र व संयम यावर अधिक अवलंबून असल्याने खेळाडूंनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.