विशेष लेख: राहुल यांच्या यात्रेआधीच 'इंडिया'त धुसफुस? एकजुटीऐवजी फाटाफुटीचीच चिन्हे

By विजय दर्डा | Published: January 8, 2024 07:10 AM2024-01-08T07:10:23+5:302024-01-08T07:11:28+5:30

राहुल गांधींची यात्रा मिझोरमहून मुंबईला निघण्याच्या तयारीत असताना इंडिया आघाडीमध्ये मात्र एकजुटीऐवजी फाटाफुटीचीच चिन्हे दिसतात!

Special Article on India Opposition alliance disputes even before Rahul Gandhi Bharat Jodo 2.0 | विशेष लेख: राहुल यांच्या यात्रेआधीच 'इंडिया'त धुसफुस? एकजुटीऐवजी फाटाफुटीचीच चिन्हे

विशेष लेख: राहुल यांच्या यात्रेआधीच 'इंडिया'त धुसफुस? एकजुटीऐवजी फाटाफुटीचीच चिन्हे

-डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधी पक्षांच्या गोटात एकाच वेळी अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातील दोन जास्त महत्त्वाच्या. पहिली म्हणजे राहुल गांधी यांनी  १४ जानेवारी ते २० मार्च यादरम्यान मिझोरम ते मुंबई अशी जवळपास ६,७०० किलोमीटरची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ योजिली आहे. दुसरे म्हणजे महाआघाडीत एकजुटीच्या दिशेने वेगाने पावले टाकली जाण्याऐवजी उलटेच घडते आहे. अशा स्थितीत नरेंद्र मोदी यांच्या बलवान भाजपविरूद्ध उभे राहता येईल, अशी ताकद राहुल गांधी यांची यात्रा गोळा करू शकेल काय? - याचे उत्तर येणारा काळ देईलच, परंतु मतदारांच्या मनामध्ये तर या घडामोडींचे विश्लेषण सुरू झाले आहे.

कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत काढलेल्या पहिल्या यात्रेच्यावेळी राहुल गांधी यांनी एक नवी ऊर्जा निर्माण केली, हे तर खरेच! त्यांच्या या यात्रेनंतर काँग्रेसने हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीत यश मिळवले. पण, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने सत्ता गमावलीही! आता दुसऱ्या यात्रेच्या प्रारंभी त्यांच्यासमोर लक्ष्य असेल, ते लोकसभा निवडणुकीचे! राहुल गांधी यांची ही यात्रा १५ राज्यांतून प्रवास करील. या राज्यात लोकसभेच्या ३५७ जागा येतात. २०१९च्या निवडणुकीत त्यापैकी २३९ जागांवर भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला होता. या ३५७ जागांपैकी केवळ १४ जागांवर काँग्रेसला यश मिळाले होते. भारत जोडो यात्रेमधील मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. मेघालय, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात केवळ एकेक जागा काँग्रेसच्या वाट्याला आली होती. आसाममध्ये तीन, पश्चिम बंगालमध्ये दोन, तर छत्तीसगडमध्ये केवळ दोनच जागा मिळवता आल्या होत्या.

काँग्रेस आता पहिल्याइतकी शक्तिशाली राहिलेली नाही, हे राहुल गांधी यांना ठाऊक आहे. पक्षाकडे पूर्वीइतकी साधनसामुग्री किंवा कार्यकर्तेही नाहीत. एकदा चर्चेच्या ओघात ते मला म्हणाले होते, ‘मला सत्तेची  अभिलाषा नाही. आमची ताकद किती आहे ते मी जाणतो. पण, आम्ही आजपासून काम सुरू केले तर कुठल्या तरी टप्प्यापर्यंत पोहोचू शकू. मी आज तूप खाईन आणि उद्या मोठा होईन असा जर विचार मी केला तर ते शक्य नाही!’

- राहुल गांधी यांना कुठलीही घाई नाही. ते आधार तयार करताहेत. भाजपसुद्धा केवळ दोन जागांवरून २/३ संख्याबळापर्यंत पोचलेला पक्ष आहे. राहुल भले एखाद्या योद्ध्यासारखे मैदानात उभे असतील, पण त्यांचे विरोधक न चुकता  म्हणतात, ‘राहुल गांधी जेवढे आव्हान देतील तेवढा नरेंद्र मोदी यांचा भाजप मजबूत होत जाईल.’

लोकसभा निवडणुकीचे रुपांतर ‘भाजप विरूद्ध इंडिया आघाडी’च्या ऐवजी ‘मोदी विरूद्ध राहुल गांधी’ असे व्हावे, हेच भाजपला हवे आहे. कारण इंडिया आघाडी एकजूट करून निवडणुकीच्या मैदानात उतरली तर भाजपसाठी पुढचा रस्ता सोपा नाही. परंतु, आघाडीची अडचण अशी की, तिला जोडणारा एखादा हुकमी ‘फेविकॉल का जोड’ या क्षणाला तरी उपलब्ध नाही. आघाडीत आत्ताच इतकी फुटतूट दिसते; की तुकडे जोडण्याच्या ऐवजी जखमाच जास्त दिसू लागल्या आहेत. जो तो आपापले तुणतुणे वाजवताना दिसतो.  जागावाटपाबद्दल कोणताही समझौता झालेला नसताना संयुक्त जनता दलाने पश्चिम अरुणाचलमधून रूही तागुंग यांना उमेदवारी देणार असल्याचे जाहीर करून टाकले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलाने अरुणाचलात १५ उमेदवार उभे केले होते आणि सात जागांवर त्यांना विजय मिळाला होता.  सगळे आमदार नंतर भाजपत गेले.

संयुक्त जनता दलाने बिहारमध्ये सीतामढीतून देवेश चंद्र ठाकुर आणि दरभंगातून संजय झा यांना उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. इंडिया आघाडीवर दबाव टाकण्यासाठी नितीश कुमार हे उद्योग करत आहेत, असे म्हणतात. ते उघडपणाने  काही बोलत नसले, तरी इंडिया आघाडीचे संयोजकपद आणि पुढे संधी आल्यास पंतप्रधानांची खुर्ची त्यांना हवी आहे.

ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केल्यावर अरविंद केजरीवाल यांनीही त्याला अनुमोदन देऊन टाकले. लालू यादवही नितीश कुमार पुढे सरकलेले पाहू इच्छित नाहीत. या दोघांमधून विस्तव जात नाही. नव्या वर्षात दोघांनी एकमेकांना शुभेच्छाही दिलेल्या नाहीत.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल यांच्यात रण पेटल्यासारखी स्थिती आहे. ईडी आणि सीबीआयपासून बचाव करण्यासाठी तृणमूल नरेंद्र मोदी यांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहे, असे वक्तव्य अधीर रंजन चौधरी यांनी करूनही टाकले. तृणमूल आघाडीच्या बाबतीत गंभीर नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. लगोलग ‘आम्ही स्वतंत्र निवडणूक लढू शकतो,’ असा इशारा तृणमूलनेही देऊन टाकला. तिकडे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षानेही आपल्या उमेदवारांना हिरवा झेंडा दाखवणे सुरू केले आहे. सगळीकडेच संभ्रमाची परिस्थिती दिसते आहे.

इंडिया आघाडीला बळकट करण्याचे प्रयत्न चालू असताना ही आघाडी उलट कमजोरच होत चालली आहे. राम मंदिर आणि हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा लाभ भाजपच्या पदरात पडणार आहे.  विरोधी पक्षांना भाजपशी मुकाबला करायचा असेल तर राहुल गांधी यांच्या यात्रेइतकीच इंडिया आघाडीची एकजूटही महत्त्वाची ठरेल.

- एकूणच सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता मोदी यांच्या भाजपकडून सत्ता हिसकावून घेणे हे दिवास्वप्नाच्या पलीकडे आणखी काही असेल, असे वाटत नाही.

vijaydarda@lokmat.com
(डाॅ. विजय दर्डा)

Web Title: Special Article on India Opposition alliance disputes even before Rahul Gandhi Bharat Jodo 2.0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.