शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!

By विजय दर्डा | Updated: October 21, 2024 07:52 IST

कॅनडाबरोबरचे भारताचे संबंध कधी नव्हे इतके ताणले गेले आहेत, जयशंकर यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर नवी आशा जन्माला आली आहे!

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

पाकिस्तानी राज्यकर्ते असे गृहीत धरून चालले होते की एससीओ म्हणजेच शांघाई को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत भारत आपल्या प्रतिनिधीला पाठवेल. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर स्वतःच बैठकीत सहभागी होण्यासाठी पोहोचतील अशी अपेक्षा कोणाचीच नव्हती. म्हणून तर पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खान म्हणाल्या, ‘स्मार्ट मूव्ह’.

भारतीय परराष्ट्रमंत्र्यांच्या स्वागतात पाकिस्तानने अजिबात कसर ठेवली नाही. गेल्यावर्षी गोव्यात झालेल्या एससीओच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बिलावल भुट्टो आले होते. त्या बैठकीत बरीच तणतण झाली. परंतु जयशंकर यांची गोष्टच वेगळी आहे. ते अनुभवी कूटनीतिज्ञ आणि प्रभावी परराष्ट्रमंत्री आहेत. त्यांनी पाकिस्तानवर थेट प्रहार न करता इस्लामाबादमध्ये आपले म्हणणे अत्यंत प्रभावीपणे मांडले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा सूरही नरमाईचा होता. भारत दुखावेल अशी कोणतीही गोष्ट त्यांनी केली नाही. नेहमीचा ‘काश्मीर राग’ही आळवला नाही. एकंदरीत वातावरण अत्यंत सद्भावनापूर्ण होते. सामान्यत: कोणत्याही देशाचे पंतप्रधान दुसऱ्या देशाच्या समकक्ष पदावरील व्यक्तीलाच भेटतात; परंतु शाहबाज यांनी पुढे येऊन जयशंकर यांचे स्वागत केले. भारतात परतल्यावर जयशंकर यांनीही या  आदरातिथ्याबद्दल शाहबाज यांचे समाजमाध्यमांवर आभार मानले.  बैठकीव्यतिरिक्त सामान्य  शिष्टाचाराची जी छायाचित्रे मी पाहिली त्यावरूनही एकंदर वातावरण चांगले होते असे दिसते. मेजवानीप्रसंगी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याबरोबर बसले होते. दोघांमध्ये आनंदाने बोलणे चालले होते. यावेळी शाहबाज यांनीही जयशंकर यांच्याशी बोलणे केले.

अलीकडेच संयुक्त राष्ट्र महासभेच्या न्यूयॉर्कमध्ये झालेल्या बैठकीत जयशंकर आणि शाहबाज एकमेकांवर खूपच घसरले होते. या पार्श्वभूमीवर नव्या बदलाकडे एक चांगला संकेत म्हणून पाहता येईल काय? शत्रुत्व भले कितीही दीर्घकाळ चालू दे, ते कधी कायमचे नसते. दोन शेजाऱ्यांनी एकत्र येण्यात दोघांचाही फायदाच असतो. दीर्घकाळ आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानलाही आपल्या परिस्थितीचा अंदाज आहे. भारत आणि पाकिस्तानातील सामान्य जनता तर उभयपक्षी संबंध सुधारण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. खरी आडकाठी आहे ती भारतविरोधावरच अस्तित्व अवलंबून असलेल्या आयएसआयची आणि तिथल्या सैन्यदलांची! भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या इम्रान खान यांची परिस्थिती हा त्या आडकाठीचाच पुरावा आहे.

दोन्ही देशांच्या संबंधांची निरगाठ इतकी सहज सुटेल असे नाही, ते म्हणूनच!  दोन्ही देशांना या दिशेने आणखी बरेच प्रयत्न करावे लागतील. आता कॅनडा आणि भारताच्या नात्याला नव्याने बसलेली गाठ अधिकच घट्ट होताना दिसते. कॅनडा आपला शेजारी देश नाही; पण माझ्या मते तो शेजाऱ्यापेक्षा कमी नाही. कारण भारतीय वंशाचे १८ लाख  लोक त्या देशाचे नागरिक आहेत. १० लाख भारतीय तेथे राहतात आणि सव्वादोन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी तेथे शिकतात. अशा देशाबरोबरचे संबंध ताणले जाणे हे दोन्ही देशांसाठी गंभीर ठरू शकते.परंतु दुर्भाग्य असे, की राजकीय स्वार्थापायी मजबूर झालेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे समजून घ्यायला तयार नाहीत. भारताबद्दलच्या त्यांच्या विषारी भावनांविषयी या सदरात मी पूर्वीही लिहिले होते. खलिस्तानी दहशतवादी निज्जर याला  कुणीतरी मारून टाकले तेव्हा ट्रुडो यांनी भारत सरकारवर आरोप ठोकला. हे ट्रुडो आपल्या वडिलांच्याच मार्गाने चाललेले दिसतात. १९८५ मध्ये कनिष्क विमान घातपाताने उडवून ३२९ लोकांचे बळीही घेणारा खलिस्तानी दहशतवादी तलविंदर सिंह परमार कॅनडात लपलेला होता. भारताने तलविंदर सिंह याला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. परंतु, पेरी ट्रुडो यांनी स्पष्ट नकार दिला. तेव्हापासून कॅनडा हा खलिस्तानचे स्वप्न पाहणाऱ्या दहशतवाद्यांचा गड झालेला आहे.

खलिस्तानी दहशतवादी तेथे राहून खुलेआम आपले उद्योग करतात. भारताविरुद्ध षड्यंत्र रचण्यात सहभागी असतात. भारताविरुद्ध षड्यंत्र रचणारा एखादा दहशतवादी मारला गेला असेल; परंतु भारताची भूमिका कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचविण्याची नसते. ट्रुडो यांचा आरोप पूर्णपणे निराधार आहे. भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याकडे बोट दाखवून त्यांनी कूटनीती नियमांचे उल्लंघनही केले आहे. आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावणे भारताला भाग पडले. जशास तसा व्यवहार करून आपणही त्यांच्या सहा अधिकाऱ्यांना हाकलून दिले. ही काही सामान्य घटना नाही.

खरा प्रश्न असा आहे,  की पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुका समोर ठेवून कॅनडा असे वागत  आहे, की त्याचा बोलविता धनी वेगळा आहे? - हा प्रश्न अशासाठी की कॅनडाचे लोकच ट्रुडो यांच्या भूमिकेवर टीका करत आहेत. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याबद्दल अमेरिका भारताकडे बोट का दाखवते, हा भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न तर नव्हे?

तूर्त तरी कॅनडाशी संबंध बिघडल्याचा परिणाम व्यापार आणि व्यवसायावर किती होईल हे इतक्यात सांगता येणार नाही. एवढे निश्चित की दोन देशांमधले संबंध जितके खराब होतील, भारतीय आई-वडील आपल्या मुलांना कॅनडात शिकायला पाठवताना तेवढेच अधिक साशंक असतील. दोन्ही देशांच्या नात्याला  निरगाठ बसली, तर त्याची जास्त किंमत कॅनडालाच चुकवावी लागेल.

- डाॅ. विजय दर्डा यांचे समग्र लेखन (vijaydarda@lokmat.com)

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारतPakistanपाकिस्तानS. Jaishankarएस. जयशंकर