शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

पुस्तके चोरून नेणाऱ्यांचे बेत उधळण्यासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 07:57 IST

वाचकांनी पुस्तकांवर डल्ला मारू नये म्हणून पुण्याच्या नगरवाचन मंदिराने पुस्तकांना चक्क डिजिटल कुलूप घातले, हे बाकी भारी झाले!

- श्रीमंत माने

‘वाचाल तर वाचाल’, ‘ग्रंथ हाच गुरू’, ‘पुस्तकासारखा मित्र नाही’, असे सुविचार, सुभाषिते अंमलात आणायचा प्रयत्न अनेकजण करतात. त्यासाठी पुस्तकांशी दोस्ती करतात. अनेकांना पुस्तके विकत घेऊन वाचायची सवय नसते. त्यावर ग्रंथालय नावाचा उपाय हाताशी असतोच. त्याशिवाय, ज्यांना महिन्यात विशिष्ट रक्कम पुस्तकांच्या खरेदीवर खर्च करायची दुर्मीळ सवय असते, त्यांच्याशी वाचनप्रेमापोटी अनेकजण दोस्ती वाढवतात. बरेचजण वाचायला नेलेले पुस्तक परत देण्याचे नाव काढत नाहीत. ग्रंथालयांनाही अशा परत न मिळालेल्या पुस्तकांचा प्रश्न भेडसावतो. ग्रंथपालनाचे प्रशिक्षण घेतलेल्यांनाही पुस्तक परत न करणाऱ्या वाचनप्रेमींवर तोडगा सापडत नाही. बहुतेकवेळा ती पुस्तके बुडीत खाती नोंद करावी लागतात. 

- पुस्तकचोरी हा असा अनेक अंगांनी आपल्या वाचनविश्वाचा विषय आहे; पण पुण्याच्या नगरवाचन मंदिराने यावर नामी उपाय शोधला. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी स्थापन केलेले अन् शतकोत्तर अमृतमहोत्सवाकडे वाटचाल करणारे हे वाचनालय ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन’ तंत्र वापरून आता नोंद न करता गुपचूप पुस्तक वाचनालयाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला तर तो पकडण्याची व्यवस्था करीत आहे. हे तंत्रज्ञान तसे नवे नाही. अनेकांनी शाळा-महाविद्यालयांत भौतिकशास्त्राच्या प्रयोगात ते वापरलेले असते. मागे  नोटाबंदी झाल्यानंतर बाजारात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेला नॅनो चीप असल्याची टूम सोडून देण्यात आली होती. जमिनीखाली गाडून ठेवल्या तरी त्या नोटांच्या पुडक्याचा पत्ता सरकारला लागणारच, असा दावा करणारी न्यूज चॅनलची निवेदिका अजूनही त्यासाठी ट्रोल होत राहते. तेव्हा, नॅनो नसेल; पण या आरएफआयडीच्या निमित्ताने पुस्तकात इलेक्ट्रॉनिक चीप आली, हे महत्त्वाचे. तंत्रज्ञानाने वाचन कमी झाले, असे म्हणणाऱ्यांसाठी महत्त्वाचे हे, की तंत्रज्ञानाचा पुस्तकांना फायदाही होतो. 

क्षेत्र कोणतेही असो, तंत्रज्ञानाचा वापर आपण थांबवू शकत नाही. ते वापरायचे कसे, हे ठरविण्याचा अधिकार आपल्याला आहे. पुण्यासारखा इलेक्ट्रॉनिक चीपचा वापर आता इतरत्र नक्की होईल. वर्तमानपत्रात क्यूआर कोड, तसे पुस्तकाला. गेला बाजार प्रश्नपत्रिकांनाही बारकोड आले. ग्रंथव्यवहारांत आयएसबीएन प्रणाली सर्वत्र वापरली जाते. वाचन चळवळ बळकट करण्यासाठी अनेक संस्था तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढाकार घेताहेत. 

गेल्या वर्ष-दोन वर्षांत नवी मुंबईत ‘लेट्स रीड इंडिया’ नावाची चळवळ खेड्यापाड्यात पुस्तके पोहोचवते. पुस्तकांच्या परिचयासाठी सोशल मीडिया वापरला जातो. पुस्तके भेट दिली जातात. केरळमधल्या एलिक्कुलमची पांबोली नवभारत लायब्ररी हव्या त्यावेळी पुस्तक उपलब्ध करून देते, तर तिरूवनंतपूरममध्ये ‘अक्षरानिधी’ नावाची खुल्या ग्रंथालयाची चळवळ अगदी सकाळी गरम चहाचे घुरके घेत असतानाही आपल्या दारात पुस्तके घेऊन उभी असते. तरीही पुस्तकचोरी होतेच. आपला ग्रंथरुपी गुरू, दोस्त, मार्गदर्शक हळूच बगलेत मारून घेऊन जाणारे सर्वत्र असतातच असतात. ही चोरी अशी की अनेकांची इच्छा असेल की तिला प्रोत्साहन द्यायला हवे; पण ज्याचे पुस्तक चोरीला जाते त्यालाच त्या चोरीच्या वेदना ठाऊक. असे एकटेदुकटे पुस्तकच चोरीला जाते असे नाही, काही दरोडेही असतात. पाच वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी आयोजकांनी ग्रंथ विक्री दालनाची सुरक्षा काढून घेतली अन् साहित्य अकादमीच्या पुस्तकांची नऊ पार्सल चोरीला गेली. तिकडे इंग्लंडमध्ये तर अक्षरश: दरोडा पडला होता. जानेवारी २०१७ मध्ये पश्चिम लंडनच्या फेलथॅम भागात एका गुदामातून २४० दुर्मीळ पुस्तके चोरीला गेली. त्यांची किंमत होती तब्बल २२ कोटी. गॅलिलिओ, न्यूटन हे शास्त्रज्ञ किंवा स्पॅनिश चित्रकार फ्रान्सिस्को दे गोया यांसारख्या दिग्गजांची पुस्तके अमेरिकेत बौद्धिक वारसा म्हणून लिलावासाठी नेली जाणार होती. त्यावर दरोडा पडला व साडेतीन वर्षांनंतर तो साठा रोमानियात जमिनीखाली पुरलेला सापडला. अशी दुर्मीळ पुस्तके मुंबई, पुण्यातल्या फुटपाथवर पूर्वी मिळायची. अनेकांसाठी तो उघडा खजिना होता. त्यातूनच अनेकांच्या घरात पुस्तकांचा खजिना उभा राहिला. तो सांभाळायचा कसा, ही काळजी तुम्हाआम्हाला असते, ती पुस्तक चोरी करणाऱ्यांच्या वाचनप्रेमामुळे! 

टॅग्स :theftचोरी