पाप आणि पुण्य
By Admin | Updated: July 2, 2014 08:46 IST2014-07-02T08:46:23+5:302014-07-02T08:46:23+5:30
पाप-पुण्याचे परिणाम या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भोगून पूर्ण करावे लागतात आणि जर पूर्ण झाले नाहीत, तर पुढच्या जन्मातही ते भोगावे लागतात.

पाप आणि पुण्य
अध्यात्म
ब्रह्मलीन क्षीरसागरमहाराज
पाप-पुण्याचे परिणाम या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भोगून पूर्ण करावे लागतात आणि जर पूर्ण झाले नाहीत, तर पुढच्या जन्मातही ते भोगावे लागतात. पापाची व पुण्याची आपापसांत वजावट होऊन उरलेले पाप किंवा पुण्य भोगावे लागते, अशी एक चुकीची समजूत सामान्यांमध्ये असलेली दिसून येते. पाप-पुण्याची बेरीज वजाबाकी कधीच होत नाही.
संशय व दारिद्र्य हे ज्या ठिकाणी वास करीत असतील, त्याला पाप समजावे आणि संतुष्ट होणे व सदा सुखी राहणे याला पुण्य समजावे. अशाच पद्धतीने सर्वांनी आचरण करावे. पापाचे क्षालन झाल्यावरच मानवाच्या जीवनात पुण्याची वाढ होते व जीवनात शांती-समाधान निर्माण होते. असे समाधान जेव्हा जीवनात प्राप्त होते, तेव्हाच आयुष्यवर्धन होते.
प्रत्येक मनुष्यात दोन प्रवृत्ती वास करीत असतात. एक सात्त्विक वृत्ती व दुसरी राक्षसी वृत्ती. पाप कर्मामुळे व्यक्तीचे विचार व वृत्ती पाप कर्माकडेच वळतात. सुधारण्याची शक्यता फारच कमी राहते. मनुष्याला जन्मातच पाप-पुण्याची कल्पना येते. मानवाचा जन्म मिळाल्यावर नीती-नियमांनुसार वागावे व योग्य धर्माचरण करावे. देवाच्या दृष्टीने सर्व लोक समान आहेत. देवाचा न्याय कधीच चुकत नाही. जो पुण्य कर्म करील, त्याला चांगल्या कुळात जन्म मिळेल. पाप कर्मे केलेल्यांनाही जन्म मिळतो, पण तो फक्त दु:ख भोगण्यासाठीच असतो आणि हेच नेमके सामान्य लोकांना समजत नाही. देवाच्या दृष्टिकोनातून जरी सर्व सारखेच असले, तरी जन्म मिळताना पाप-पुण्याचा, पात्रतेचा विचार झालेला असतो. कोणत्याही
कुळात का असेना, मनुष्यजन्म मिळाल्याबद्दल देवाचे आपण आभारच मानावयास हवेत. काही लोकांची कल्पना असते, की त्यांचा जन्म हा केवळ मागील जन्मांची पापे फेडण्याकरिता झालेला आहे, म्हणून ते उद्धाराचा कोणताही प्रयत्न न करता, चाकोरीबद्ध जीवन जगत असतात. मानवाकडून चुका होतात, काही वेळा नकळत मोठे अपराधही घडतात. काहींच्या मनात पश्चात्तापाची भावना असते; परंतु योग्य परिमार्जन होत नाही म्हणून एक प्रकारची बोच असते. अशा वेळेस धर्मग्रंथांचे वाचन केल्याने फायदा होतो. कोणत्याही धर्माचे धर्मग्रंथ याच तत्त्वांवर आधारित असतात. धर्मग्रंथांचा अंतिम उद्देश, लोकांना नीतिनियमाप्रमाणे वागण्यास शिकविणे, जर चुका झाल्या असतील, तर पापक्षालनाचा मार्ग दाखविणे हाच असतो. आपल्याकडून जराशीही चूक झाली, तर श्रीगुरूंचे अथवा देवाचे नामस्मरण करा. सतत नामस्मरणाची सवय लागल्यावर हातून पापकर्मे घडत नाहीत.