शनैश्चरशरण देवेन्द्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2016 03:53 IST2016-01-29T03:53:16+5:302016-01-29T03:53:16+5:30
शनि शिंगणापुरातील शनीच्या प्रतिकात्मक शीळेच्या चौथऱ्यावर महिलांना असलेली बंदी उठवावी म्हणून भूमाता ब्रिगेड नावाच्या संस्थेच्या महिलांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले खरे, पण मुख्यमंत्र्यांनी

शनैश्चरशरण देवेन्द्र
शनि शिंगणापुरातील शनीच्या प्रतिकात्मक शीळेच्या चौथऱ्यावर महिलांना असलेली बंदी उठवावी म्हणून भूमाता ब्रिगेड नावाच्या संस्थेच्या महिलांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले खरे, पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट पंतप्रधानांकडे जाण्याचा आणि त्यांच्याच करवी एखादा कायदा करुन देशातील सर्वच देवालयांमधील महिलांवर असलेली बंदी उठवून घेण्याचा सल्ला दिल्याने मुख्यमंत्रीदेखील शनैश्चरशरण असावेत असा निष्कर्ष काढण्यास जागा झाली आहे. राज्याचा कारभारी म्हणून त्यांनी सपत्नीक चौथऱ्यावर जावे असे आवाहन भूमातांनी केले होते पण तेही मुख्यमंत्र्यांनी काही मनावर घेतले नाही. आता तेथील देवस्थानच्या विश्वस्तांनी एक वेगळाच तोडगा मांडला आहे. महिलांना तर परवानगी देणारच नाही पण नगद अकरा हजार एकशे रुपये देणाऱ्या पुरुषांना चौथऱ्यावर जाण्यासाठी दिली जाणारी परवानगीदेखील रद्द करण्याचा विचार करु असे या विश्वस्तांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आंदोलन करणाऱ्या महिला आणि त्यांचे पाठीराखे तद्दन नास्तिक असल्याने त्यांच्याशी चर्चा काय करायची असा प्रतिप्रश्न उपस्थित करुन चर्चेचा प्रस्तावदेखील त्यांनी नाकारला आहे. एकूणच आता या प्रकरणातही राजकारणाचा प्रवेश झाला असल्याचे हे निदर्शक आहे. या राजकारणाचाच आणखी एक पैलू म्हणजे आखाडा परिषदेने यात घेतलेली उडी. महिलांना देशातील कोणत्याही देवालयात बंदी असता कामा नये कारण स्त्री आणि पुरुष यात भेद करता येत नाही असे या परिषदेच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. अलीकडेच पार पडलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभ मेळ्यात काही महिला साध्वींनी त्यांच्या स्वतंत्र आखाड्यास अनुमती, आखाड्यास स्वतंत्र जागा आणि शाही स्नानाचा हक्क मिळावा म्हणून आग्रह धरला असता तो याच आखाडा परिषदेने नाकारला होता. इतकेच नव्हे तर साध्वींच्या आखाड्याच्या प्रमुख महिलेने आखाडा परिषदेच्या अध्यक्षांवर गंभीर आरोपदेखील केला होता हे लक्षणीय!