लज्जा

By Admin | Updated: June 24, 2015 00:39 IST2015-06-24T00:39:00+5:302015-06-24T00:39:00+5:30

लज्जा हा मनुष्याचा एक सहज स्वभाव आहे. मनुष्याच्या ठिकाणी असलेली लज्जा ही एक अशी गोष्ट आहे की, ती चांगल्या गोष्टीबद्दल असू शकते व ती वाईट गोष्टीबद्दलही असू शकते.

Shame | लज्जा

लज्जा

अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले

लज्जा हा मनुष्याचा एक सहज स्वभाव आहे. मनुष्याच्या ठिकाणी असलेली लज्जा ही एक अशी गोष्ट आहे की, ती चांगल्या गोष्टीबद्दल असू शकते व ती वाईट गोष्टीबद्दलही असू शकते. मनुष्य जीवनामध्ये लाज असणे हे एक नैतिकतेचे अंग मानले जाते. म्हणून समाजामध्ये वावरत असताना जर एखादा मनुष्य अनैतिकतेने वागू लागला तर मोठी माणसे म्हणतात की अरे ‘‘जनाची नाही तरी मनाची लाज असावी’’ या म्हणीवरूनच असे लक्षात येते की लज्जा ही एक मनात निर्माण होणारी ऊर्मी आहे. तिचा योग्य तो वापर समाजजीवनामध्ये असला पाहिजे.
समाजामध्ये अशी परिस्थिती दिसून येते की, माणसे जिथे लाजायला पाहिजे तिथे लाजत नाहीत व जिथे लज्जा सोडायला पाहिजे तिथे लाजत राहतात. समाजामध्ये काही माणसे लाज सोडून वागत असलेली दिसून येतात. ती माणसे सामाजिक परिस्थितीचे कोणतेही भान आपल्या मनात न ठेवता त्यांचे वागणे सुरू असलेले दिसून येते. याउलट काही माणसे मंदिरात जायला लाजतात. असा उलटचा प्रवास चालू असलेला दिसून येतो आहे. म्हणून लज्जा या सद्गुणाचा वापर कोठे करायचा व कोठे करायचा नाही हे कळाले पाहिजे. संत तुकाराम महाराज तर म्हणतात की, परमार्थामध्ये ज्याला प्रगती करायची आहे त्याने लाज सोडली पाहिजे.
लाज भय शंका दुराविला मान।
न कळे साधन यापरते।।
आता प्रश्न असा की ही परमार्थामध्ये लाज सोडणे म्हणजे नेमके काय? संत ज्ञानेश्वर महाराज ‘लज्जा’ या सद्गुणाची व्याख्या अशी करतात की,
हे बहु असो देवपणे।
नावारूपासि येणे।
नाही लाजिरवाणे। याहुनि।।
‘मी देह आहे’ असे समजून नामरूप यांचा अंगीकार करणे यासारखी लाजिरवाणी गोष्ट दुसरी कोणतीही नाही. असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. जी वस्तू आपली नाहीच ती वस्तू आपली म्हणू लागतो. तर ती क्रिया लाजिरवाणी होय. परमार्थामध्ये ही लाज सोडणे खूप महत्त्वाचे आहे. संत तुकाराम महाराजांना काही कुटिल लोकांनी त्रास द्यायचा ठरविले आणि त्यांना गाढवावर बसवून गावात मिरवू लागले. तरी महाराज अतिशय आनंदात भजन करीत निघाले होते. त्यांच्या बायकोने हे पाहिले तेव्हा ती विचारू लागली, महाराज हे काय आहे? तेव्हा तुकाराम महाराज म्हणू लागले अगं आवले! आपल्या लग्नाची वरात निघाली नव्हती ना ! म्हणून आज वरात निघाली आहे. तेव्हा त्यांची बायको म्हणू लागली, अहो वरातीकरिता घोडा लागतो ना, तेव्हा महाराज म्हणााले,
गाढवाचे घोडे।
आम्ही करू दृष्टीपुढे।।
‘मी देह आहे’ ही आसक्ती सोडल्यानंतरच या अवस्थेपर्यंत जाता येते. या सर्व विचाराचे सार हेच की ‘लज्जा’ हा एक सगुण आहे व त्यांचा योग्य तो वापर मनुष्य जीवनामध्ये होत रहावा.

Web Title: Shame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.