आभासांच्या सावल्या

By Admin | Updated: March 11, 2015 22:47 IST2015-03-11T22:47:22+5:302015-03-11T22:47:22+5:30

सूर्य उगवला असे आपण म्हणतो. पण सूर्य आहे तिथेच असतो, प्रत्यक्षात पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण झालेली असते. आपण भ्रामक विश्वात कसे जगत असतो

Shadows of phenomena | आभासांच्या सावल्या

आभासांच्या सावल्या

प्रल्हाद जाधव -

सूर्य उगवला असे आपण म्हणतो. पण सूर्य आहे तिथेच असतो, प्रत्यक्षात पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण झालेली असते. आपण भ्रामक विश्वात कसे जगत असतो त्याचे हे एक बोलके उदाहरण. आपल्याला जे कळते तेच सत्य असे मानून आपण जगायला लागतो आणि सत्याच्या अशा सोईस्कर व्याख्या करत पुढचे सगळे जगणे आपल्या मनासारखे करून टाकतो. एखाद्या वस्तूची चौथी मिती किंवा आठवा रंग आपल्याला दिसत नाही तो माणसाच्या या उतावळेपणामुळेच.
माणसाच्या आकलनाला अनेक मर्यादा असतात. तो अनेक भ्रम निर्माण करतो आणि त्या भ्रामक विश्वात मला सारे काही कळते या अज्ञानात जगत राहतो. त्याच्या या अज्ञानाचे कौतुक करणारी माणसेही आजूबाजूला खूप असतात. एकमेकांचा अहंकार
कुरवाळत आणि अज्ञानालाच ज्ञान मानत ती जगत असतात. उंटाने गाढवाला म्हणायचे तुझा आवाज किती सुरेल आहे आणि गाढवाने उंटाला तू किती देखणा आहेस असे म्हणत जगत असतात. यशाच्या, सुखाच्या, ज्ञानाच्या सोईस्कर व्याख्या तयार करून जगता जगता अशी माणसं या अज्ञानातच मरूनही जातात.
परस्पर प्रशंसेचा हा स्तर हल्ली वेगाने घसरू लागला आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आभासाच्या सावल्या इतक्या लांब पडू लागल्या आहेत की खऱ्या साक्षात्काराचा सूर्य कधी उगवणार हा यक्षप्रश्न ठरला आहे.
आपले अज्ञान किती मोठे आहे, याची जाणीव झाली तर त्या क्षणापासून ज्ञानाच्या खऱ्या प्रकाशाकडे, जाण्याचा दरवाजा थोडा किलकिला होऊ शकतो. अज्ञानाच्या आसपास ज्ञान व्हावे असे तुकारामांनी म्हटले आहे ते काही उगीच नाही. शिवसूत्रामधले पहिले सूत्र ज्ञानं बंध: असे आहे. आपले जे काही ज्ञान आहे तीच आपल्या या सृष्टीच्या आकलनातील पहिली अडचण आहे असे सूत्रकारांनी म्हटले आहे.
सिद्ध झालेल्या प्रत्येक फॉर्म्युल्याविषयी आपण साशंक असले पाहिजे असे आईनस्टाईनने म्हटले आहे. हा सूर पकडून जगाच्या कानाकोपऱ्यात आजही अनेक माणसं सन्यस्तवत्तीनं काम करत असतात. पण आभासांच्या सार्वत्रिक मळभानं त्यांचं तेज झाकोळून गेलं आहे. नावानिशी बातमी प्रसिद्ध व्हावी, वृत्तपत्रात आपला फोटो यावा, वाहिन्यांवर मुलाखती प्रसारित व्हाव्या, मोक्याच्या जागी आपली वर्णी लागावी, रोज नवंनवं व्यासपीठ मिळावं म्हणून धडपडणारी आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाणारी माणसं बघितली की ओकारी आल्यासारखं वाटतं. अशा पोटार्थी कलावंत-विचारवंतांच्या कळपांपासून या जगाला कोण वाचवणार?

Web Title: Shadows of phenomena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.