गंभीर खेळ
By Admin | Updated: February 2, 2016 03:13 IST2016-02-02T03:13:38+5:302016-02-02T03:13:38+5:30
मुंबईतील जुहू समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या ४० फूट लांब देवमाशाच्या कलेवराला सर्वच प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी दिली. बातम्या बघून, वाचून अनेकजण हळहळले अन् आपापल्या कामाला लागले

गंभीर खेळ
मुंबईतील जुहू समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या ४० फूट लांब देवमाशाच्या कलेवराला सर्वच प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी दिली. बातम्या बघून, वाचून अनेकजण हळहळले अन् आपापल्या कामाला लागले. केवळ हळहळून काय होणार, असा प्रश्न कुणी विचारलाच, तर आपण सर्वसामान्य काय करू शकतो, हे उत्तर तयारच असते! प्रश्न तसा बिनतोड म्हणायला हवा; परंतु देवमाशांच्या मृत्यूला सर्वसामान्यही बऱ्याच प्रमाणात जबाबदार असल्याचे सांगितले, तर असा प्रश्न उपस्थित करणारे नक्कीच चक्रावून जातील. प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र तशीच आहे. गत काही दिवसांपासून मृत देवमासे समुद्रकिनाऱ्यांवर वाहून येण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. गत वर्षभरातच जगभरातील समुद्रकिनाऱ्यांवर शेकडो देवमासे मृतावस्थेत आढळले. ऐंशीच्या दशकात जगभरातील देवमाशांच्या शिकारीवर बंदी लादण्यात आली. परिणामी देवमाशांच्या शिकारीचे प्रमाण बरेच घटले आहे. असे असताना देवमासे मृतावस्थेत समुद्रकिनारी वाहून येण्याचे प्रमाण मात्र वाढतच आहे. गेल्या डिसेंबरमध्ये चिलीच्या एका किनाऱ्यावर एकाच वेळी तब्बल ३३७ मृत देवमासे आढळले होते. मुंबई किंवा चिलीच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळलेल्या देवमाशांच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेणे अद्यापही सुरूच असले तरी, मनुष्य जातीने निर्माण केलेल्या विषाक्त कचऱ्याचे समुद्रातील वाढते प्रमाणच त्यासाठी कारणीभूत असल्याची शक्यता संशोधक व्यक्त करीत आहेत. आपल्या दैनंदिन जीवनातील प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे ही समस्या अनेक पटींनी गंभीर झाली आहे. एलेन मॅकआर्थर फाउण्डेशन आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार, २०५०मध्ये समुद्रातील माशांच्या एकूण वजनापेक्षा प्लास्टिकचे वजन जास्त भरेल. सध्याच्या घडीला पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपैकी केवळ १४ टक्के प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केल्या जात आहे. उर्वरित प्लास्टिक अंतत: समुद्रातच पोहोचते! या भयावह वस्तुस्थितीवरून, आपण पर्यावरणासोबत किती गंभीर खेळ करीत आहोत, याची कुणालाही सहज कल्पना यावी! दुर्दैवाने, अशी उदाहरणे वारंवार समोर येऊनही आपण मात्र डोळे उघडण्यास तयार नाही. समुद्रात मोठ्या प्रमाणात जो विषाक्त कचरा जात आहे, त्यासाठी या पृथ्वीतलावरील मोजके अपवाद वगळता इतर प्रत्येक मनुष्य जबाबदार आहे; पण मी एकटा काय करू शकतो, हा प्रश्न त्यापैकी प्रत्येकाच्या ओठांवर आहे. एकटा कुणीही काहीही करू शकत नाही, हे अगदी खरे आहे; पण प्रत्येकाने आपापला वाटा उचलल्यास, खूप काही साध्य केले जाऊ शकते. त्यासाठी कुणाच्या पुढाकाराची वाट बघण्याची गरज नाही, केवळ स्वत:पासून प्रारंभ करण्याची आवश्यकता आहे. हे होईल का, हाच प्रश्न मृत्युमुखी पडणारा प्रत्येक देवमासा नक्कीच विचारत असणार!
ा