मालिका

By Admin | Updated: April 24, 2016 03:27 IST2016-04-24T03:27:12+5:302016-04-24T03:27:50+5:30

एक मालिका संपते... तिच्या आठवणीत मी रमले असतानाच दुसरी सुरू होते. नवीन कथा, नवीन लूक, नवे कपडे, नवे दागिने, नवीन लोकेशन... आणि नवी माणसं, नवी मैत्री, नवी नाती..

Series | मालिका

मालिका

- शिल्पा नवलकर

एक मालिका संपते... तिच्या आठवणीत मी रमले असतानाच दुसरी सुरू होते. नवीन कथा, नवीन लूक, नवे कपडे, नवे दागिने, नवीन लोकेशन... आणि नवी माणसं, नवी मैत्री, नवी नाती.. मालिकेतील नाती जितकी खोटी, तितकीच ही नाती खरी... कथा सरून जाते, लूक बदलत राहतो... पण माझ्या मालिकेने दिलेली जीवाभावाची माणसं पुढे खूप वर्षे माझी सोबत करणार असतात.

उंची साड्यांची सळसळ, डोळे दिपवणारे दागिने, गौरीसारख्या मढून मिरवणाऱ्या बायका, पाहुणे, मंत्र म्हणणारे गुरुजी, विधी सुरू असताना कंटाळून चहावर चहा पिणारे पुरुष, घामेजलेले तरी सगळ्या विधी कुरकुर न करता पार पाडणारे नवरानवरी.... हे सगळं, एखाद्या लग्नाचं वर्णन वाटत असेल नं? .... लग्न तर आहेच, पण खऱ्या आयुष्यातील नव्हे... तर प्रत्येक मालिकेत आम्हाला एकदा तरी पार पाडावं लागणारं छोट्या पडद्यावरचं लग्न... खरं लग्न... खरं लग्न एका दिवसात पार पडतं, पण मालिकेतल्या लग्नाचं शूटिंग २ ते ३ दिवस तरी सुरू असतं. प्रेक्षकांना दिसताना ही लग्नं चकचकीत, श्रीमंत दिसतात, पण तेच कापडे, तेच दागिने ३ दिवस सलग घालून उकाड्यात शूटिंग करताना कलाकारांचा जीव हैराण होऊन जातो... या वरच्या वर्णनातील ना नवरानवरी खरे असतात, ना दागिने, ना गुरुजी... फक्त चहा तेवढाच खरा असतो.
पण या लग्नाची तयारी मात्र, लग्नासारख्या कित्येक दिवस आधी सुरू होते. मालिकेच्या पटकथेत संगीत, मेंदी, लग्न, पाठवणी हे सगळं लिहून आल्यावर लगेच निर्मात्याच्या टीमची लगबग आणि धावाधाव सुरू होते.... नवरीच्या घरातील बायकांच्या साड्या निवडणे, कुठल्याही दोन साड्यांचे रंग सारखे नाहीयेत हे बघणे, त्या साड्यांचे फोटो काढून चॅनलला पाठवणे, त्यांची पसंती मिळविणे, दागिने शोधणे, सेट बुक करणे, तो सजवणे ही तयारी अगदी लग्नाच्या शूटिंगच्या दिवसांपर्यंत सुरू राहते... आणि मग आम्ही कलाकारही घरचं लग्न असल्यासारखं नटूनथटून मांडवात उभे राहतो.
फक्त लग्नच नाही, तर सणवार, पूजाअर्चा या शिवाय कुठलीच मालिका पूर्ण होत नाही. गुढीपाडवा, गणपती, नवरात्र, दिवाळी हे तर टीव्हीवर साजरे करण्यासाठी हुकमी सण. दैनंदिन मालिकेत काम करत असताना, अशा सणासुदीला घरी असणं फार कमी वेळा जमतं, पण त्याची कसर सेटवर पुरेपूर भरून काढली जाते. घरी केलेल्या गोडाधोडाचे डबे आणले जातात. मनोभावे आरत्या म्हटल्या जातात. 'अजूनही चांदरात आहे' या मालिकेच्या सेटवर प्रिया बेर्डे, चैत्राली गुप्ते अशा आम्ही सगळ्या जणी नवरात्रीला रोज ठरलेल्या रंगाचे कपडे घालून जायचो. शूटिंग करताना सेटवर असलेल्या देवीची पूजाही साग्रसंगीत व्हायची. 'भाग्यविधाता'च्या सेटवर मी, भार्गवी चिरमुले, पूर्वा गोखले, सुचित्रा बांदेकर, यांच्यासमवेत नऊवारी नेसून, दिवाळी साजरी केली. सेटवरच रांगोळी काढली, फराळ केला. 'बंध रेशमाचे'च्या सेटवर गणपतीचं शूटिंग होईपर्यंत चपला काढून वावरणं हा अलिखित नियमच झाला होता... 'अवंतिका' च्या शूटिंगच्या वेळेस पुण्यापर्यंत प्रवास सुसह्य व्हायचा, तो माझ्या आणि स्मिता सरवदेच्या अशाच एका अलिखित नियमामुळे.... पहाटेच्या ज्या मुंबई बसचं बुकिंग मी करायचे, त्याच बसचं तीही करायची. पुन्हा मुंबईला येताना माझं काम आधी संपलं, तरी मी तिच्यासाठी थांबून राहायचे, पण काहीही करून प्रवास एकत्रच व्हायचा.
कलाकारांनी एकमेकांसाठी केलेल्या अशा छोट्या-छोट्या गोष्टी त्यांना खूप जवळ आणतात. मग मालिकेच्या वर्षभराच्या काळात आम्हीच एकमेकांचे कुटुंब बनून जातो... 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला' च्या सेटवर रोज प्रत्येकाच्या घरचे डबे जेवताना उघडले जायचे. एक एक घास हा होईना, पण सगळ्यांना वाढला जायचा... त्या चवीमुळे शूटिंगचा थकवा कधीच जाणवला नाही... 'चि. सौ. कां' मालिकेत तर माझ्याबरोबर सविता मालपेकर आणि प्रिया बेर्डे असल्यामुळे खाण्यापिण्याची चंगळ असायची. या दोघी इंडस्ट्रीतल्या सुगरणी मानल्या जातात. त्यामुळे शूटिंगपेक्षा जास्त महत्त्व आज सवितामावशीने डब्यात काय आणलं, या प्रश्नाला असायचं.
या अशा एकेका घासाची चव फक्त त्या लंचब्रेक पुरती जिभेवर नसते... तर ती मालिका संपल्यावरही दीर्घकाळ मनात रेंगाळत राहते. वर्षभरात जोडलेली ही नाती आयुष्यभरासाठी टिकतात... अडीअडचणीला मदतीचा हात सदैवच पुढे करतात.

२६ जुलैच्या पावसात गोरेगावला 'भाग्यविधाता' या मालिकेचं शुटिंग करत होतो... परिस्थितीचा अंदाज येईपर्यंत पाणी स्टुडिओच्या पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचलं होतं. ५ महिन्यांची गरोदर असलेल्या पूर्वा गोखलेला तिथून बाहेर काढणं सगळ्यात महत्त्वाचं होतं. अशा वेळेस सुखरूप घरी पोहोचलेला आमचा सहकलाकार राजेश शृंगारपुरे पुन्हा कंबरभर पाण्यात उतरला. गाडी येवू शकणार नाही म्हणून सायकलवरून निघालेला राजेश अर्ध अंतर ती सायकल डोक्यावर घेवून स्टुडिओपर्यंत पोहोचला. पुन्हा पूर्वा आणि सहकलाकारांना हातात धरून, सांभाळत स्वत:च्या घरी घेवून गेला. ही मैत्री फक्त मालिकेपुरती असूच शकत नाही.

(लेखिका प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका आहेत.)

Web Title: Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.