धर्मनिरपेक्षता आणि जागतिक इस्लामी दहशतवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 00:05 IST2016-07-12T00:05:09+5:302016-07-12T00:05:09+5:30
भारतीय राज्यघटना भले धर्मनिरपेक्ष असेल, पण देशातील काँग्रेस आणि भाजपा या दोन प्रमुख राजकीय पक्षांचा मुस्लीमांप्रतीचा दृष्टीकोन मात्र परस्परविरोधी आहे.

धर्मनिरपेक्षता आणि जागतिक इस्लामी दहशतवाद
भारतीय राज्यघटना भले धर्मनिरपेक्ष असेल, पण देशातील काँग्रेस आणि भाजपा या दोन प्रमुख राजकीय पक्षांचा मुस्लीमांप्रतीचा दृष्टीकोन मात्र परस्परविरोधी आहे. भाजपा बहुसंख्य हिंदुंची पक्षपाती आहे तर काँग्रेस मुस्लीमांविषयी कनवाळू आहे. दोहोतील हा फरक निवडणूक काळातील त्यांच्या व्यूहरचनांमधून स्पष्ट होत असतो. भाजपा हिंदूंना इस्लामची भीती दाखवून त्यांची मते एकवटू शकते तर मुस्लीमांची एकगठ्ठा मते मिळावीत म्हणून काँग्रेस मुल्ला, मौलवी आणि अन्य मुस्लीम धर्मगुरुंना आपलेसे करुन घेण्याच्या प्रयत्नात असते. त्याचवेळी मुस्लीम मतदार भाजपाकडे सावधगिरीने बघत असतो आणि अभावानेच तिला मतदान करतो. पण काँग्रेस मात्र मुस्लीमांची मते भाजपाकडे वळू नयेत यासाठी काळजीपूर्वक डावपेच आखत असते.
अर्थात आता वरील स्थितीत काही बदल होत आहेत. इसिसचा उदय आणि भारतासह जगभरातील मुस्लीम युवकांमध्ये वाढत चाललेला जहालमतवादाचा प्रभाव यामुळे हिंसेची भीती देशाच्या दारापाशी येऊन ठेपली आहे. इस्लामी जहालवादाचे स्वरूप संपूर्ण जगातच झपाट्याने बदलू लागले आहे. सलाफी जिहादींनी इसिसच्या स्थापनेनंतर २०१४मध्ये इराकी सैन्याला पश्चिम इराकच्या मोसूलमधून हाकलून लावले होते. त्यामुळे जगभरातील मुस्लीमांच्या दृष्टीने त्यांच्या स्वत:च्या अस्मितेच्या दिशेने एक नवा पैलू समोर आला. जोपर्यंत इस्लामी दहशतवाद केवळ भारतापुरता सीमित होता तोपर्यंत या दहशतवादाला भारत-पाक संघर्षाचे नाव देणे आणि भारताच्या धर्मनिरपेक्षतेला काहीही धोका नसल्याचे सांगणे काँग्रेसला सोपे जात होते. पण मागील वर्षी इसिसने पॅरीस, अमेरिका, डेन्मार्क, जर्मनी, आफ्रिका, पश्चिम आशिया, पाकिस्तान, भारत आणि दक्षिण पूर्व आशियात दहशतवादी हल्ले केल्यामुळे संपूर्ण जगच एका अत्यंत विदारक स्थितीच्या टोकावर जाऊन बसले. बांगला देशची राजधानी ढाका येथे नुकत्याच झालेल्या क्रूर हल्ल्याने भारतासमोरही अस्तित्वाचे आव्हान उभे केले आहे. तो हल्ला मदरशांमध्ये शिकलेल्या नव्हे तर उच्च-शिक्षित तरुणांनी केला आणि त्यातला एक तोहन इब्ने इम्तियाज हा तर तेथील सत्ताधारी अवामी लीग पार्टीच्या नेत्याचा मुलगाच होता. हा नेता बांगलादेश आॅलिम्पिक असोसिएशनचा सचिवसुद्धा आहे.
या हल्ल्याने एक भयानक सत्य समोर आले आहे आणि ते म्हणजे हल्लेखोर तरुण व्यापारी, उद्योजक वा लष्करी अधिकाऱ्यांंच्या घरातले होते व त्यांनी खूप आधीच त्यांचे घर सोडले होते. पण त्यांच्या पालकांनी याची माहिती यंत्रणांना दिली नव्हती कारण त्यांना समाज वाळीत टाकेल अशी भीती वाटत होती. बांगला देशच्या यंत्रणेला वाटते की हल्लेखोर सत्ताधारी अवामी पार्टीचे विरोधक आहेत आणि सरकारने जमात-ए-इस्लामच्या नेत्यांना त्यांच्या १९७१च्या दोषाबद्दल मृत्युदंडाची जी शिक्षा ठोठावली तिचा सूड म्हणून त्यांनी घातपात घडवून आणला आहे. यात एक बाब अशीही आहे की हल्लेखोरांना मुंबईतील डॉ.झाकीर नाईक यांच्या भाषणांनी प्रेरीत केले होते. डॉ.नाईक त्यांच्या पीस टीव्हीच्या माध्यमातून वहाबी तत्वांचा प्रसार करीत असतात. संपुआ सरकारने २०१२मध्ये पीस टीव्हीचे प्रसारण बंदही केले होते पण झाकीर नाईक यू ट्युबवर आजही उपलब्ध आहेत. त्यांच्यावर इंग्लंड आणि कॅनडात प्रवेशबंदी आहे. अमेरिकेने तर त्यांचे अस्तित्वच नाकारले आहे.
वाढत्या इस्लामी दहशतवादाने सरळ हल्ले करण्याऐवजी छुप्या हल्ल्यांचे जे नवे तंत्र स्वीकारले त्याकडे काँग्रेसने डोळेझाक केली असावी असे दिसते. त्यापायी पक्षाच्या वरच्या आणि मधल्या फळ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ओसामा बिन लादेनला ओसामाजी म्हणून आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदला हाफीज सईद साहेब म्हणून स्वत:चे आणि पक्षाचेही हसू करुन घेतला. झाकीर नाईक यांना शांततेचे संदेश दिल्याबद्दल त्यांची प्रशंसा करणारी दिग्विजयसिंह यांच्या सोबतची चित्रफीत सध्या सर्वदूर फिरते आहे.
काँग्रेस पक्षाला इस्लामकडे स्थानिक राजकारणाच्या चष्म्याशिवाय बघता येत नसल्याचेच जणू दिसते आहे. परिणामी मुस्लीमसुद्धा पक्षाकडे पाठ वळवून बिगर भाजपाचा पर्याय शोधत आहेत. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर आणि विशेषत: वाढत्या इस्लामिक दहशतवादाचा विचार करुन काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे.