शास्त्रज्ञांचे पत्रक हे त्यांच्या चिंतेचे प्रतिबिंब!

By Admin | Updated: November 18, 2015 04:09 IST2015-11-18T04:09:05+5:302015-11-18T04:09:05+5:30

पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात माझे भाषण झाले होते. दिवसभर मी तिथेच होतो. प्रयोगशाळा पाहत मी प्राध्यापक

The scientists' sheet is a reflection of their concern! | शास्त्रज्ञांचे पत्रक हे त्यांच्या चिंतेचे प्रतिबिंब!

शास्त्रज्ञांचे पत्रक हे त्यांच्या चिंतेचे प्रतिबिंब!

- रामचन्द्र गुहा
(इतिहासकार आणि स्तंभलेखक)

पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात माझे भाषण झाले होते. दिवसभर मी तिथेच होतो. प्रयोगशाळा पाहत मी प्राध्यापक आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांशी चर्चाही केली होती. एनसीएल ही भारतातील एक अग्रगण्य आणि उत्कृष्ट विज्ञान संस्था आहे. तिथले संशोधन कार्य पाहून मी भारावलो होतो. मी संचालकांचे त्याबद्दल अभिनंदन केले, तेव्हा ते म्हणाले, ‘आभारी आहोत. पण आम्ही आमचा दर्जा चांगला राखण्याचे खरे कारण म्हणजे आम्ही दिल्लीपासून दूर आहोत. तुम्ही (म्हणजे मी) जिथे राहता तिथली विज्ञान संस्था तर एनसीएलपेक्षाही चांगली आहे. कारण तीदेखील दिल्लीपासून दूरच आहे’.
हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे देशातील काही विख्यात शास्त्रज्ञांनी एक संयुक्त पत्रक काढून देशातील वाढती असहिष्णुता आणि विज्ञानाधिष्ठित गोष्टींकडे होत असलेले दुर्लक्ष याविषयी व्यक्त केलेली चिंता. बहुमतातील लोकांच्या संकुचित विचारांमुळे राज्यघटनेलाच धक्का लागण्याची भीती आहे आणि हे लोक आता काय खावे, काय पोशाख करावा, कुणावर प्रेम करावे आणि विचार काय करावा यावरसुद्धा बंधने आणू पाहत आहेत. देशात वैज्ञानिकता वाढावी, मानवता वृद्धिंगत व्हावी आणि प्रश्न करण्याचे स्वातंत्र्य व सुधारणावादाला संरक्षण लाभावे असेच घटनेला अभिप्रेत असताना, अविवेकी आणि सांप्रदायिक विचारांना सरकारमधल्याच महत्त्वाच्या घटकांकडून प्रोत्साहन दिले जाते आहे, असेही या पत्रकात नमूद केले आहे.
ज्या सायंकाळी शास्त्रज्ञांनी हे पत्रक जारी केले त्या दिवशी मी चित्रवाणीवरील एक चर्चा ऐकत होतो. असहिष्णुतेच्या विरोधातील लेखक, कलाकार, चित्रपट निर्माते, समाज शास्त्रज्ञ आणि इतिहास संशोधकांच्या विद्रोहात आता शास्त्रज्ञसुद्धा उतरल्याचा संदर्भ घेऊन निवेदकाने भाजपाच्या प्रवक्त्याला बोलते केले, तेव्हा त्याने या विद्रोहाला ‘बालिश’ आणि राष्ट्रविरोधी म्हटले. मी विचलित झालो. शास्त्रज्ञांच्या पत्रकावर आघाडीच्या चार विज्ञान संस्थांच्या आजी-माजी संचालकांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यात बेंगळुरू शहरातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स व नॅशनल सेंटर आॅफ बायॉलॉजिकल रिसर्च या दोन संस्था, मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च आणि हैदराबादेतील सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅण्ड मोलेक्युलर बायॉलॉजी या संस्थांचा समावेश आहे. स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी एक अशोक सेन, जागतिक पातळीवरचे भौतिक शास्त्रज्ञ आहेत आणि सध्या अलाहाबादेतील हरिश्चंद्र रिसर्च इन्स्टिट्यूट येथे कार्यरत आहेत. यातील बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी केवळ भारतीय संशोधन संस्थांच्या कल्याणासाठी पश्चिमेतल्या प्रतिष्ठेच्या आणि चांगल्या वेतनाच्या नोकरीच्या संधी सोडल्या आहेत. पण भाजपासाठी ते बालिश आणि राष्ट्रविरोधीच ठरत आहेत. म्हणूनच की काय एका टीकाकाराने ट्विटरवर उपहासाने लिहिले होते की, ‘जे गणेशाच्या शिर प्रत्यारोपणावर विश्वास ठेवतात त्यांना कुठलाही शास्त्रज्ञ बालिशच वाटणार’.
तीन मुख्य बाबींवर भारतीय शास्त्रज्ञ इथल्या कलाकार आणि लेखकांपेक्षा वेगळेच आहेत. पहिली बाब म्हणजे त्यांचे बौद्धिक कार्य राजकारण आणि विशिष्ट विचारसरणीपासून मुक्त आहे. फारच थोडे (किंवा एखादा) लेखक किंवा कलाकार राजकीय अभिनिवेशापासून दूर असेल. त्यांची कलात्मकता किंवा साहित्यिक दर्जा हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा असला तरी त्यांची पुस्तके, कविता किंवा चित्रे नेहमीच राजकीय भाष्य करीत असतात. दुसऱ्या बाजूला शास्त्रज्ञ त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात फक्त भौतिक आणि नैसर्गिक विश्वाचे ज्ञान वाढवायचे काम करत असतात.
दुसरी बाब म्हणजे लेखक आणि कलाकार नेहमी सामान्य जनतेच्या नजरेस पडत असतात. ते लेख लिहितात, त्यांचे कार्यक्रम होतात आणि ते दूरचित्रवाणीवरसुद्धा दिसत असतात. शास्त्रज्ञ मात्र त्यांच्या प्रयोगशाळेत किंवा अध्यापनात अखंड व्यग्र असतात. निषेध पत्रकावर हस्ताक्षर करणारे अशोक सेन फार थोड्या लोकाना ठाऊक आहेत, कारण त्यांनी प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे व स्टीफन हॉकिंग यांनी त्यांची प्रशंसा केली आहे. पी. बलराम, सत्यजित मेयर, डी. बालसुब्रह्मण्यम आणि चंद्रशेखर खरे हे प्रख्यात शास्त्रज्ञ आहेत पण सर्वसामान्य जनतेला त्यांची ओळख नाही. पण त्यांचा भारतातील आणि विदेशातील शास्त्रज्ञ प्रचंड आदर करतात.
शेवटची पण तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे लेखक आणि कलाकारांच्या कार्याच्या व्यावहारिक उपयोगितेला मर्यादा आहेत. साहित्य, कला आणि संगीत तुमची सौंदर्यविषयक दृष्टी वाढवू शकतात, शिक्षण आणि मनोरंजन करू शकतात; पण या गोष्टी प्रगती साधण्याची महत्त्वाची साधने नव्हेत. शास्त्रज्ञांचे कार्य ज्ञानात भर घालत असते आणि नावीन्यपूर्ण व्यवहारी उपयोगातसुद्धा येत असते, ज्यामुळे रोजगार संधी वाढतात आणि अर्थकारणाला गती लाभते. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, नॅशनल सेंटर आॅफ बायॉॅलॉजिकल रिसर्च, टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च आणि सेंटर फोर सेल्युलर अ‍ॅण्ड मोलेक्युलर बायॉलॉजी या प्रत्येक संस्थेत जागतिक पातळीवरचे शास्त्रज्ञ आधुनिक संशोधन कार्य करीत आहेत. त्याचवेळी त्यांच्या हाताखालून गेलेले विद्यार्थी माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण आणि जैवतंत्रज्ञान उद्योगात योगदान देत आहेत. त्याचबरोबर हे विद्यार्थी अवकाश संशोधन, अणू संशोधन आणि सुरक्षा संशोधन कार्यात आपली चुणूक दाखवत आहेत. आयआयटी बरोबर या संस्था ज्ञानाची यंत्रणा तयार करीत आहेत ज्याचे आर्थिक विकासातले आणि राष्ट्रीय सुरक्षा कार्यातले योगदान उल्लेखनीय आहे.
एकूणच या सर्व संस्था दिल्लीतल्या सत्ताकेंद्रापासून आणि आजच्या काळात सांस्कृतिक सत्तेचे केंद्र बनलेल्या नागपूरपासूनही दूरच आहेत. संघाच्या मुशीत वाढलेल्या मंत्र्यांचा नेहमीच असा दावा असतो की, हिंदू विज्ञान इतर ज्ञान शाखांपेक्षा श्रेष्ठ आहे. यामुळे कदाचितच आपले सबंध जीवन आधुनिक विज्ञान संस्थांच्या कल्याणासाठी घालवणाऱ्या भारतीयांना आश्वस्त वाटत असेल.
लेखक आणि कलाकारांची याचिका कदाचित सरकारने फारशी मनावर घेतली नसेल. एका वरिष्ठ मंत्र्याने या याचिकाकर्त्यांना भरकटलेले भाजपाविरोधी घटक म्हटले आहे. मला अशी आशा आहे की, आपले नावाजलेले शास्त्रज्ञसुद्धा या प्रकारे दुर्लक्षित केले जाणार नाहीत. लेखक आणि कलाकारांप्रमाणे त्यांना याचिकेवर सही करण्याची गरज नाही किंवा माध्यमात जाण्याचीसुद्धा गरज नाही. त्यामुळेच त्यांनी जाहीर केलेले सार्वजनिक वक्तव्य त्यांचे नागरिक आणि शास्त्रज्ञ म्हणून असलेल्या चिंतेचे प्रतिबिंब आहे. सरकारने लेखक आणि कलाकारांची याचिका मनावर न घेणे म्हणजे त्यांची संकुचित दृष्टी असेल; पण त्यांनी हीच फूटपट्टी शास्त्रज्ञांच्या बाबतीत लावली तर ती शोकांतिका ठरेल.

Web Title: The scientists' sheet is a reflection of their concern!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.