विज्ञान कथा : दोन पंतप्रधानांची
By Admin | Updated: March 11, 2015 22:39 IST2015-03-11T22:39:15+5:302015-03-11T22:39:15+5:30
साल १९५८. भारतीय खगोलशास्त्र संस्था आणि संस्कृत संशोधन, नवी दिल्लीचे संचालक राम स्वरूप शर्मा यांनी फलज्योतिषावरील कथित संशोधनात्मक

विज्ञान कथा : दोन पंतप्रधानांची
प्रभाकर तिंबले
माजी निर्वाचन आयुक्त, गोवा -
साल १९५८. भारतीय खगोलशास्त्र संस्था आणि संस्कृत संशोधन, नवी दिल्लीचे संचालक राम स्वरूप शर्मा यांनी फलज्योतिषावरील कथित संशोधनात्मक पुस्तक पंतप्रधान नेहरूंना अर्पण करण्याची इच्छा प्रकट केली. त्यावर अगदी नम्र शब्दांत त्यांनी त्याला नकार दिला. आपला फलज्योतिषावर विश्वास नाही, खगोलशास्त्रात भारताने भरीव योगदान दिले आहे. फलज्योषितावरील पुस्तक मला अर्पण केल्याने माझ्या वैज्ञानिक जाणीवांच्या तत्त्वांना छेद देणारे ठरेल. ज्या काळात फलज्योतिष लोकप्रिय असताना आणि त्यांची आपली विज्ञानविषयक भूमिका राजकीय अडचणीची असतानाही तत्कालीन पंतप्रधानांनी ठाम भूमिका घेतली, हे उल्लेखनीय आणि धाडसाचे म्हणावे लागेल.
पहिले पंतप्रधान
पंडित नेहरू भारताच्या गणित आणि न्यायवैद्यक प्राचीन परंपरेबाबत अनभिज्ञ नव्हते. त्यांना या समृद्ध परंपरेचा अभिमानच होता. पण त्यांनी विज्ञाननिष्ठ भूमिका घेत शास्त्रज्ञ आणि विद्वानांना जुन्या चालीरितींना मूठमाती देऊन आधुनिक शिक्षणाचा अवलंब करण्यास नेहमीच प्रोत्साहन दिले. ते आधुनिक भारताचे शिल्पकार होते. त्यांनी आधुनिक विज्ञान, विज्ञान आणि औद्योगिक संशोधनासाठी खास विभाग, अणुउर्जा आयोग व इतर विज्ञानविषयक संस्थांना मुक्त आश्रय दिला.
पंतप्रधान होण्यापूर्वी १९२१ ते १९४५ दरम्यानच्या स्वातंत्रलढ्याच्या काळात नेहरू तब्बल नऊ वर्षे कारागृहात होते. याच काळात त्यांनी ‘ग्लिम्पसेस आॅफ वर्ल्ड हिस्टरी’ या पुस्तकातून तरुणांना भारतीय इतिहासाबद्दल सांगितले आहे. ‘सायन्स गोज अहेड’ नावाच्या इंदिरा गांधींना लिहिलेल्या पत्रात (१३ जुलै १९३३) विज्ञान समाजकारणात कसे वापरता येईल याबद्दल त्यांनी विस्ताराने लिहिले आहे. त्यांचे ‘आत्मचरित्र’ आणि ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’ या पुस्तकाने त्यानंतरच्या अनेक पिढ्यांना वळण लावले. नेहरूंसाठी विज्ञान हा केवळ विषय नव्हता तर तो आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग होता. वैयक्तिकरीत्या आणि पंतप्रधान म्हणूनही ते कायम त्याचा पुरस्कार करत. पारंपरिक मंत्रांबद्दल बोलताना ते म्हणाले की, मंत्र हे शक्तिशाली होते आणि ते लिहिणारे आणि निर्मिणारे तेवढ्याच प्रचंड प्रतिभेचे होते. पण शक्तिशाली शब्द सुद्धा अप्रतिभावान माणसाच्या तोंडून आले तर त्याची शक्ती काम करत नाही. म्हणून त्या शब्दांचा अर्थ आणि त्याची शक्ती माहीत नसताना त्याची नुसती चर्पटपंजरी करण्यात काहीच हशील नाही.
छप्पन इंच छातीचे पंतप्रधान
विद्यमान पंतप्रधान आपले परराष्ट्र व्यवहार खाते ‘रामायण मेळा’ आयोजित करण्यासाठी राबवतात, त्यातून त्यांच्या प्राथमिकता लक्षात येतात. पंतप्रधान रामायणाची सांगड आजच्या काळाशी घालू पाहतात. याचाच अर्थ ते आजच्या तरुण पिढीला आधुनिकतेकडे नेण्यास सक्षम नाहीत. आर्यभट्टला गुरुत्वाकर्षणाचा नियम ज्ञात होता आणि मंगळावर पाणी असल्याचे वेद लिहिण्यापूर्वी भारतीयांना माहीत होते, हे ज्ञान पाजळण्यासाठी इस्रोचे माजी चेअरमन जी. माधवन नायर यांना ७१ वर्षे खर्ची घालावी लागली. पदार्थशास्त्राचे प्राध्यापक आणि माजी मानवसंसाधन विकास मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी योग आणि बलात्काराच्या घटनांचा परस्परसंबंध लावला आहे.
नरेंद्र मोदी हे गॅजेटसॅव्ही आहेत आणि आपल्या राजकीय मार्केटिंगसाठी या अत्याधुनिक साधनांचा ते पुरेपूर वापर करतात. त्याचप्रमाणे ते जुनाट परंपरा, लिखिते आणि पुराणे हेही विज्ञान आहे असा प्रचार करण्यासाठी त्याचा वापर करतात. यातून ते नवीन पिढी विज्ञानापासून दूर राहावी असा प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान एकाच वेळी भौतिक संपत्तीविषयी आणि कौशल्यविकासाबद्दल बोलतात आणि दुसऱ्या बाजूला जुनाट अवैज्ञानिक गोष्टींत गुंतवून त्यांना संभ्रमीत करतात.
विद्यमान पंतप्रधान विज्ञान परिषदेत जुनाट तत्त्वज्ञानांचे बीज पेरतात आणि आपले शास्त्रज्ञ त्याला संमती देण्यासाठी माना डोलावतात. प्लास्टिक सर्जरी, पशुंच्या अवयवांचे मानवावर रोपण, सरोगेट मदर, विमाने आणि अण्वस्त्रे भारताला पूर्वीच ज्ञात होती अशी विधाने ते करतात. पंतप्रधानपदावरून हे बोलताना या जुनाट ग्रंथ आणि पुराणांना विज्ञानाचा दर्जा देत हे माहीत असणे भारताचे भवितव्य घडविण्याची पूर्वअट असल्याच्या थाटात बोलतात.
सत्य हे आहे की वैदिक काळात फलज्योतिष नव्हतेच. ग्रीकांनी फलज्योतिष इथे आणले, आपल्या माथी मारले आणि आपले खगोलशास्त्र पळवले. आपले पंतप्रधान भारताच्या नवीन पिढीला आधुनिकतेपासून दूर ठेवत जुन्या परंपरा, अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक गोष्टींच्या आहारी जाण्यास भाग पाडत आहेत. याला ते राष्ट्रवाद म्हणतात. आपले शास्त्रज्ञही नवीन शोध लावण्यापूर्वी आपल्या कुलदेवतेला कौल लावत असतात. यातून आपण भारताला मागास बनवणार आहोत.
नेहरूंनंतर कुणीच विज्ञानाकडे हवे तसे लक्ष दिलेले नाही. विद्यमान पंतप्रधानांच्या कारकीर्दीत तर त्याची पातळी अगदीच खालावली आहे. या पंतप्रधानांच्या उक्तीत आणि कृतीतले अंतर त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव असल्याचे स्पष्ट करतो. भारताचे भवितव्य अंधकारमय आहे. विरोधकांची पंतप्रधानांबद्दलची धारणा वृथा नव्हती. फक्त ती भीती विकासाच्या धुक्याखाली लपली होती. आता ती उघड झाली आहे.