सत्यनारायण गोएंका : बुद्धाचे खरे अनुयायी

By Admin | Updated: January 31, 2015 04:44 IST2015-01-31T04:44:16+5:302015-01-31T04:44:16+5:30

दु:ख, दु:खाचे कारण व निवारण या मानवी जीवनातील कधीही न सुटणाऱ्या कोड्यावर अगदी सोप्या भाषेत उत्तर शोधून काढणारे भगवान गौतम

Satyanarayan Goenka: True followers of Buddha | सत्यनारायण गोएंका : बुद्धाचे खरे अनुयायी

सत्यनारायण गोएंका : बुद्धाचे खरे अनुयायी

राहुल रनाळकर , शहर संपादक, लोकमत, मुंबई

दु:ख, दु:खाचे कारण व निवारण या मानवी जीवनातील कधीही न सुटणाऱ्या कोड्यावर अगदी सोप्या भाषेत उत्तर शोधून काढणारे भगवान गौतम बुद्ध यांचा वारसा जतन करणाऱ्यांची यादी मोठी आहे. असे असले तरी अत्याधुनिक जगतात या पंक्तीत बसण्याचा बहुमान विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांना मिळाला़, तो केवळ बुद्धाची महान विद्या, विपश्यना याचा खऱ्या अर्थाने प्रचार व प्रसार केल्यामुळेच़़़ त्यामुळे बुद्धाचे खरे अनुयायी म्हणून गोएंका यांना संबोधणे गैर ठरणार नाही़
शुक्रवारी गोएंका यांची जयंती जगभर ध्यान करून साजरी करण्यात आली. गोएंका यांनी जीवनकाळात जगभरात २७० हून अधिक विपश्यना केंद्रे सुरू केली़ मुंबईच्या बोरीवलीतील गोराई येथे भव्य पॅगोडा उभारून बुद्धाच्या शिकवणीचे एक प्रेरणास्थान सर्वसामान्यांना खुले करून दिले़ हे कार्य करत असताना त्यांनी कधीही कोणत्या धर्मावर अथवा पंथावर टीका केली नाही़ केवळ बुद्ध व त्याची विपश्यना विद्या याचा शुद्ध स्वरूपात प्रचार व प्रसार एवढेच गोएंका यांनी केले़ जगभरात विपश्यनेला विरोधाची घटना कुठेही घडली नाही, हे केवढे विशेष !
गोएंका हे भारतीय वंशांचेच़ त्यांचे पूर्वज व्यापारासाठी ब्रह्मदेशात गेले व तेथेच गोएंका यांचा जन्म झाला़ एका गंभीर आजाराने त्रस्त असतानाच ते विपश्यना विद्येच्या संपर्कात आले़ तेथे गुरू-शिष्य परंपरेने ही विद्या शिकवली जात होती़ विपश्यनाचार्य सयाजी उ बा खिन यांच्याकडून गोएंका यांना १९५४ मध्ये ही विद्या मिळाली़ तेथे १४ वर्षे त्यांनी या विद्येचा अभ्यास केला़ या विद्येचे महत्त्व जाणून गोएंका यांनी या विद्येचा प्रचार व प्रसार करायला सुरुवात केली़ आणि या मानवी कल्याण ज्योतीला एक नवीन अखंड ऊर्जा मिळाली़ याचे पहिले शिबिर १९६९ मध्ये मुंबईत भरले़
ही विद्या पूर्णपणे नि:शुल्क शिकवली जाते़ विपश्यना शिबिरात सहभागी होणाऱ्याकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मागणीही केली जात नाही़ मुळात या शिबिरांचे आयोजन दान मिळालेल्या पैशांतून व वस्तूंमधून केले जाते़ ही विद्या शिकण्यासाठी केवळ दहा दिवस इच्छुकाला विपश्यना केंद्रात राहावे लागते़ तेथे आवश्यकतेच्या सर्व वस्तू विनाशुल्क दिल्या जातात़ तसेच तेथे असताना काही नियमांचे पालन करण्यास सांगितले जाते़ यापलीकडे या शिबिरांमध्ये सहभागी होणाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा केली जात नाही़
या विद्येचा अभ्यास करणाऱ्या माणसाला कसा लाभ होतो हेही गोएंका अगदी सोप्या भाषेत सांगत़ राग व द्वेष हा प्रत्येक जातीच्या तसेच धर्माच्या माणसामध्ये असतो़ आणि सध्याचे जग अत्याधुनिक असले तरी या दोन गोष्टी तरी अत्याधुनिक झालेल्या नाहीत़ माणूस कितीही अत्याधुनिक झाला तरी या दोन गोष्टींचा प्रभाव त्याच्यावर असतोच़ तसेच अत्याधुनिक होताना सुख-शांती प्रत्येकाला हवीच असते़ ती कोणत्या यंत्राने प्राप्त होऊ शकत नाही. या विद्येने ती मिळते, हा कोणा एकाचा अनुभव नाही़ कोट्यवधी लोकांचा हा अनुभव आहे़ मात्र केवळ या विद्येवर चर्चा करून याचा लाभ मिळणार नाही़ त्यासाठी शिबिरात सहभागी होणे आवश्यक आहे, असे गोएंका नेहमी सांगत असत़
गोएंका यांनी या विद्येचा प्रचार सुरू केल्यानंतर सरकारनेही याला मोठा हातभार लावला़ राज्य शासनाने या शिबिरात सहभागी होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष सवलत दिली आहे़ मुलांनी ही विद्या आत्मसात करावी, म्हणून शाळांमध्ये या शिबिरांचे आयोजन करण्याचे काम सध्या सुरू आहे़ तसा अध्यादेशही शासनाने जारी केला आहे़ ज्यांना दहा दिवसांच्या शिबिरात सहभागी होता येत नाही, त्यांच्यासाठी दहा मिनिटांचा अभ्यास शिकविला जातो़ तसेच ही विद्या शिकण्यासाठी जे इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी शिबिरांचे आयोजन तर केलेच जाते़
महत्त्वाचे म्हणजे या विद्येचा प्रचार व प्रसार करताना गोएंका यांनी विविध देशांत विखुरलेल्या बुद्ध अस्थी एकत्र करण्यासाठीही प्रयत्न केले़ भारतात या अस्थी दिल्लीतील एका म्युझियममध्ये आहेत़ मात्र त्यांचे खरे स्थान हे विपश्यना केंद्र असून, याने ध्यान करणाऱ्याला मानसिक बळ लाभते. तेव्हा या अस्थी पॅगोडात ठेवण्यासाठी द्याव्यात, असे गोएंका यांनी वारंवार केंद्र सरकारला सांगितले़ शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी यासाठी प्रयत्न केला़ पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही़ मात्र गोराई येथील पॅगोडात ठेवण्यासाठी गोएंका यांना श्रीलंकेने त्यांच्याकडे असलेल्या बुद्ध अस्थी दिल्या़ त्या ठेवण्याचा कार्यक्रम माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पार पडला़ तरीही भारत सरकारकडे असलेल्या बुद्ध अस्थी अजूनही पॅगोडात ठेवल्या गेल्या नाहीत़
बुद्ध व त्याच्या विपश्यना विद्येला जगभरात पोहोचवण्याचे काम अगदी बुद्ध जिवंत असतानाच सुरू झाले़ त्यानंतर सम्राट अशोकाने सुमारे अडीच हजार शिलालेख उभारून बुद्धाची शिकवण कोरून ठेवली़ त्यातच गोएंका यांनी बुद्ध व विपश्यना विद्येला जगातील प्रत्येक देशात पोहोचवले़
हे काम तसे सोपे नव्हते़ कारण जगभरातील प्रत्येक धर्म व पंथ आपली मूल्ये सोडून या विद्येकडे वळणे अशक्यच होते़ मात्र ही विद्या म्हणजे जीवनमूल्यांचाच भाग आहे़ माणसाने जगताना कसे जगावे़़़ हे सरळ व सोप्या भाषेत सांगणारी ही विद्या आहे़ गोएंका यांनी ते जगाला पटवून सांगितले़ आणि जगानेही या विद्येचा आनंदाने स्वीकार केला़ त्यामुळे गोएंका हे अत्याधुनिक जगतातील खरे बुद्ध अनुयायी ठरले़

 

Web Title: Satyanarayan Goenka: True followers of Buddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.