भगवं घड्याळ ! दोघांचे कार्यकर्ते एकत्र आले, तर काय होईल?

By सचिन जवळकोटे | Published: July 26, 2020 08:04 AM2020-07-26T08:04:14+5:302020-07-26T08:06:19+5:30

लगाव बत्ती

Saffron watch! What will happen if the two activists come together? | भगवं घड्याळ ! दोघांचे कार्यकर्ते एकत्र आले, तर काय होईल?

भगवं घड्याळ ! दोघांचे कार्यकर्ते एकत्र आले, तर काय होईल?

googlenewsNext

- सचिन जवळकोटे

केवळ देवेंद्रपंतांचं सरकार नको म्हणून ‘घड्याळ अन् वाघ’ एकत्र आले. तिस-या जोडीदाराचाही ‘हात’ बळंबळंच धरून त्यांनी स्वत:चं ‘ट्रिपल सीट सरकार’ तयार केलं. आतातर कायमस्वरूपी हा ‘पवार-ठाकरे’ फॉर्म्युला म्हणे तयार होतोय. पुढच्या निवडणुकीतील जागेचं वाटपही म्हणे दोघांनी आत्तापासूनच सुरू केलंय. खरं तर टीव्हीवरच्या बातम्यांवर लोक किती विश्वास ठेवतात, हा भाग वेगळा. मात्र असा फॉर्म्युला आपल्या सोलापूर जिल्ह्यातही राबविला गेला तर काय-काय गमती-जमती घडतील, याची एक ‘काल्पनिक चित्तरकथा’.

 आजपावेतो केवळ ‘बबनदादां’च्या विरोधातच अर्ज अन् तक्रारी देणारे ‘कोकाटें’चे ‘संजयबाबा’ जेव्हा तालुक्याच्या भल्यासाठी खुद्द ‘दादां’नाच पत्र लिहू लागले, तेव्हाच ‘माढ्यात राजकीय क्रांती’ होणार, हे जनता ओळखून चुकली होती. पिंपळनेर कारखान्याच्या केबिनमध्ये हेच ‘दादा’ अन् ‘बाबा’ चक्क गप्पा मारत बसले होते. ‘संजयमामां’च्या केबिनसारखा आलिशान थाटमाट ‘दादां’कडं नसला तरी सरकार बदलल्यानं तेही थोडंसं रिलॅक्स बनले होते. त्यांनी ड्रायफ्रूट अन् कडक कॉफी मागविली. खरंतर ‘संजयबाबा’ हे मूळचे ‘हाफ चड्डी’ परिवारातले; मात्र गेल्यावेळी त्यांनी गळ्यात भगवं उपरणं घातलेलं अजूनही काढलंच नव्हतं. ते हळूच ‘दादां’च्या कानात सांगू लागले, ‘मी काही कट्टर शिवसैनिक नाही बरं का. केवळ सीएम या पक्षाचे म्हणून नाईलाजानं राहिलोय.’ हे ऐकून ‘दादा’ही गालातल्या गालात हसले. ‘मी तरी कुठं पूर्वीसारखा निष्ठावान राहिलोय?’ असंच काहीसं ते मनातल्या मनात म्हणत असावेत, असं उगाचंच त्यांच्या लाडक्या ‘बापू’ला वाटलं.

  पंढरीतही ‘भाळवणी अन् सरकोली’ गावांदरम्यान हॉटलाईन केबल टाकण्याचं काम जोरात सुरू झालेलं. ‘भारतनानां’चा कारखाना वाचविण्याची जिम्मेदारी ‘शिंदेंच्या संभाजीं’नी घेतलेली.. तर भाळवणीत आणखी दीड-दोनशे गाळ्यांचं शॉपिंग सेंटर काढून दरमहा उत्पन्नाची हमखास सोय करून देण्याचा शब्द ‘नानां’नी दिलेला; मात्र याचवेळी ‘आंबेचिंचोली’ गावात ‘गोडसे भावजी’ही कॅल्क्युलेटर घेऊन हिशोब घालत बसलेले. कुणाला वाटलं, गेल्या निवडणुकीत न उभारताही कितीला कापले गेले, याचा आकडा पाहताहेत. कुणाला वाटलं, गेल्या पाच वर्षांत झालेला फुकटचा खर्च काढण्यासाठी आणखी किती ‘कालवा’ करायला हवा, हे ते पाहताहेत. आता ‘कालवा म्हणजे राजकीय कालवा’ हा शब्द इथं अभिप्रेत. उगाच गैरसमज नको. तिकडं मंगळवेढ्यातही ‘आवताडे’ म्हणे आता नेमकं कोणत्या पक्षात ‘समाधान’ मानावं, याचा अभ्यास करून  राहिलेले.

  बार्शीतही ‘दिलीपरावां’च्या बंगल्यावर ‘भूमकरांचे निरंजन’ आलेले. पेशंट वाढण्याचा वेग बार्शीत जास्त होता की वैरागमध्ये, यावर दोघांमध्येही गहन चर्चा चाललेली.  त्यांच्या संवादात सौंदरेच्या ‘भाऊसाहेबां’ना सामील करून न घेतल्यानं ते बाजूलाच चडफडत बसलेले. अखेर त्यांनी हळूच कानात विचारलं, ‘साहेबऽऽ तुम्ही सेनेवाले, ते घड्याळवाले, कसं काय जुळलं पुन्हा?’ तेव्हा ‘दिलीपराव’ नेहमीप्रमाणे एक डोळा बारीक करत मिस्कीलपणे उत्तरले, ‘आता बार्शीत मीच बाण, मीच घड्याळ, मीच हात. राजकारणात असल्या तडजोडी कराव्याच लागतात.’ भाऊसाहेबांना यातलं         राजकारण किती कळालं माहीत नाही; मात्र ‘डिपार्टमेंटच्या तोडीमाडी’ अन् ‘राजकीय तडजोडी’ यात खूप फरक असतो, हे त्यांना कळून चुकलं. त्यांनी तावातावानं बोलण्यासाठी तोंड उघडणार, एवढ्यात ‘नागेश’सह अनेकांनी कानावर हात ठेवले.. कारण ‘भाऊसाहेब तसे खूप चांगले, फक्त त्यांनी तोंड उघडायला नाय पायजे!’ यावर तमाम बार्शीकरांचा ठाम विश्वास.

  माळशिरसमध्ये ‘बाण-घड्याळ-कमळ’ असलं-बिसलं काय नसतंय म्हणे. फक्त ‘दादा’ अन् ‘दादाविरोधक’ हे दोनच पक्ष अस्तित्वात. सध्या इथं ‘बाणा’ची चर्चा नसली तरी गेल्या आठवड्यात ‘थोरले काका बारामतीकर’ यांचा ताफा ‘माळशिरस’मध्ये थेट ‘देशमुखां’च्या वाड्यासमोर नाष्ट्यासाठी थांबला. तेव्हा ‘जानकरां’चे डोळे ‘उत्तम’पणे विस्फारले गेलेले. त्यांनी ‘अकलूजकरां’चे कट्टर विरोधक असलेल्या करमाळ्याच्या ‘रश्मीताईंना अस्वस्थपणे कॉल केला. तेव्हा त्याही तिकडून एकच बोलल्या, ‘तुम्ही अजून नवीन आहात. काकांचं असंच असतं. आपल्याच माणसाच्या विरोधात दुसरा माणूस  मोठा करायला त्यांना खूप आवडतं !’ फोन खट्टाऽऽक.

  सांगोल्यात तर काही कार्यकर्त्यांनी ‘आबाबा’ ग्रुप काढलेला. हे असलं कसलं नाव, असं विचारल्यावर त्यातला एक जण म्हणाला, ‘आता दीपकआबा अन् शहाजीबापू एकत्र येणार ना? म्हणून आबा अधिक बापू म्हणजे आबाबाऽऽ. पण यामुळे ‘गणपतआबां’च्या गोटात गदारोळ माजला, त्याचं काय? अगागाऽऽ लगाव बत्ती..
 
  मोहोळमध्ये मात्र ‘अनगरकर’ अन् ‘क्षीरसागर’ यांच्यात जुळणं अशक्यच होतं. दोघांचा ‘व्यवसाय’ एकच असला तरी कामाची पद्धत वेगळी होती. एक जण ‘नक्षत्र’च्या ब्रॅण्ड निर्मितीत तज्ज्ञ होते, तर दुसरे महाशय ‘संत्रा-मोसंबी’ विक्रीत माहिर होते. असो. सोलापूर शहरात मात्र सारा आनंदी आनंदच होता. ‘पुढच्या वेळीस ‘उत्तर’मध्ये मीच उभारणार अन् तुम्ही माझा प्रचार करणार, असा मेसेज ‘लकी चौका’तून ‘मनोहरपंतां’नी दिल्यामुळे ‘अवंतीनगर’मधले ‘पुरुषोत्तम’ फुल्ल टेन्शनमध्ये आलेले. त्यांना आजपावेतो कैक ‘तडजोडीं’ची सवय होती; मात्र ‘सपाटें’सोबतही जुळवून घ्यावं लागेल, हे त्यांच्या ध्यानीमनी नव्हतं. ‘सात रस्त्याहून साहेबांचा फोन आलाय. ताईंच्या पॉलिटिकल इव्हेंटला मदत करायला 'मध्य'मध्ये जायचंय’ असा मेसेज पाठवून त्यांनी झटकन बदलला विषय. लगाव बत्ती.. यातील सर्व प्रसंग काल्पनिक असून, भविष्यात चुकून-माकून सत्यात उतरल्यास योगायोग समजू नये.

( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Saffron watch! What will happen if the two activists come together?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.