‘रोम वॉजन्ट बिल्ट इन अ डे’

By Admin | Updated: June 18, 2015 02:13 IST2015-06-18T02:13:35+5:302015-06-18T02:13:35+5:30

रोमन साम्राज्याची राजधानी असलेले रोम शहर इसवी सनापूर्वी सातशे ते सहाशेच्या दरम्यान वसविले गेले आणि त्या काळातील ते एक अत्यंत

'Rome Wojens Built In A Day' | ‘रोम वॉजन्ट बिल्ट इन अ डे’

‘रोम वॉजन्ट बिल्ट इन अ डे’

रोमन साम्राज्याची राजधानी असलेले रोम शहर इसवी सनापूर्वी सातशे ते सहाशेच्या दरम्यान वसविले गेले आणि त्या काळातील ते एक अत्यंत सुनियोजीत नगररचनेचे आणि भव्य वास्तुकलेचे अतिभव्य आणि श्रीमंत शहर म्हणून ख्यातकीर्त झाले. पण हा चमत्कार काही रातोरात वा एका दिवसात झालेला नाही. अनेक वर्षे आणि अनेक कारागीर त्या कामात जुंपले गेले, प्रचंड मोठा पैसा खर्ची पडला आणि पुढे त्याचाच विचार केला जाऊन सुमारे बाराव्या शतकात इंग्रजी भाषेत एक वाक्प्रचार रुढ झाला व तो म्हणजे ‘रोम वॉजन्ट बिल्ट इन अ डे’! महाराष्ट्रातील एक बलदंड राजकीय नेते, शरदश्चन्द्र पवार यांचे डावे किंवा उजवे हात, देशभरातील तमाम अन्य मागासवर्गीयांचे तारणहार, फुले-आंबेडकर विचारधारेचे निष्ठावान पाईक, कदाचित किंचित शिक्षण सम्राट आणि मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे सभापतीपद ते राज्याच्या मंत्रिमंडळातील उप मुख्यमंत्रिपद अशी अनेक पदे उपभोगलेले छगन चन्द्रकांत भुजबळ यांची ‘स्वकष्टार्जीत’ व स्वमालकीची मालमत्ता बघून समस्त महाराष्ट्राचे डोळे भलेही पांढरे होवोत, पण हे सारे एका दिवसात वा सत्तेच्या एका कार्यकाळात झालेले नाही, हे नीट समजून घेतले पाहिजे. अनेक वर्षांच्या अथक ‘तपश्चर्येचे’ ते गोमटे फळ आहे! गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमे भुजबळांनी संपादीत केलेल्या मालमत्तेचा आकडा दोन-सव्वादोन हजार कोटींचा असल्याचे सांगत आहेत तर काही जाणकारांच्या मते, हा आकडा म्हणे लाखभर कोटींपर्यंत जाणारा आहे. एक लाख कोटी म्हणजे एकावर किती शून्ये हे कदाचित अरुण जेटलीसुद्धा पटकन सांगू शकणार नाहीत. तरीही राज्याच्या लालचलुचपत प्रतिबंध विभागाने मंगळवारी भुजबळांच्या स्थावर मालमत्तेवर घातलेले छापे अंमळ विलंबानेच घातले आणि भुजबळांना झाकपाक करायला अवधी मिळवून दिला, असा एक आक्षेप चर्चिला जात आहे. पण आभाळ फाटल्यानंतर ठिगळं तरी कुठं कुठं लावणार या म्हणीनुसार झाकपाक करुन करुन करणार तरी किती, हाही प्रश्नच आहे. राजकीय जन्माने भुजबळ तसे शिवसैनिक आणि कालांतराने सांधा बदलेले काँग्रेसी व उपसांधा बदललेले राष्ट्रवादी. त्यांच्या या तिन्ही अवतारांमध्ये त्यांच्या मनातील ‘रोम’ची निर्मिती होत होती. केवळ काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांच्या अभ्युदयाला प्रारंभ झाला असे म्हणणे म्हणजे शिवसेना आणि शिवसैनिक यांच्यातील ‘उत्पादक क्षमतेला’ कमी लेखणे होय. ते पाप कोणीही करु नये. उपसांधा बदलल्यानंतर आणि अजित पवार राजकीय वयात येईपर्यंत भुजबळ, शरद पवारांचे एकमात्र विश्वासू साथीदार होते. पवारांना जाणता राजा असे संबोधन त्यांचे ओशाळे प्रेमाने लावत असतात. या जाणत्याची नजर सतत भिरभिरत असते, असेही ऐकिवात आहे. याचा अर्थ भुजबळ जे काही उद्योग करीत होते आणि चिमण्या राजासारखी एकेक काडी गोळा करुन आपली घरटी उभी करीत होते, त्या साऱ्याची जाण या जाणत्याला असलीच पाहिजे. समता परिषदेच्या ध्वजाखाली आपला हा सवंगडी विविध राज्यांमध्ये अन्य मागासांचे मेळावे भरवून त्यासाठी लाखा लाखांची गर्दी कशी जमा करतो व त्यासाठी कुठून पैदा केलेले द्रव्य सांडत असतो, याची जाण जाणत्याला असणारच. पण त्यानेही बहुधा जाणतेपणीच त्याकडे काणाडोळा केला असणार. कारण जोवर सीमोल्लंघन करुन आपला हा खंदा समर्थक वाढीव समर्थकांचे सोने लुटून आणीत आहे व आपल्या ओंजळीत टाकीत आहे, तोवर पवारांना त्यात काहीही वावगे वाटले नसावे. पण अजित पवार राजकीय वयात आले आणि सुप्रिया सुळे यांचीही घरवापसी झाली तेव्हांपासून गणिते बिघडू लागली, असे म्हणतात. गोपीनाथ मुंडे यांच्याशी भुजबळांची जवळीक याच काळातली. आपल्यावर गैरव्यवहार वा अनियमिततेचे जे आरोप ठेवले जात आहेत, ते सारे आपण एकट्याने केलेले नाही व एका दिवसात केलेले नाही, असा भुजबळांचा ताजा बचाव आहे. याचा अर्थ ‘हम तो डुबेंगे सनम, लेकिन तुम को भी साथ ले डुबेंगे’! त्यांचा दुसरा युक्तिवाद वा बचाव आहे, तो सुडाच्या राजकारणाचा. महाभारताला एक सुडाचा प्रवास असेही संबोधले जाते. ते भुजबळांच्या कानावर गेले असेल तर त्यांना हे नक्कीच ठाऊक असेल की, जो प्रमादी असतो, त्याच्यावरच कोणालाही सूड उगवता येतो. द्रोपदी दुर्योधनाची तर दुर्योधन अर्जुनपुत्र अभिमन्यूचा प्रमादी होता. फडणवीस सरकार सुडाचे राजकारण करीत असेल तर तो सूड उगविण्याची संधी आणि त्यासाठी पोषक पार्श्वभूमी खुद्द भुजबळांनीच आयती तयार करुन दिली आहे व ती त्यांना मान्य व्हावी. इतके असूनही भुजबळांचे काही ओशाळे रस्त्यावर सरकारच्या विरोधात निदर्शने करतात तेव्हां वेगळ्या संदर्भात ‘नरेचि केला हीन किती नर’ या सुभाषिताची प्रचिती येऊन जाते. ‘गॉडफादर’ या जगविख्यात कादंबरीत तिचा लेखक मारिओ पुझो याचे तितकेच विख्यात असे एक वाक्य आहे. ‘बिहाईन्ड एव्हरी ग्रेट फॉर्च्युन, देअर ईज अ क्राईम’! याचा अर्थ प्रत्येक लखलखत्या यशाला गुन्हेगारीची पार्श्वभूमी असते! लाखाच्या घरात जाईल इतक्या संपत्तीचा संचय यापरते अन्य लखलखते यश वा भाग्य ते काय असू शकते. पण ही बाब केवळ अलंकारिक भाषेपुरती मर्यादित नाही. साऱ्या गावावारुन ज्यांना ओवाळून टाकून भिरकावून द्यावे अशा गुन्हेगार आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या गराड्यात भुजबळांचा वावर कदाचित एकट्या जाणत्या राजाचा अपवाद वगळता, साऱ्या जगाने बघितला आहे. खिशात साप-विंचू बाळगणे गारुड्याला जसे अभिमानाचे वाटते, तसेच चोर, उचक्के, भामटे अंगाखांद्यावर मिरविणे आजच्या राजकारण्यांनाही अभिमानाचे वाटत असते. छगन भुजबळ तूर्तासचे त्यांचे प्रतिनिधी आहेत, इतकेच!

Web Title: 'Rome Wojens Built In A Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.