(अ) प्रतिष्ठित महापौर
By Admin | Updated: March 11, 2015 22:46 IST2015-03-11T22:46:23+5:302015-03-11T22:46:23+5:30
कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांच्या सहायकास कार्यालयातच सोळा हजार रुपयांची लाच घेताना पकडले गेले. ही लाच महापौरांसाठी देण्यात येत होती

(अ) प्रतिष्ठित महापौर
वसंत भोसले.-
कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांच्या सहायकास कार्यालयातच सोळा हजार रुपयांची लाच घेताना पकडले गेले. ही लाच महापौरांसाठी देण्यात येत होती, अशी तक्रारदाराची माहिती आहे. त्यामुळे सहायकासह महापौरांनाही अटक करून जामिनावर सोडण्यात आले. दरम्यान, महापौरपदाची मुदत आणखी सहा महिने आहे. त्या काळात दुसऱ्या महिलेला संधी देण्याचा निर्णय सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने घेतला होता, पण महापौर राजीनामा देण्यासच तयार नाहीत. त्यांना आघाडीतूनच फूस आहे, हे आता उघड झाले आहे. लाच घेतल्याच्या आरोपावरून महापौरांना पकडून पोलीस गाडीतून पोलीस ठाण्यात नेण्यात येते. मग त्या आजारी पडतात. रक्तदाब वाढतो, डॉक्टर विश्रांतीचा सल्ला देतात, पोलीसही विश्रांती संपण्याची वाट पाहतात.
महापौर आहेत, प्रतिष्ठेचे पद आहे. विश्रांती, अटक, जामीन, आदी सोपस्कार संपल्यावर लाच घेण्याचा आरोप असताना या प्रतिष्ठेच्या पदावर बसावे का? याची साधी खंतही वाटू नये. त्यांनी राजीनामा न देण्याचा आतून सल्ला देण्यात येतो. नगरसेवक गप्प बसतात. कोल्हापूरची जनता हे सर्व राजकारण आहे म्हणून दुर्लक्ष करते, पण हे घाणेरडे राजकारण कोण करीत आहे? कोल्हापूरसारख्या महाराष्ट्रातील प्रतिष्ठित शहराचे प्रथम नागरिकपदच असे वादात अडकून राहत असेल तर....? त्या पदाची अप्रतिष्ठा होते, असे वाटत नसावे का? आपण सार्वजनिक जीवनात इतके कोडगे कसे काय झालो? या महापौरांनी राजीनामा दिल्याने काही होत नाही, त्या पदावर राहिल्या तरी काही नवे दिवे शहरात लागणार नाहीत, पण सार्वजनिक जीवनाची पातळी किती घसरली आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. लाच घेतल्याच्या आरोपावरून अटक होऊन बाहेर आल्या आहेत. तरी त्यांची पक्षातून हकालपट्टीही करण्यात येत नाही. त्यांना पक्षातून काढून तरी काय होणार म्हणा...? होणार तरी? काही नाही.
महापौरपदावर बसलेल्या व्यक्तीवर लाचखोरीचा आरोप आहे एवढेच ! इतके आपले जीवन घसरले आहे. यापूर्वी तीन-तीन महिन्यांसाठी महापौर निवडले जायचे. ते नव्वद दिवस सत्कार-समारंभ आणि मिरविण्यासाठीच असायचे. कोल्हापुरात प्रत्येक गल्लीत एक माजी महापौर राहतो. आता घरटी एक झाला तरी आश्चर्य नको. निदान आरोप झालेला तरी नसावा. शहराचे भलेबुरे काही करायचे राहू द्या! निदान जनाची नाही मनाची तरी लाज राखून महापालिकेचे राजकारण करा. आपणास सर्वांना हे अंगवळणी पडले आहे. त्यामुळे असे महापौरपद, महापालिका आणि त्यांचे राजकारण कालबाह्य झाले नाही का? या महापालिका हव्यातच कशाला? डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन करून तज्ज्ञ प्रशासकीय मंडळ नियुक्त करून त्यांच्याकडे कारभार का देऊ नये? हे सर्वच महापालिकांना लागू पडत नाही का? निदान काम करणे राहू द्या, प्रतिष्ठा तरी जपा.
शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव होईल, असे काम करता आले नाही तरी त्यांच्या नगरीचा अपमान होणार नाही, याची खात्री देता येणार नाही का? कोल्हापूर महापालिकेची निवडणूक येत्या आॅक्टोबरमध्ये होणार आहे. तोपर्यंत महापौर राजीनामा देणार नाहीत, असेच दिसते. त्यामुळे लाच प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या महिला कोल्हापूरच्या प्रथम नागरिक राहणार आहेत. या सर्व प्रकरणात राष्ट्रवादी कॉँग्रेसची बदनामी होईल, याकडे इतर राजकीय पक्ष डोळे लावून पाहत बसले आहेत. मात्र तृप्ती माळवी यांना नेत्यांना तसेच पक्षाला आव्हान देण्याचे बळ कोठून आले, याचा शोध लागणे आवश्यक आहे. याची सर्वांना माहिती असेल तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक आहे. अन्यथा या प्रकरणात महापौरपदाच्या अप्रतिष्ठेबरोबरच या पक्षाचीही कोल्हापूर शहरात राहिलेली प्रतिष्ठा संपणार आहे.