वाचनीय लेख - मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या माणसांचे पुढे काय होते?

By Shrimant Mane | Published: November 25, 2023 07:19 AM2023-11-25T07:19:04+5:302023-11-25T07:19:28+5:30

जीवघेण्या प्रसंगांतून जाताना खोलवर रुतलेली भीती आयुष्यभर पिच्छा पुरवतेच, शिवाय ज्यांना मृत्यू स्पर्श करून गेला, त्यांच्या पुढील पिढ्यांतही हा ‘ताण’ दिसतो!

Readable article - What happens next to people who come out of the jaws of death? | वाचनीय लेख - मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या माणसांचे पुढे काय होते?

वाचनीय लेख - मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या माणसांचे पुढे काय होते?

श्रीमंत माने

पाच वर्षांपूर्वी, २०१८ च्या जून-जुलैमध्ये थायलंडच्या थाम लाँग गुहांमधून बारा किशोरवयीन खेळाडू व त्यांचे सहायक प्रशिक्षक सुखरूप बाहेर आले होते. त्या बचावकार्याची जगभर चर्चा झाली. अनेकांना हेही आठवत असेल, की त्या वाइल्ड बोअर (थाई भाषेत मू पा) फुटबॉल संघाचा किशोरवयीन कर्णधार डाँगफेट फ्रॉमठेप याचा वाढदिवस गुहेतच साजरा झाला होता. डाेम या टोपणनावाने डाँगफेट ओळखला जायचा. या डोमचा गेल्या फेब्रुवारीत इंग्लंडच्या लेस्टरशायरमधील ब्रुक हाउस कॉलेजमध्ये आकस्मिक मृत्यू झाला. तो इंग्लंडमध्ये कसा, तर त्या घटनेनंतर तीन खेळाडूंना थायलंडचे नागरिकत्व, तर डोमला इंग्लंडची फुटबॉल स्कॉलरशिप मिळाली. सतरा वर्षांचा डोम खोलीत बेशुद्धावस्थेत आढळला. उपचारादरम्यान व्हेंटिलेटरवर त्याचा प्राण गेला. त्याच्यावर इंग्लंडमध्येच अंत्यसंस्कार झाले. माता-पित्यांना त्याची रक्षा मायदेशात आणून बौद्ध धर्मानुसार विधी करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागले. अलीकडे ऑक्टोबरमध्ये कोर्टाने निर्वाळा दिला की, डोमचा मृत्यू घातपात वगैरे नाही, अपघात किंवा आत्महत्या असावी. त्याच्या मृत्यूची नेमकी कारणे अजूनही समजलेली नाहीत. पुराच्या पाण्याने भरलेल्या गुहांच्या समूहात जीवन-मृत्यूच्या हिंदोळ्यावर काढलेल्या अठरा दिवसांची भीती अजून त्याच्या मनात होती का? 

उत्तराखंडमध्ये उत्तर काशीजवळच्या सिलक्यारा बोगद्यात गेल्या १२ नोव्हेंबरपासून अडकलेल्या ४१ मजुरांच्या निमित्ताने थायलंडमधील गुहांमधील बचावकार्याची अनेकांना आठवण झाली. मृत्यूच्या सावटाखाली गेली पंधरा दिवस व रात्री या मजुरांनी कशा काढल्या असतील आणि हे भयंकर अनुभव किती दिवस त्यांचा पिच्छा पुरवतील, ही चर्चा सगळीकडे आहे. अशा जीवघेण्या प्रसंगांमध्ये मनात व शरीरात खोलवर रुतून बसलेली भीती आयुष्यभर पिच्छा पुरवतेच, शिवाय त्यापुढेही बरेच काही असते. 

अमेरिकेतील ९/११ हल्ल्याच्या वेळी वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये असलेल्या १८७ गर्भवतींच्या प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात तपासणीची एक मोहीम मॅनहटनमधल्या माउंट सिनाई येथील इकाहन स्कूल ऑफ मेडिसिनने राबविली. अशा घटनांचा मानसिक आरोग्यावर होणारा दुष्परिणाम, ताण, भीती, अस्वस्थतेचा अभ्यास करणाऱ्या राचिल येहुदा या मोहिमेच्या प्रमुख होत्या. ट्विन टॉवर्सवर आदळलेली विमाने, लोकांनी जिवाच्या आकांताने इमारतींबाहेर उंचावरून मारलेल्या उड्या, त्यातही गेलेले जीव,  शेकडो मृत्यू, जखमींचा आक्रोश वगैरेचा मोठा धक्का गर्भवतींना बसला होता. त्या घटनेच्या भयावह आठवणी, झोपेतच दचकून जागे करणारी दु:स्वप्ने, भावनिक सुन्नपणा अशा पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर्स (पीटीएसडी) सगळ्या जणींमध्ये होत्याच. शिवाय, जन्माला आलेल्या बाळांचे वजन कमी होते. बाळांच्या तपासणीत दिसले की, कॉर्टिसॉल हार्मोनचे प्रमाण खूपच कमी आहे. विशेषत: ९/११ वेळी गरोदरपणाच्या अखेरच्या तिमाहीत असलेल्यांच्या अपत्यांमध्ये हे प्रमाण अधिक कमी होते. हिंसाचार, रक्तपात, मृत्यू अशा घटनांमुळे बसणाऱ्या मानसिक आघाताच्या केंद्रस्थानी कॉर्टिसॉल आहे. हे एक स्टिरॉइड हार्मोन आहे. दोन्ही मूत्रपिंडांच्या वरच्या बाजूला ॲड्रेनल ग्लँडस् म्हणजे अधिवृक्क ग्रंथी असतात. त्या अंतस्रावी ग्रंथींमधून ॲड्रेनलिन, अल्डोस्टिरोन व कॉर्टिसॉल ही संप्रेरके स्रवतात. त्यांचा समतोल एकूणच आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. खूप ताण आला तर या हार्मोन्सचे प्रमाण वाढते आणि ती रक्ताभिसरण व्यवस्थेत झिरपतात. याउलट, अधिक खोलवर मानसिक धक्क्यावेळी त्याचे प्रमाण कमी होते. चिंताजनक बाब म्हणजे संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणारे हे परिणाम ज्यांनी मृत्यूंचे थैमान अनुभवले, ज्यांना मृत्यू स्पर्श करून गेला, त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्येही जाणवत राहतात. कारण, कॉर्टिसॉल असमतोलाचा परिणाम प्रजनन प्रक्रियेवर होतो. शुक्राणू व स्त्रीबीजांडांचे गुणधर्म बदलतात. जनुकीय रचनेतील मिथाईल एन्झायम कमी अधिक होतात. इपिजेनेटिक्समध्ये या प्रक्रियेला मिथायलेशन म्हणतात. NR३C१ हा जनुकीय रिजन अधिक संवेदनशील बनतो.

राचिल येहुदा व त्यांच्या सहकाऱ्यांना १९९० च्या दशकात कॉर्टिसॉलचे अल्प प्रमाण, तसेच पीटीएसडीचा प्रभाव नाझी नरसंहारातून वाचलेल्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये आढळला होता. जॉन मेसान, अर्ल गिलर व थॉमस कोस्टन यांनी १९८० च्या दशकात असाच अभ्यास व्हिएतनाम युद्धात वाचलेल्या सैनिकांमध्ये केला. त्यांचा तो रिसर्च पेपर अशा घटनांचे परिणाम पुढच्या पिढ्यांमध्येही जाणवण्याविषयीचे पहिले अधिकृत निदान होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नेदरलँडमध्ये भयंकर दुष्काळ पडला आणि नाझींनी अन्नधान्याची रसद थांबवली. प्रचंड प्रमाणात भूकबळी गेले. त्यातून वाचलेल्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्येही हेच आढळले. 

हा सर्व अभ्यास पाश्चात्त्य देशांतला आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. असेच काही भारत-पाक फाळणीवेळी अमानुष अत्याचार भोगलेल्यांबाबत घडले असावे. सिरियापासून म्यानमारपर्यंतच्या अलीकडच्या विस्थापनावेळी अथवा कोरोना काळात शेकडो, हजारो किलोमीटरची पायपीट केलेल्या अभागी मजुरांचेही मन व शरीर अजूनही या अवस्थेतून जात असावे. इतर देशांत अशा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपदांनंतर सखोल अभ्यास केला जातो. आपल्याला मात्र विस्मरणाचा रोग जडला आहे. 

(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक, आहेत)

shrimant.mane@lokmat.com

Web Title: Readable article - What happens next to people who come out of the jaws of death?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.