रघुनाथ-गाथा
By Admin | Updated: February 26, 2015 23:34 IST2015-02-26T23:34:22+5:302015-02-26T23:34:22+5:30
रामकथा आपल्या आवडीचा विषय आहे. रामकथेतील एका उद्बोधक प्रसंगाच्या अनुषंगाने चिंतन अप्रस्तुत होणार नाही. उलट अनेकार्थाने उपयुक्त ठरणारे आहे.

रघुनाथ-गाथा
ज्ञानसाधू वा.गो. चोरघडे
रामकथा आपल्या आवडीचा विषय आहे. रामकथेतील एका उद्बोधक प्रसंगाच्या अनुषंगाने चिंतन अप्रस्तुत होणार नाही. उलट अनेकार्थाने उपयुक्त ठरणारे आहे. या प्रसंगातून रामचंद्राने आपला स्थायी पत्ताच सांगून टाकला आहे. राम स्वत: निवासस्थानाचे शोधात आहे. ते विचारतात, आम्हाला राहायला एखादे सुरक्षित स्थान सांगा. हा प्रश्न रामाने वाल्मीकीला विचारला आहे. वनवासात निघायला कारण झालेली परिस्थिती सांगतात.
राघव: प्रांजलि: प्राह
वाल्मिकिं विनयान्वित:
पितुराज्ञां पुरस्कृत्य
दंडाकाननागता वयम्
अत्यंत विनयाने रामचंद्राने परिस्थितीचे कथन केले. पित्याच्या आज्ञेला अनुसरून आम्ही दण्डकारण्यात आलो आहो. पण आता लक्ष्मण आणि सीतेसह इथे कुठे राहायचे? आम्हाला सुरक्षित स्थान सांगा. वाल्मीकी उत्तरले, प्रभू ! तूच सर्व लोकांचे निवासस्थान आहे. त्याचप्रमाणे हे सर्व जीव तुझी राहण्याची ठिकाणे आहेत, तथापि तू आता स्वत:साठी जागा विचारली आहेस तेही सांगून टाकतो. हे रघुश्रेष्ठा ! जे शांत चित्त आहे, ज्यांच्या ठिकाणी कुठलीही भेद बुद्धी नाही,
जे कोणाचाही द्वेष करीत नाही, ज्यांना समवृद्धी लाभली आहे, धर्म अधर्म या भावना सांडून ज्यांना नित्य तुझेच स्मरण आहे, असे जे सेवा तत्पर निरंहकारी आहेत, ज्यांच्या अंत:करणातील सर्व विकार निघून गेले आहेत, इतकेच नव्हे तर अप्रिय वस्तूच्या प्राप्तीने ज्यांच्या ठिकाणी द्वेष उत्पन्न होत नाही, तसेच प्रिय वस्तूच्या लाभाने जे हर्षित होत नाही, तर या मायेविषयी उदासीन राहून, जे सद्गुण समुद्र असलेल्या तुला नित्य स्मरतात त्यांच्या अंत:करणासारखी दुसरी सुरक्षित जागा नाही. तिथे आपण सहकुटुंब राहू शकता.
तुलसीदासांनी हा प्रसंग अत्यंत बहारीने सांगितला आहे. हा रामाचा स्थायी पत्ता आहे. त्यासाठी गीताईतील काही श्लोकांचे स्मरण उपकारक ठरेल.
कोणाचा न करी द्वेष
दया मैत्री वसे मनी
मी माझे न म्हणे सोशी
सुख दु:खे क्षमा बळे
सदा संतुष्ट जो योगी
संयमी दृढ निश्चियी
अर्पी मज मनो-बुद्धि भक्त
तो आवडे मज
जो न लोकास कंटाळे
ज्यास कंटाळली न ते
हर्ष शोक भय क्रोध नेणे
तो आवडे मज
इत्यादी या श्लोकात ईश्वरानी सुद्धा आपली आवड सांगितली आहे.
या निमित्ताने हे धर्म-सार असलेले चिंतन उपयुक्त ठरेल.