पुनश्च ‘फील गुड’!
By Admin | Updated: January 28, 2016 03:31 IST2016-01-28T03:31:18+5:302016-01-28T03:31:18+5:30
केन्द्रातील रालोआच्या पूर्वीच्या राजवटीवर आधारित ‘फील गुड’च्या प्रचाराचा दणका या आघाडीने उडवूनदेखील देशातील मतदारांनी तो फारसा मनावर न घेऊन २००४च्या निवडणुकीत

पुनश्च ‘फील गुड’!
केन्द्रातील रालोआच्या पूर्वीच्या राजवटीवर आधारित ‘फील गुड’च्या प्रचाराचा दणका या आघाडीने उडवूनदेखील देशातील मतदारांनी तो फारसा मनावर न घेऊन २००४च्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआला सत्तेवर आणले होते. तेव्हांच्या प्रचारातील फील गुडचा संदर्भ मतदारांशी होता. म्हणजे मतदारांना ‘गुड’ जाणवत असल्याचा रालोआ आणि खरे तर भाजपाचा दावा होता. पण अलीकडेच एका खासगी संस्थेने जे सर्वेक्षण केले आहे त्याचे निष्कर्ष खुद्द रालोआ आणि विशेषत: भाजपा आणि पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना ‘गुड’ ‘फील’ व्हावे असे आहेत. सर्वेक्षणात देशातील ज्या लोकाना सहभागी करुन घेतले गेले त्यातील ४६ टक्के लोकांच्या मते म्हणे देशाचा सध्याचा कारभार ‘सरासरीपेक्षा खूपच वरचा’ आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे ४६ टक्के लोक मोदी सरकारच्या कारभारावर खूष असताना त्याहून अधिक म्हणजे ५४ टक्के लोक खुद्द मोदी यांच्याच प्रेमात पडल्याचे सर्वेक्षणातून आढळून आले आहे. तरीदेखील आजच्या या ‘फील गुड’ वातावरणात लोकसभेची निवडणूक पार पडली तर रालोआच्या आजच्या सदस्यसंख्येत ३८ जागांची घट होऊन ती ३०१ पर्यंत येईल असेही हे सर्वेक्षण सांगते. त्याचबरोबर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआच्या जागांमध्ये ४६ जागांची वाढ होईल असाही या सर्वेक्षणाचा एक निष्कर्ष आहे. म्हणजे ‘फील गुड’ येथेही आणि तेथेही! पण मोदी आणि त्यांच्या सरकारने खुशालून जावे अशी आणखीही एक बाब समोर आली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीच्या शर्यतीत सध्या आघाडी प्राप्त केलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी एका चित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारताची वारेमाप स्तुती केली आहे. ‘इंडिया इज डुईंग ग्रेट’ पण त्याची कोणीच चर्चा करीत नाही, असे या महोदयांनी म्हटले आहे. पंतप्रधान झाल्यापासून नरेन्द्र मोदी यांनी त्यांचे सारे लक्ष विदेश भ्रमणावर केन्द्रीत केल्याचा हा परिणाम म्हणायचा? पण हे ट्रम्प महोदय अत्यंत वाचाळ आणि बेभरवशाचे मानले जातात. संपूर्ण जग नि:मुस्लीम करण्याची वल्गना करणारे हेच ते सद्गृहस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी प्रशंसा केली म्हणून हुरळून जावे असे त्यात काहीही नाही. तोच प्रकार खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा. विशेषत: देशात कुठेही आणि कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या की खासगी सर्वेक्षणांचे पेव फुटत असते. त्यांच्या निष्कर्षांचे पितळही अधूनमधून उघडे पडत असते. पण अलीकडेच पार पडलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीविषयी केल्या गेलेल्या सर्वेक्षणांच्या निष्कर्षांचे तेथील मतदारांनी अक्षरश: धिंडवडेच काढले होते. त्यातून मोदी सरकारच्या कारभारासंबंधी सव्वाशे कोटी जनता आणि साधारणपणे साठ कोटी मतदारांच्या वतीने काही हजारातील लोकानी व्यक्त केलेला अभिप्राय प्रातिनिधिक कसा काय समजला जाऊ शकतो? तरीदेखील मियाँ गालिब यांचे शब्द उधारीत घेऊन ‘दिल के बहलाने के लिये खयाल अच्छा है’ असे म्हणता येऊ शकेल.