शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

बुद्ध, फुले, गांधी, आंबेडकरांचा सम्यक विचार

By admin | Updated: April 12, 2017 03:25 IST

२०१७ साली अवघ्या जगावर वंश, धर्म, जात परकीय द्वेष यांसारख्या संकुचित विभाजनवादी नि आक्रमक राष्ट्रवादाचे सावट पसरले आहे. ब्रिटनचा व काही युरोपियन

- प्रा. एच. एम. देसरडा२०१७ साली अवघ्या जगावर वंश, धर्म, जात परकीय द्वेष यांसारख्या संकुचित विभाजनवादी नि आक्रमक राष्ट्रवादाचे सावट पसरले आहे. ब्रिटनचा व काही युरोपियन देशांचा वंश, वर्ण, धर्म, वर्चस्ववादी उजव्या पक्षांच्या बाजूने झुकाव, अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या कडव्या अतिउजव्या उपटसुंभ भूमाफियाचा (गोंडस शब्दात रिअल इस्टेटवाल्याचा) राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला विजय आणि त्यानंतर चाललेला कारभार या खचितच चिंतेच्या बाबी आहेत. सीरिया, तुर्कस्थान, इराक, सौदी यात चाललेला हैदोस व हिंसाचार, अगदी आपल्या शेजारच्या बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हल्ले यांनी अवघे जग चिंताक्रांत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत व २०१७ च्या उत्तर प्रदेशानंतर खुद्द आपल्या देशात आततायी अट्टाहास, विद्यार्थ्यांवर राष्ट्रद्रोहाचे खटले या सर्व बाबी चिंताजनक असून, इंटरनेटच्या जमान्यातील मानव समाज मध्ययुगीन अंधकारात लोटला जात आहे. खरे तर हे भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिष्ठान व मूल्यांना सरळसरळ आव्हान आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने याची चर्चा गांभीर्याने होणे नितांत गरजेचे आहे. जात, वर्ग, पुरुषसत्ताक व्यवस्था हे तर मुळी सर्व विषमतेचे मुख्य कारण आहेच. भरीस भर म्हणजे सरंजामी, भांडवली राजकीय अर्थकारणाने श्रमजीवी जनसमुदायाला आपल्या कह्या, कब्जात ठेवण्यासाठी सर्रासपणे बळाचा वापर केला गेला. आजही सर्रास करीत आहेत. दुसऱ्या महायुद्धातील प्रचंड हिंसा नि वंशसंहाराच्या परिणामी मानव समाजाच्या वाटचालीबाबत काही मूलभूत प्रश्न विचारले जाऊ लागले. औद्योगिक क्रांतीच्या लगोलग झालेली अमेरिकेतील स्वातंत्र्याची घोषणा, फ्रेंच राज्यक्रांती आणि ज्याला ज्ञानोदय व प्रबोधन पर्व म्हणतात तो विवेकवाद यामुळे लोकशाही मूल्यसंकल्पनेला गती मिळाली. वसाहतवाद व व्यापारी भांडवलशाहीचे स्थित्यंतर औद्योगिक भांडवलशाहीत होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बळावर मानव निसर्गावर हुकूमत गाजवू लागला. त्याला कैफ चढला. गंमत म्हणजे अमेरिकेचे ट्रम्प, रशियाचे पुतीन, चिनचे झी नि भारताचे मोदी हे एका सुरात हीच विकास तंत्रज्ञान-उत्पादनाची भाषा बोलत आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर सरंजामी भांडवली सत्ताधीशांचे, महाजन अभिजन वर्गाचे चैनचोचले पुरे करण्यासाठी नाना तऱ्हेच्या वस्तू व सेवांचे उत्पादन लक्षणीय प्रमाणात वाढवले गेले. अर्थात, त्यांच्या दिमतीला असलेला संघटित कामगार-कर्मचारी वर्ग, सैन्य दल, पोलीस यंत्रणा यांनाही या वस्तुसेवांचा लाभ मिळाला. १९ व्या शतकात व २० व्या शतकाच्या पूर्वार्धात मुख्य राजकीय विवाद सामाजिक, आर्थिक विकास, उत्पादन वाढ व जनकल्याणासाठी भांडवलशाही व्यवस्था असावी की साम्यवादी-समाजवादी व्यवस्था हा होता. रशियन व चिनी क्रांती म्हणजे उत्पादन साधनांची सामाजिक मालकी अशी प्रणाली रूढ झाली. नंतरच्या काळात सरकार की बाजार ही चर्चा प्रकर्षाने पुढे आली. यूएसएसआरच्या अधिपत्याखालील सोव्हिएत राजवटीचे पतन झाल्यानंतर व चीनने बाजारी समाजवादाचा स्वीकार केल्यानंतर ‘जागतिकीकरणाचे’ नवे युग अवतरले.गेल्या पन्नास-साठ वर्षांत भांडवलाला विशेषत: वित्तीय भांडवलाला जगभर मुक्त संचार करण्याची मुभा मिळाली. २००८ च्या आर्थिक घसरणीनंतर वित्तीय भांडवलशाहीचा डोलारा टिकणार नाही, त्याच्या अंगभूत मर्यादा आहेत, हे जगभरच्या सामान्य लोकांना जाणवू लागले. उत्तरोत्तर प्रचलित विकासाचे विनाशकारी स्वरूप दररोज अधिकाधिक उघड होत आहे. आधुनिक औद्योगिक अर्थरचना, जीवनशैली व उत्पादन पद्धती ही निसर्ग आणि मानवासाठी हानिकारक असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले. यासाठी मानवाला आपल्या जीवनशैलीत तातडीने आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. १९९१ च्या आर्थिक सुधारणा लागू झाल्यानंतरदेखील केवळ काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारांचेच नव्हे, तर भाजपाप्रणीत युती सरकारांचे व्यवहारदेखील कंत्राटे देऊन, म्हणजे खंडणी अगर लाच घेऊनच चालले आहेत. अंबानी-अडाणी व अन्य उद्योगसमूह रिअल इस्टेटवाले (?) यांना यूपीए असो की, वाजपेयी व मोदींचे एनडीए पाहिजे ती संसाधने मिळवण्यास अगर जनहित व पर्यावरणीय कायदे धाब्यावर बसविण्यास काही अडचण नाही. पैसा फेको, लूट करो, स्वीस बँक या चाहे जहाँ रखो, विकासाच्या गोंडस नावाने हा सर्व व्यापारी उद्योग बरकतीत चालू आहे. ‘भारत माता की जय! अच्छे दिन, सब का विकास, गांधी-सरदार पटेल-आंबेडकर के सपनों का भारत! मन की बात : नये भारत का निर्माण - १२५ करोड भारतवासीयों के लिए !’ या केवळ घोषणाच.पर्याय : या गर्तेतून बाहेर पडण्याचा मार्ग काय? सर्वप्रथम विकास म्हणजे काय, कुणाचा व कशाचा विकास, ही बाब नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. विकासाची मुख्य कसोटी समता व सातत्य असावी. प्रामुख्याने विकास निसर्ग - स्नेही लोकाभिमुख, स्त्रीकेंद्री असावयास हवा. येथे हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे की, भारतीय संविधानाचे अधिष्ठान समता आहे. मात्र, आपल्या देशात दररोज विषमता वाढत आहे. वरच्या एक टक्का श्रीमंतांकडे तळाच्या ५० टक्के जनतेपेक्षा अधिक संपत्ती व उत्पन्न आहे, तर ४७ टक्के बालके कुपोषित, ३० टक्के भारतीयांना दारिद्र्य व अभावग्रस्त जीवन जगावे लागते. सर्वाधिक संतापजनक बाब म्हणजे तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांवर आत्महत्त्या करण्याची नौबत आली. शरमेची बाब म्हणजे त्यातील सर्वाधिक महाराष्ट्रातील शेतकरी आहेत. भारताच्या व महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करता फुल्यांना अभिप्रेत असलेली जैवशेती उत्पादन पद्धती, सार्वत्रिक शिक्षणपद्धती, शूद्र, अतिशूद्रांचे शोषण थांबवणारी अर्थव्यवस्था, श्रमप्रतिष्ठेला अव्वल स्थान देणारी समाजरचना ही आज काळाची गरज आहे. नेमकी हीच बाब गांधींनी पुरस्कृत केली. त्यांनी सांगितले की, ‘ऐच्छिक गरिबी, सादगी व स्वावलंबन हाच अर्थरचनेचा पाया असावा.’ बाबासाहेबांनी दलितांच्या उत्थानासाठी शिक्षणाला गुरुकिल्ली मानले. अर्थात ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा त्यांचा मूलमंत्र आपण विसरलो. खरे तर बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारून ऐहिक व आध्यात्मिक जीवन सुधारण्यासाठी मध्यम मार्ग निवडला. बौद्ध धम्माचा गाभा भोगविलासाचा अव्हेर करून ‘तृष्णाक्षय’ करणे हा आहे. हवामान बदलाचे वास्तव लक्षात घेता २१ व्या शतकात शाश्वत विकासप्रणालीला अनन्यसाधारण स्थान आहे. प्रज्ञा, करुणा व शील या त्रयींद्वारे माणूस भोगवादाच्या गर्तेतून मुक्त होऊ शकतो. शाश्वत विकास हा आज परवलीचा शब्द असून, जागतिक तपमानवाढीच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी बुद्धप्रणीत मध्यम विकास मार्ग ही आज भारत व जगाची गरज आहे. येथे संविधानात प्रतिपादन केलेले समतेचे तत्त्व आणि बौद्ध धम्म स्वीकारून पुरस्कृत केलेली अहिंसक जीवनशैली व शाश्वत विकासप्रणाली हे बाबासाहेबांचे भारतालाच नव्हे, तर साऱ्या जगाला मौलिक योगदान आहे. धम्मदीक्षा घेतल्यानंतर काही महिन्यांतच त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांना यासाठी वेळ मिळाला नाही, ही खेदाची बाब होय.सारांशरूपाने असे म्हणता येईल की, बुद्ध, फुले, गांधी व आंबेडकर विचारांच्या अनुयायांनी आपापले संकुचित स्वार्थ व हितसंबंध जपण्यासाठी या महापुरुषांना एकमेकांच्या विरुद्ध उभे केले. विभूतिपूजा अथवा मूर्तिभंजनाचा खटाटोप चालू ठेवला. या गर्तेतून बाहेर पडून या चारही क्रांतिकारी महामानवांच्या शिकवणुकीचे सार लक्षात घेऊन समतावादी चिरस्थायी विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हेच त्यांना खरे अभिवादन आहे. अनुयायी मंडळींनी महापुरुषांना सवंगपणे डोक्यावर घेण्याऐवजी गांभीर्याने डोक्यात घेणे गरजेचे आहे. जयंती-पुण्यतिथीला त्यांचा जयघोष करून, पुष्पांजली अर्पण करणे पुरेसे नाही, तर त्यांच्या विचारावर इमानदारीने अंमल करणे हाच प्रबुद्ध मार्ग आहे. बाबासाहेबांना तीच सच्ची आदरांजली होय.(लेखक नामवंत अर्थतज्ज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य आहेत.)