लोकसभेच्या निवडणुकीची तयारी: काँग्रेस, दुसऱ्या राष्ट्रवादीची जबाबदारी कोणाकडे?

By अतुल कुलकर्णी | Published: January 8, 2024 10:29 AM2024-01-08T10:29:41+5:302024-01-08T10:30:06+5:30

ही लढाई तिरंगी व्हावी यासाठी भाजपच प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.

Preparations for Lok Sabha Elections: Congress, Second NCP Who Has the Responsibility? | लोकसभेच्या निवडणुकीची तयारी: काँग्रेस, दुसऱ्या राष्ट्रवादीची जबाबदारी कोणाकडे?

लोकसभेच्या निवडणुकीची तयारी: काँग्रेस, दुसऱ्या राष्ट्रवादीची जबाबदारी कोणाकडे?

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

लोकसभेच्या निवडणुकीची तयारी भाजपने कधीच सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे काही खासदार भाजपच्या तिकिटावर लढवण्याची चाचपणी करत आहेत. काँग्रेस, उरलेली राष्ट्रवादी आणि उरलेली शिवसेना यांच्यात जागा वाटपाची बोलणी सुरू आहे, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात काय चालू आहे हे पक्षातल्याच अनेक नेत्यांना माहिती नाही. या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकीत जर तिकीट हवे असेल, तर आता लोकसभेला काम करून दाखवावे लागेल, असे सांगून भाजपने गल्लीपासून मुंबईपर्यंतची बांधणी करणे सुरू केली आहे.

प्रत्येकाला आशेला लावून ठेवण्याची ताकद भाजपकडे आहे. सध्याचे मुंबईतील राजकीय वातावरण पाहता शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष नावाला मुंबईत उरला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची मुंबईत एकेक वीट रचून बांधणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती कधी पूर्ण होईल हे त्यांनाही सांगता येणार नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत कार्यकर्ते भरपूर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या विषयीची सहानुभूती कमी करण्याचा कितीही प्रयत्न झाला, तरीही मुंबईत त्याचा फारसा परिणाम दिसत नाही. आजही कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. उद्धव आणि आदित्य ठाकरे दोघांनी निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतून पदयात्रा काढायचे जरी ठरवले तर लोक त्यांच्यासोबत आहेत ते कळेल. मात्र, ते त्यांच्या स्वभावानुसार असे काही ठरवतील असे वाटत नाही.

मनसेचे राज ठाकरे यांच्यासोबत तरुण पिढी आहे. राज ठाकरे देखील रस्त्यावर उतरले तर लोक त्यांच्यासोबत जातील, पण ते कोणासोबत जाणार यावरही राजकीय गणिते थोड्याफार फरकाने कमी जास्त होऊ शकतात. शिंदे गटाकडे मुंबईत नेते आहेत, पण कार्यकर्ते किती येतील, याची अजूनही चाचपणी सुरू आहे. भाजपने मात्र संघटनात्मक बांधणी मजबूत केलेली असल्यामुळे त्यांच्याकडे नेते आणि कार्यकर्ते दोघांचीही कमी नाही. भाजप ज्या पद्धतीने इच्छुकांना आधी लोकसभेला काम करा, नंतर बघू असे सांगू शकते, तसे सांगण्याची क्षमता, ताकद असणारा नेता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मुंबईत आज तरी नाही. जे आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघाच्या पलीकडे काहीही पडलेले नाही.

अजित पवार यांनी वेगळा संसार थाटल्यानंतर जुन्या घरात मोजकीच भांडीकुंडी घेऊन काही लोक बसले आहेत. जे आहेत त्यांना आपल्या रिकाम्या घराचे वासे खायला उठले आहेत. त्यांना जुन्या घराची रंगरंगोटी करावी, चार नवे भाडेकरू आणावेत, असे देखील वाटत नाही. मुंबईत राष्ट्रवादीचा किल्ला सुरुवातीच्या काळात सचिन अहिर यांनी सांभाळला. काही काळ जयंत पाटील यांनी त्यांना मदत केली. अर्थात, दोघांचे काही विषय ‘आवडीचे’ असल्यामुळे एकमेकांची मदत एकमेकांना पुरेशी ठरली. आता सचिन अहिर, उद्धव ठाकरे यांच्या घरात आहेत. नवाब मलिक यांनी काही काळ मुंबईत राष्ट्रवादीचे मूळ घर मजबुतीने सांभाळले खरे. मात्र, आता आपण कोणाच्या घरात राहायला जायचे, हा त्यांच्यापुढे पडलेला प्रश्न आहे. अजित पवारांनी समजा नव्या घरात घेतले तर त्या घराचे घरमालक चिडतील अशी भीती स्वतः अजित पवारांना आहे. त्याचा अनुभव त्यांनी नागपुरात घेतला आहे. जुन्या घरात राहावे तर पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती त्यामुळे मलिक स्वतःच द्विधा मन:स्थितीत आहेत.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मुंबईत चेहरा नाही आणि माणूसही नाही..! मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून राखी जाधव यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्या कधी मुंबईतल्या पोस्टरवरही दिसल्या नाहीत आणि प्रत्यक्षातही. अशा पार्श्वभूमीवर शरद पवारांची राष्ट्रवादी लोकसभा निवडणुकीत किती जागा लढवणार आणि कशा, हा प्रश्नच आहे.

मुंबई काँग्रेसची अवस्था फार वेगळी नाही. काँग्रेस आज जरी एकसंध दिसत असली तरी आतून ती दहा दिशेला दहा तोंडे अशी विखुरलेली आहे. सगळ्या नेत्यांना एकत्र बांधून ठेवू शकेल, असा एकही नेता महाराष्ट्रात मुंबई काँग्रेसकडे नाही. संजय निरुपम, भाई जगताप यांच्या काळात प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांसोबत त्यांचा संवाद तरी होत होता. आता मुंबई काँग्रेसचा आणि आमचा संवादच उरलेला नाही, असे ज्येष्ठ नेते खासगीत सांगतात. विधानसभानिहाय तसेच मुंबईतील प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी, मतदारांची माहिती यावर फारसे काम होताना दिसत नाही. होत असले तरी ते फार प्रभावी आहे, असेही नाही. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष माध्यमांना जिथे दुर्मिळ आहेत तिथे त्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना किती उपलब्ध असतील, हा प्रश्न आहे. त्याउलट भाजपचे मंत्री असो की, आमदार, कार्यकर्त्यांना, माध्यमांना उपलब्ध असतात. खासगीत बोलतो म्हणून काही गोष्टी सांगतात. मात्र, त्यांचा सगळ्यांशी संवाद आहे. काँग्रेसकडे संवादाचाच अभाव आहे. काँग्रेसचे दोन नेते एकत्र भेटले की हजर नसलेल्या तिसऱ्या नेत्याच्या तक्रारी एकमेकांकडे करत राहतात.

अशाने पक्ष कसा वाढणार..? सगळ्यांना विश्वासात घेऊन नियोजन करावे आणि पक्ष मजबुतीसाठी रस्त्यावर उतरावे, असे कोणतेही ध्येय धोरण मुंबई काँग्रेसच्या नेत्यांसमोर दिसत नाही. कदाचित ते त्यांनी त्यांच्या मनातल्या मनात ठरवले असेल. त्यामुळेच मुंबई लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना असाच सामना पाहायला मिळू शकतो. ही लढाई तिरंगी व्हावी यासाठी भाजपच प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Preparations for Lok Sabha Elections: Congress, Second NCP Who Has the Responsibility?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.