हे राजकीय ढोंगच !
By Admin | Updated: April 24, 2017 23:29 IST2017-04-24T23:29:32+5:302017-04-24T23:29:32+5:30
म. गांधी आणि पं. नेहरू यांच्यावर टीका करणारे, आपल्यावर टीका करणारे असले तरी चालतील; पण त्यांना आपल्या रंगात रंगवायचे

हे राजकीय ढोंगच !
म. गांधी आणि पं. नेहरू यांच्यावर टीका करणारे, आपल्यावर टीका करणारे असले तरी चालतील; पण त्यांना आपल्या रंगात रंगवायचे हा भाजपाच्या नेत्यांचा सध्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी आंबेडकरांचा उदोउदो चालविला आहे. (तसे करताना बाबासाहेबांच्या हिंदू धर्मावरील व हिंदुत्वाच्या कडव्या स्वरूपावरील टीकेकडे दुर्लक्ष करण्याचेही त्यांनी ठरविले आहे.) तोच प्रयोग त्यांनी सावरकरांबाबतही आता चालविला आहे. (सावरकरांचा हिंदुत्ववाद संघाच्या हिंदुत्ववादाहून सर्वस्वी वेगळा असला तरी ते गांधीजींचे टीकाकार आहेत ही बाब त्यांना पुरेशी वाटणारी आहे.) ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ असे म्हणणाऱ्या आंबेडकरांनी धर्मातील कडव्या प्रवृत्तींना व कालबाह्य परंपरांना विरोध केला आणि त्याला उदारमतवादी व सर्वसमावेशक वळण देण्यासाठी आयुष्यभर परिश्रमही केले. मात्र त्याच्यात तशी सुधारणा होत नाही हे स्पष्ट झाले तेव्हा त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला. संघ व भाजपाचा कर्मठ हिंदुत्ववाद मात्र त्यानंतरही शाबूत व मजबूत राहिला. तो तसाच राखून त्यांनी आंबेडकरांना जवळ करण्याचा एक प्रचंड फसवा उद्योग सध्या चालविला आहे. आंबेडकरांचे संविधान मान्य नाही, त्यांचा उदारमतवाद मान्य नाही, त्यांची सर्वसमावेशक राष्ट्रवादाची कल्पना मान्य नाही, मात्र त्यांचे नाव, त्यांची स्मारके व त्यांचे पुतळेच तेवढे मान्य आहेत असे हे ढोंग आहे. मात्र आंबेडकरी जनतेच्या मनात बाबासाहेबांनी गांधींवर व नेहरूंवर केलेली टीका जोवर वापरता येते तोवर भाजपाला त्यांचे दैवत करणे मानवणारे आहे. नेमकी हीच बाब सावरकरांबाबतही खरी आहे. सावरकर हिंदुत्वनिष्ठ होते. पण त्यांची हिंदुत्वाची व्याख्याच संघ परिवाराच्या व्याख्येहून वेगळी होती व तिला छेद देणारी आहे. ‘भारतभूमीवर जो प्रेम करतो व तिला आपली मातृभूमी मानतो तो प्रत्येकच जण हिंदू आहे’ अशी त्यांची हिंदुत्वनिष्ठा भूविशिष्ट होती. या भूमीला मातृभूमी मानणारा इसम कोणत्याही धर्माचा असला तरी तो हिंदूच होय असे ते म्हणत. त्यांचा राष्ट्रधर्म, त्यांच्या धर्मनिष्ठेहून श्रेष्ठ व वरच्या दर्जाचा होता. त्याचमुळे संघ स्थापन होऊन ९० वर्षे झाली तरी ते संघस्थानाकडे वा त्यांच्या हिंदुत्ववादी विचाराच्या दिशेकडे कधी फिरकले नाहीत. संघाची हिंदुत्वाची व्याख्या, ‘जेथे हिंदू तेथे हिंदुस्थान’ अशी धर्मनिष्ठा आहे व ती ‘तेथे जर्मन तेथे जर्मनी’ या हिटलरच्या आक्रमक जर्मन राष्ट्रवादाजवळ जाणारी आहे. अमेरिका, आॅस्ट्रेलिया, युरोप व इस्रायलपासून थेट आशियाई देशात जेथे हिंदू राहतात तो साराच हिंदुस्थान अशी ही धारणा आहे आणि ती आक्रमक हिंदुत्ववादाचा पुरावा ठरणारी आहे. ‘भूमिविशिष्ट’ व ‘धर्मविशिष्ट’ अशा या दोन भूमिका परस्परभिन्नच नव्हे तर परस्परविरोधीही आहेत. त्याहूनही त्या दोहोंच्या भूमिकांचे वेगळेपण सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेत आणि संघाच्या परंपराविषयक श्रद्धेत आहे. सावरकर अस्पृश्यता हा हिंदूधर्मावरील कलंक आहे व तो तत्काळ संपविला पाहिजे अशी भूमिका घेत. उलट बाळासाहेब देवरस सरसंघचालक होतपर्यंत संघाने चातुर्वर्ण्य मान्य केला होता. सावरकर हे ‘गाय हा साधा पशू आहे. त्यात कुठलेही देवत्व नाही असे म्हणत आणि पुढे जाऊन गाय ही माता असेल तर बैल हा पिता आहे काय?’ असा उपरोधिक सवालही विचारीत. संघप्रणीत सरकारांनी आता चालविलेल्या गोवंशहत्या बंदीबाबतही सावरकरांचे विचार वेगळे आहेत. हिंदू हा धर्मच एकविचारी, एकारलेला वा एकांगी नाही. त्यात जन्माला आलेली माणसे गांधी, नेहरू आणि सावरकर यांच्याच नव्हे तर डांगे आणि रणदिवे यांच्यासोबतही जाणारी होती. ज्योती बसूंपासून ममता बॅनर्र्जींपर्यंत, यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत आणि लालबहादूर शास्त्रींपासून सोनिया गांधींपर्यंतच्या सर्व नेत्यांना हिंदूधर्म मान्य होता. मात्र त्या साऱ्यांनाच धर्म व राजकारण यातील सीमारेषा ठाऊक होत्या व त्या मान्यही होत्या. संघाची भूमिका या सीमारेषा मान्य न करणारी व राजकारणाला धर्मकारणाचे एकारलेले स्वरूप देण्याची व त्यातील परंपरांचे पुनरुज्जीवन करण्याची आहे. त्यांची अडचण, बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ही नाहीत. त्यांचे विचार हीच संघाची खरी अडचण आहे. त्यामुळे ते विचार बासनात गुंडाळून ठेवूनच त्यांना दैवत म्हणून शिरावर घ्यायचे हा त्यावरचा त्यांनी शोधलेला राजनीतीय तोडगा आहे. त्यांची आताची आंबेडकरभक्ती व सावरकरांच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उफाळून आलेली सावरकरनिष्ठा या प्रतीची आहे. ती तशीच समजून घेणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्याकडे एका देशव्यापी फसवेपणाच्या स्वीकाराचा दोष येणार आहे हे स्पष्टपणे लक्षात घ्यायचे आहे. एखाद्या पक्षाच्या वा पुढाऱ्याच्या मनात एकाएकी नव्या दैवतांची पूजा कशी उभी होते आणि तिचे नेमके हेतू कोणते असतात हे समजून घेणे जाणकारांचे काम आहे. परवापर्यंत जे महापुरुष त्यांनी जाणीवपूर्वक दूर ठेवले ते आताच त्यांना आपले का वाटतात, हे समजून घेणेही आपल्या राजकीय प्रगल्भतेत भर घालणारे आहेत. गांधी आणि नेहरू नकोत म्हणूनच त्यांचे टीकाकार एखाद्या संघटनेला डोक्यावर घ्यावेसे वाटत असतील तर त्यांचे इरादे फारसे खरे नसतात, हे येथे लक्षात घ्यायचे.