उत्कट न राही प्रतिमा
By Admin | Updated: April 21, 2016 03:53 IST2016-04-21T03:53:03+5:302016-04-21T03:53:03+5:30
प्रत्याक्षाहुनि प्रतिमा उत्कट असते असे नेहमीच म्हटले जाते. त्याची अनेक उदाहरणे देता येतील. पण वर्तमानकाळातील जिवंत उदाहरण म्हणजे ज्येष्ठ सिने कलावंत अमिताभ बच्चन

उत्कट न राही प्रतिमा
प्रत्याक्षाहुनि प्रतिमा उत्कट असते असे नेहमीच म्हटले जाते. त्याची अनेक उदाहरणे देता येतील. पण वर्तमानकाळातील जिवंत उदाहरण म्हणजे ज्येष्ठ सिने कलावंत अमिताभ बच्चन. त्यांच्या कारकिर्दीच्या प्रारंभ काळात ते माध्यमांशी अत्यंत तुसडेपणाने वागत असले तरी त्यांना सतत मिळत गेलेल्या यशामुळे त्यांच्या प्रत्यक्षातील प्रतिमेपेक्षा त्यांची अत्यंत उत्कट अशी प्रतिमा रंगविण्याची जणू एक चढाओढच लागली होती. अभिनयाच्या क्षेत्रात तर ते बुलंद आहेतच पण माणूस म्हणून अत्यंत थोर आहेत असे सांगण्यात माध्यमे थकत नसत. ‘उम्र का तकाजा’ लक्षात आल्यानंतर त्यांनी आपणहून माध्यमांशी सलगी वाढविण्यास सुरुवात केली. तेव्हां तर माध्यमांना आकाशच ढेंगणे झाले. दरम्यानच्या काळात बोफोर्स प्रकरण देशात गाजत असताना त्यांचे बंधू अजिताभ आणि स्वत: अमिताभ यांचेही नाव चर्चेत आले, गांधी घराण्याशी असलेल्या त्यांच्या संबंधात कडवेपण आले आणि स्वत: अमिताभ यांनी मनोरंजनाच्या क्षेत्रात सुरु केलेल्या ‘एबीसीएल’चे दिवाळे निघाले, तरीही माध्यमांनी रंगविलेल्या त्यांच्या प्रतिमेवर जरासाही ओरखडा उठला नाही. पण अलीकडच्या काळातील तीन ठळक प्रकरणात मात्र ही प्रतिमा काही उत्कट राहू शकलेली नाही. पहिले प्रकरण म्हणजे ईडन गार्डन्सवर टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यात त्यांनी संहितेचा अनादर करुन सादर केलेले राष्ट्रगीत, याच स्पर्धेच्या समालोचनावर समालोचन करताना विख्यात समालोचक हर्ष भोगले यांचा घेतलेला बळी आणि ‘अतुल्य भारत’ या केन्द्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या प्रकल्पाचे प्रतिमा वा सदिच्छा दूत म्हणून त्यांना झालेली वा न झालेली विचारणा आणि संबंधित पर्यटन विभागाने त्यांच्या नावावर मारलेली वा न मारलेली फुली. अन्य एक सिने कलावंत आमीरखान सदर प्रकल्पाचे प्रतिमादूत होते. पण त्यांची काही विधाने म्हणे विद्यमान सरकारला खटकली आणि सरकारने त्यांची गच्छंती करण्याचा निर्णय घेतला. पाठोपाठ अमिताभ यांचे नाव माध्यमातून झळकू लागले. तेव्हांच अमिताभ यांनी आमीरच्या बाबतीत सरकार घेत असलेली भूमिका अयोग्य ठरवून आपण ते पद स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले असते तरच त्यांच्यातील माणसाचे थोरपणही जगासमोर आले असते. पण तसे झाले नाही. आणि आता पनामा पेपर्स म्हणजे कर चुकवेगिरीच्या लांच्छनास्पद प्रकरणात त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर ते एकूण सर्वच बाबतीत ज्या कोलांटउड्या मारीत आहेत, त्या पाहाता आता त्याची ‘उत्कट न राही प्रतिमा’ असेच म्हणणे भाग आहे.