आता लक्ष पेहलाज
By Admin | Updated: November 20, 2015 03:02 IST2015-11-20T03:02:38+5:302015-11-20T03:02:38+5:30
गजेन्द्र चौहान यांची नियुक्ती रद्द व्हावी म्हणून प्रदीर्घकाळ संपावर गेलेल्या पुणे शहरातील फिल्म्स अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी त्यांची मागणी मान्य

आता लक्ष पेहलाज
गजेन्द्र चौहान यांची नियुक्ती रद्द व्हावी म्हणून प्रदीर्घकाळ संपावर गेलेल्या पुणे शहरातील फिल्म्स अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी त्यांची मागणी मान्य न होताच आपला संप मागे घेतला. यात कोणाचा जय वा पराजय याची चिकित्सा न करण्यातच साऱ्यांचे शहाणपण होते. परंतु त्याच बरोबर आता तरी या संस्थेचे कामकाज सुरळीतपणे सुरु होईल हे पाहाण्याची जबाबदारीही साऱ्याच संबंधितांची होती आणि आहे. पण तसे होईलसे दिसत नाही. आपला दीर्घकालीन लढा अयशस्वी झाल्याची जखम घेऊन वावरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे (सेन्सॉर बोर्ड) अध्यक्ष पेहलाज निहलानी यांनी केल्याने आता याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी संबंधित खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे केली आहे. गुणवत्ता आणि सिनेसृष्टीतील कारकीर्द यांचा विचार करता, गजेन्द्र चौहान आणि निहलानी यांच्यात तसा गुणात्मक फरक काहीही नाही. जशी चौहान यांची नियुक्ती वादग्रस्त ठरली होती तशीच ती निहलानी यांचीही ठरली होती. परंतु तितकेच नव्हे, तर नियुक्तीनंतर त्यांनी नवनवे वाददेखील अंगावर ओढवून घेतले होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ या सहा मिनिटांच्या प्रचारी चित्रफितीची निर्मिती हेच काय ते निहलानी यांचे कर्तृत्व. तितक्या भांडवलावर त्यांना इतके मोठे पद मिळाले. ते पदरात पाडून घेऊन गप्प बसण्यातच त्यांचे हित असताना त्यांनी पुण्यातील वरील संस्थेमधल्या विद्यार्थी संपावर एक लघुपट निर्माण करण्याची घोषणा केली आहे. आपण या लघुपटात संपकऱ्यांना उघडे पाडणार असल्याचे त्यांनीच म्हटले आहे. याचा अर्थ त्यांचा हा लघुपट श्वेत वर्णातील सरकार आणि कृष्ण वर्णातील विद्यार्थी रंगवणार हे उघड आहे. विद्यार्थ्यांचा त्याला आक्षेप आहे आणि तो अस्थानी नाही. देशातील एका प्रतिष्ठित संस्थेत इतका लांबलचक संप सुरु राहाणे या संस्थेशी संबंधित कोणालाच शोभा देणारे नव्हते. परंतु जे झाले ते झाले. त्याचा साऱ्यांनी विसर पाडून घेणे श्रेयस्कर असताना पेहलाज यांना आलेल्या ताज्या उबळीचे कशाही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही.