‘उरलो न आता आशीर्वादाहीपुरता’!
By Admin | Updated: October 1, 2015 22:06 IST2015-10-01T22:06:26+5:302015-10-01T22:06:26+5:30
बापाचा जोडा पोराच्या पायात घट्ट बसू लागला की बापाने हळूचकन माघार घ्यायची असते आणि पोराचा मार्ग प्रशस्त करुन द्यायचा असतो, असे व्यावहारिक आणि प्रापंचिक शहाणपण सांगत असते

‘उरलो न आता आशीर्वादाहीपुरता’!
बापाचा जोडा पोराच्या पायात घट्ट बसू लागला की बापाने हळूचकन माघार घ्यायची असते आणि पोराचा मार्ग प्रशस्त करुन द्यायचा असतो, असे व्यावहारिक आणि प्रापंचिक शहाणपण सांगत असते. तसे जर केले नाही तर मग पोराला बापाची अडगळ वाटू लागते आणि अडगळ केव्हांही व कुठेही भिरकावून देण्याची बाब असते. हे शहाणपण केवळ प्रपंचालाच लागू होते असे नाही तर अन्य क्षेत्रांनाही ते लागू पडते व त्यात मग राजकारणही आले. मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत नरेन्द्र मोदी यांनी एकहाती बाजी मारुन नेल्यानंतर भाजपाच्या घरातील वडिलधाऱ्यांनी काळाची पावले ओळखून सन्मानपूर्वक माघारीचा वा निवृत्तीचा निर्णय घ्यावयास हवा होता. पण तसे झाले नाही. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे भाजपातील भीष्म आणि कृप त्याही परिस्थितीत पुनश्च सत्ताधीश होण्याची स्वप्ने रंगवीत होते. ज्याने काळाची पावले ओळखली तो खरा यशस्वी राजकारणी ही उक्ती खरी असेल तर हे दोघे तिथेच अपयशी राजकारणी ठरले. देशाच्या सत्तेत नाही तर नाही, पण पक्षाच्या सत्तेत तरी आपला उचित सन्मान राखला जाईल अशी आस ते बाळगून राहिले. पण तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. ज्यांच्या सल्ल्याची वा मार्गदर्शनाची कधी गरज भासत नाही, त्याची अपेक्षाही बाळगली जात नाही आणि अनाहूतपणे मार्गदर्शन केलेच तर ज्याची पत्रास बाळगली जात नाही अशा मार्गदर्शकाच्या भूमिकेपुरते हे दोघे उरले. एका परीने उभयताना पक्षाने मखरात विराजमान केले. येता जाता आणि इच्छा झाली तरच ‘पाँव लागू’ करु इतकेच त्यांचे महत्व उरले. पण तरीही आज ना उद्या पक्षाला आपली गरज भासेल अशा आशेवर ते राहिले आणि बिहार राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी पक्षाने ज्या तिघांची तारांकित प्रचारक म्हणून घोषणा केली, त्या तिघात अडवाणी-जोशी ही नावे आल्यानंतर त्यांच्या अत्यल्प अल्पसंख्येत मोडणाऱ्या समर्थक वा सहानुभूतीदारांचे डोळे लकाकले. पण आता त्यावरही विरजण पडल्यातच जमा आहे. पक्षाचा उमेदवार जर मागणी करील तरच या तारांकित प्रचारकांच्या सभा आयोजित केल्या जातील असे पक्षाचे धोरण सांगितले गेले आहे आणि एकाही उमेदवाराला या ताऱ्यांच्या प्रचारात आता स्वारस्य उरलेले नसल्याचेही जाहीर झाले आहे. याचा सरळ अर्थ पक्षाच्या दृष्टीने हे दोघे आता आशीर्वादापुरतेही उरलेले नाहीत, असाच होतो. अवनीतलावरील सर्वाधिक क्रूर बाब म्हणजे काळ असतो, याची येथे प्रचिती येते. लोकसभेतील दोनाच्या सदस्यसंख्येवरुन पक्षाला थेट देशाच्या सत्तास्थानी नेण्याचा जो पराक्रम अडवाणी यांनी केला, त्यांचेच आज जणू निर्माल्य झाले आहे. गुजरात दंगलीच्या काळात त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आजचे देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना राजधर्माची आठवण करुन देऊन त्यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचा जो निर्धार तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केला होता त्या निर्धाराला अगदी निर्धाराने छेद देण्याचे काम याच लालकृष्ण अडवाणी यांनी केले होते. परंतु कदाचित उपयुक्ततेचा सिद्धांत त्यांनाही लागू केला गेला आणि आजच्या काळातील त्यांची उपयुक्तता जोखूनच त्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले गेले असावे. अर्थात तशी वेळ त्यांनीच त्यांच्यावर आणून घेतली, हेही कसे नाकारता येईल? एक बरीक खरे की, बिहारातील प्रचारात अडवाणी चालणार नाहीत असे तेथील पक्षाच्या उमेदवारांना वाटत असेल तर त्यात त्यांचीही काही चूक म्हणता येणार नाही. अत्यंत आक्रस्ताळी भूमिका, बेलगाम आरोप, ग्राम्य भाषेचा सर्रास वापर आणि जातीयवादाचा विखार ही सारी बिहार वा उत्तर प्रदेशसारख्या राज्यातील निवडणूक प्रचाराची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. घटकाभर हेही बाजूला ठेवले आणि अगदी तुपात तळलेल्या व मधात घोळलेल्या भाषेत भाषण करुन जमावाला खेचून आणि खिळवून ठेवण्याची जी ताकद वाजपेयी वा अगदी प्रमोद महाजनांपाशीही होती, ती अडवाणींपाशी नाही व हे खुद्द अडवाणीही अमान्य करणार नाहीत. बंद सभागृहात एकेक मुद्दा घेऊन शांतपणे व बुद्धिचातुर्याचा वापर करुन श्रोत्यांना जिंकून घेणे, हा अडवाणी यांचा पिंड. तो बिहारात कसा चालणार? पण दिसते आहे ते असे की केवळ बिहाराच नव्हे तर ते आता पक्षाला कुठेही चालण्याजोगे वाटेनासे झाले आहेत. पक्षाने जाहीर केलेले दुसरे तारांकित प्रचारक मुरली मनोहर जोशी रुग्णाईत असल्याने त्यांना बोलावण्याचा अथवा न बोलावण्याचा प्रश्न तसाही आधीच निकाली निघाला असला तरी ते सभा गाजविण्याच्या दृष्टीने अडवाणी यांच्यापेक्षा उजवे खचितच नाहीत. तिसरे तारांकित प्रचारक म्हणजे सिनेनट शत्रुघ्न सिन्हा. पण हे सद्गृहस्थ कुठे, कधी आणि काय बोलतील याचा कोणालाच भरवसा वाटत नाही. त्यातून मध्यंतरीच्या काळात त्यांनी ज्या अनेक कोलांटउड्या मारल्या त्यांची चिकित्सा बिहारच्या निवडणूक निकालानंतर केली जाणार असल्याचे पक्षाने अगोदरच सूचित करुन ठेवले आहे. याचा अर्थ आता पक्षातर्फे केवळ नरेन्द्र मोदी हा एकच स्टार प्रचारक बिहारात दिसून येईल. अडवाणादि प्रभृतींचा आशीर्वादाचा हातदेखील नसेल. समय बडा बलवान हेच खरे!