..आता सत्तेसाठी साठमारी!

By Admin | Updated: November 4, 2015 04:34 IST2015-11-04T04:34:00+5:302015-11-04T04:34:00+5:30

स्थानिक स्वराज्य संस्था ही लोकशाही राज्यव्यवस्थेतील जनसमुदायाच्या सहभागाची पहिली पायरी असते. या स्तरावर जनमताची जी जडणघडण होत असते, तिनेच लोकशाहीचा

Now, the harvest of power! | ..आता सत्तेसाठी साठमारी!

..आता सत्तेसाठी साठमारी!

स्थानिक स्वराज्य संस्था ही लोकशाही राज्यव्यवस्थेतील जनसमुदायाच्या सहभागाची पहिली पायरी असते. या स्तरावर जनमताची जी जडणघडण होत असते, तिनेच लोकशाहीचा पाया घातला जातो. स्थानिक स्वराज्य संस्था स्तरापासून संसदेपर्यंत जो लोकशाहीचा इमला उभा आहे, त्यात प्रत्येक मजल्याची पायरी चढत जाण्याची संधी मिळणे आणि लोकप्रतिनिधी म्हणून राजकीय कार्यकर्त्याचे नेत्यामध्ये रूपांतर होणे, ही लोकशाहीच्या चैतन्यशीलतेची खूण असते. म्हणूनच लोकशाही किती चैतन्यशील आहे, याची स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदान प्रक्रिया ही खूण असते. या निकषावर रविवारी महाराष्ट्रात झालेल्या कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर महापालिकांच्या निवडणुका आणि राज्यातील नगर पंचायतींसाठी झालेल्या मतदानाचे निकाल पूर्णत: निराशाजनक आहेत. बेछूट व बेलगाम आरोप-प्रत्त्यारोप आणि झगमगाटी व गोंगाटी प्रचार यापलीकडे मतदारांच्या हाती काहीही लागले नाही. परिणामी मतदारांचा कौल विस्कळीत असणे ओघानेच येते. म्हणूनच या निवडणुकानंतर नागरिकांच्या समस्या सुटण्याच्या दृष्टीने काही ठोस पावले पडतील, याची अपेक्षा ठेवणे हे मृगजळासमानच आहे. साहजिकच या निवडणुकीनंतर नागरी प्रशासन कसे सुधारेल वा नगर पंचायतींच्या कार्यक्षेत्रातील मूलभूत समस्यांना हात घातला जाईल काय, अशा मुद्यांची चर्चा करणे निरर्थक आहे. उरतो चर्चेचा मुद्दा तो फक्त राजकीय समीकरणांचा व ती जमविण्यासाठी आवश्यक असलेल्या सौदेबाजीचा व साठमारीचा. तसा तो आल्यावर आता सत्तेची साठमारी सुरू झाली आहे. भाजपाने कल्याण-डोंबिवलीत सेनेला चांगली टक्कर दिली. गेल्या महापालिकेत भाजपाच्या नऊ जागा होत्या, त्या आता ४२ वर पोचल्या आहेत. उलट सेनेने ३२ वरून ५२ पर्यंत उडी मारली. दुसऱ्या बाजूस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची २७ वरून नऊ जागांपर्यंत घसरगुंडी झाली. मनसेचा हा जो घसरता आलेख आहे, तो जसा राज ठाकरे यांच्या सुशेगात राजकारणाचा परिणाम आहे, तसेच तो मतदारांची हतबलता दाखवणाराही आहे. गेल्या निवडणुकीत मतदारांनी मनसेला पाठबळ दिले, ते सेना व भाजपा यांच्या कारभाराला विटून आणि राजकारणात उतरलेला हा नवा पक्ष जी आश्वासने देत आहे, ती काही प्रमाणात तरी का होईना, प्रत्यक्षात आणील या अपेक्षेने. राज ठाकरे यांनी मतदारांची ही अपेक्षा धुळीस मिळवली. त्यामुळेच यंदाच्या निवडणूक प्रचारात राज ठाकरे यांच्या आश्वासनांवर मतदार विश्वास ठेवायला तयार नव्हते. मात्र मतदारांनी जो विस्कळीत कौल दिला आहे, त्यामुळे घसरण होऊनही मनसेच्या हाती हुकुमाचा एक्का पडला आहे. पालिकेची सत्ता हाती घेण्यासाठी सेनेला १० जागा हव्या आहेत. मनसेकडे नऊ आहेत. उलट भाजपाला आपल्या ४२ जागांत २० ची भर घातली तरच सत्ता मिळू शकते. राज्यातील सत्तेच्या वाटपाप्रमाणे सेना व भाजपा एकत्र येऊ शकतात. पण भाजपाने विधानसभा निवडणुकीत मागे टाकल्याने आणि सत्तेतही योग्य वाटा न दिल्याने चडफडत हात चोळत बसलेल्या सेनेला भाजपाला वाकुल्या दाखवत पालिकेतील सत्ता हाती घेण्याची मनिषा होती. ती मतदारांनी फोल ठरवली आहे. आता जर भाजपाला वाकुल्या दाखवायच्या असतील, तर मनसेची साथ घ्यावी लागेल. तिथे ठाकरे घराण्यातील खानदानी भांडण आड येते. त्यामुळे सेनेची कोंडी झाली आहे. तिकडे कोल्हापुरात तुलनेने काँगे्रसने समंजस पवित्रा घेत राष्ट्रवादी काँगे्रसशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात राष्ट्रवादी काँगे्रस सौदेबाजीत माहीर असल्याने हे समीकरण जुळवताना अडथळे येणारच नाहीत, असे ठामपणे कोणीही म्हणू शकणार नाही. उरला मुद्दा नगर पंचायतींचा. या पंचायतीतील मतदानात काँगे्रसने आपली आधीची पकड तशीच ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही काँगे्रसच्या पाठोपाठ राहिली आहे. या महापालिका व नगर पंचायतींच्या निवडणूक निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील नागरी व ग्रामीण भेदही पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. कल्याण-डोंबिवलीत काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे राजकीय अस्तित्व नाममात्रच होते व ते तसेच राहिले आहे. उलट भाजपा व सेना यांना ग्रामीण भागात पाय रोवता आलेले नाहीत, हे नगर पंचायतींच्या निवडणुकातील मतदानाचा कौल दर्शवतो. अगदी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विदर्भातील जिल्ह्यात व खुद्द त्यांच्या गावातही भाजपा पराभूत झाली आहे. आर्थिक विकासाच्या ओघात होत जाणारे अपरिहार्य शहरीकरण व त्याला अनुरूप धोरणात्मक चौकट आखण्याची आवश्यकता आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा मूलत: असलेला ग्रामीण पोत व त्यामुळे केवळ विकासातच नव्हे, तर राजकारणातही निर्माण होत गेलेला असमतोल याचे हे लक्षण आहे. रविवारी झालेल्या निवडणुकांच्या निकालात याच असमतोलाचे प्रतिबिंब पडले आहे. अर्थात सत्तेच्या साठमारीत गुंग असलेले राजकीय पक्ष अशा मूलभूत मुद्यांकडे लक्ष देतील, ही अपेक्षा ठेवणेही व्यर्थ आहे. मात्र आजच्या जागतिकीकरणाच्या युगात शहरीकरणाचा वेग वाढत जाणार आहे. आपण ‘स्मार्ट सिटीज’च्या गप्पा माारत आहोत. पण आपले राजकारण जुनाट पद्धतीनेच चालू आहे. त्याचेच प्रत्यंतर या निवडणुकात आले.

Web Title: Now, the harvest of power!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.