हा कांगावा केवळ बदनामीसाठी...

By Admin | Updated: December 20, 2015 22:29 IST2015-12-20T22:29:26+5:302015-12-20T22:29:26+5:30

सोनिया गांधी व राहुल गांधी यांना त्यांच्या व्यक्तिगत जामिनावर कोणत्याही अटीवाचून मुक्त करून दिल्लीच्या पतियाळा कोर्टाने

This is not the case for defamation ... | हा कांगावा केवळ बदनामीसाठी...

हा कांगावा केवळ बदनामीसाठी...

सोनिया गांधी व राहुल गांधी यांना त्यांच्या व्यक्तिगत जामिनावर कोणत्याही अटीवाचून मुक्त करून दिल्लीच्या पतियाळा कोर्टाने, त्यांच्याविरुद्ध कुभांड रचणाऱ्या सुब्रह्मण्यम स्वामींना आणि त्यांच्या पाठीशी इच्छेने वा अनिच्छेने उभ्या राहिलेल्या सत्तारूढ भाजपाला चपराक लगावली आहे. त्यांना जामीन दिला जाऊ नये व त्यांच्या हालचालींवरही बंदी घातली जावी ही स्वामींची मागणी न्यायालयाने ऐकूनही घेतली नाही. सोनिया आणि राहुल यांनी जामीन न घेता तुरुंगात जाण्याच्या तयारीनेच कोर्टाची पायरी गाठली होती. मात्र न्यायालयाचा निर्णय मान्य करून त्यांनी जामीन दिला यासाठी त्यांचेही आभार मानायला हवे. त्यांच्या तुरुंगात जाण्याने देशातला सामान्य काँग्रेसजन रस्त्यावर येण्याची वा पुन्हा एकवार देशात अशांततेचेच नव्हे तर अस्थिरतेचे वातावरण तयार झाले असते. हा अनुभव १९७८ मध्ये तेव्हाच्या मोरारजी-चरणसिंह सरकारने इंदिरा गांधींना सात दिवस तुरुंगात ठेवून घेतलाही आहे. इंदिराजींच्या अटकेने संतापलेला सारा देशही तेव्हा रस्त्यावर आला होता. मुळातच आताच्या खटल्याचे स्वरूप सामान्य व खासगी स्वरूपाचे होते. १९३७ मध्ये पं. नेहरूंनी सुरू केलेले नॅशनल हेरॉल्ड हे दैनिक २००८ मध्ये आर्थिक अडचणींमुळे बंद पडले. त्यावेळी कर्जाचा भार उतरविण्यासाठी काँग्रेस पक्षाने त्याला ९० कोटी रुपयांचे कर्ज दिले. त्या मदतीच्या बळावर हे दैनिक येत्या काही दिवसात पुन्हा सुरू होऊ शकते. दरम्यान काँग्रेसने त्याला दिलेले कर्ज माफ केले व तसे करण्याचा त्या पक्षाला अधिकारही आहे. याच काळात हे दैनिक त्याच्या असोसिएटेड जर्नल्स या कंपनीकडून यंग इंडिया या कंपनीकडे गेले. या दोन्ही कंपन्यांचे संचालक एकच आहेत व त्याचा अर्थ कंपनीच्या मालकांनी तिचे नावच तेवढे बदलले आहे. मात्र काँग्रेस पक्ष व त्याचे नेतृत्व यांना जेवढ्या अडचणीत आणता येईल वा बदनाम करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजपा सरकार व त्याच्या परिवारातील लोक करीत आले आहेत. सुब्रह्मण्यम स्वामी हे त्या पक्षात अलीकडे आलेले एक रिकामटेकडे पुढारी आहेत. प्रथम जुना जनसंघ, मग जयप्रकाशांचा जनता पक्ष, पुढे स्वत:चा जनता पक्ष आणि आता भाजपा असा पक्षप्रवास करून व वाजपेयींपासूनच्या भाजपातील अनेक नेत्यांवर बदनामीचे वार करून आपले नाव वृत्तपत्रात ठेवणे त्यांना जमले आहे. या स्वामींचा उठवळपणा काँग्रेसलाच नव्हे तर भाजपालाही अनेकदा अडचणीत आणणारा ठरला आहे. मात्र आपल्या हितापुरता त्यांचा वापर करून घेणे हा सरकार पक्षाचा प्रयत्न आहे. ज्या दिवशी सोनिया व राहुल यांच्याविरुद्ध पतियाळा कोर्टात हा खटला स्वामींनी दाखल केला, नेमक्या त्याच दिवशी म्हणजे दि. १९ डिसेंबरला मोदी सरकारने त्यांना सरकारी बंगला व विशेष सुरक्षा प्रदान केली. भाजपा व तिचा संघ परिवार यांना या देशाच्या राजकारणात सर्वाधिक सलणारी बाब सोनिया व राहुल यांचे राजकीय अस्तित्व ही आहे. आज ४५ खासदारांवर थांबलेला त्यांचा पक्ष पुन्हा नव्याने उसळी घेऊन आपले जुने स्थान प्राप्त करू शकेल याची धास्ती त्यांना आहे. त्यामुळे नॅशनल हेरॉल्डचे सर्व आर्थिक व्यवहार स्वच्छ व पारदर्शी दिसत असताना त्यात काही तरी काळेबेरे असलेच पाहिजे हे गृहीत धरून त्यांना न्यायालयात खेचण्याचा जो घाट स्वामींनी घातला त्यामागे त्या पक्षाने व त्याच्या परिवाराने आपली सारी ताकद उभी केली. सोनिया व राहुल तुरुंगात जाणे पसंत करतील असे जाहीर करून त्या दोघांनी व त्यांच्या पक्षाने या प्रयत्नांना पुरेशा ताकदीनिशी तोंड दिले. परिणामी देशात एक राजकीय दुभंग व संघर्ष उभा राहील असे चित्र निर्माण झाले. त्या पार्श्वभूमीवर त्यांना जामीन मिळू न देण्याचा स्वामींनी केलेला प्रयत्न आणि न्यायालयाने तो बाजूला सारून सोनिया व राहुल यांना दिलेला जामीन याकडे पाहावे लागणार आहे. एक गोष्ट मात्र स्वच्छ आहे की, ही लढाई येथेच संपणारी नाही. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या, ‘आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न नवा नाही. गेली कित्येक दशके तो चालत आला आहे’. सारा देश सोनिया गांधींच्या या वक्तव्याच्या सत्याचा साक्षीदार आहे. थेट म. गांधी व पं. नेहरू यांच्यापासून हा प्रयत्न सुरू झाला. पुढे इंदिरा गांधी व नंतर राजीव गांधी यांच्याही विरुद्ध बदनामीची मोहीम पूर्वीच्या जनसंघाने व नंतरच्या भाजपाने चालू ठेवली. यातल्या इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशाच्या सेवेत आपले प्राण खर्ची घातले याचीही भ्रांत या प्रचारकांनी केली नाही हे येथे लक्षात घ्यायचे. सोनिया गांधींना त्यांच्या विदेशी जन्मावरून बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्यानंतरही देशाने त्यांच्या पक्षाला दहा वर्षे सत्ता दिली. आताचा प्रयत्न राहुल गांधींना बदनाम करण्याचा आहे. त्यासाठी १९३७ सालातील जुने प्रकरण हाती घेतले आहे. याचा जो निकाल न्यायालयात होईल तो यथावकाश जनतेला कळेलच; मात्र तोपर्यंत एक गोष्ट साऱ्यांच्या लक्षात पूर्णपणे येऊन चुकली आहे ती म्हणजे, भाजपा व तिचा संघ परिवार गांधी-नेहरू व गांधी यांना केवळ विरोध करून थांबणार नाही. त्या परिवाराची जमेल तेवढी खरी वा खोटी बदनामी करीत राहण्यावरच त्याचा भर राहणार आहे.

Web Title: This is not the case for defamation ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.