नितीशकुमारांची नैतिकता
By Admin | Updated: May 19, 2014 08:56 IST2014-05-19T08:56:48+5:302014-05-19T08:56:48+5:30
नितीशकुमारांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा तत्काळ दिलेला राजीनामा हा त्यांच्या आजवरच्या राजकीय, पण सरळ व साध्या वाटचालीशी सुसंगत ठरावा, असा आहे.

नितीशकुमारांची नैतिकता
लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या जनता दल (यू) या पक्षाच्या झालेल्या दारुण पराभवाचे दायित्व स्वीकारून नितीशकुमारांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा तत्काळ दिलेला राजीनामा हा त्यांच्या आजवरच्या राजकीय, पण सरळ व साध्या वाटचालीशी सुसंगत ठरावा, असा आहे. स्वत:ला डॉ. राम मनोहर लोहियांचे निष्ठावंत अनुयायी म्हणवून घेणारे नितीशकुमार हे कमालीचे विधायक व समाजनिष्ठ वृत्तीचे नेते आहेत. ते नुसते सेक्युलर व धर्मनिरपेक्षच नाहीत, तर जातीनिरपेक्ष राजकारणाचे खरेखुरे पुरस्कर्ते आहेत. सार्या बिहारात त्यांच्या जातीचे लोक विधानसभेच्या जेमतेम सहा मतदारसंघांत असताना सारा बहुजन समाज एकत्र आणून त्यांनी त्या राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळविले. त्याआधी केंद्र सरकारात रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी केलेले कामही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी देऊन गेले. बिहार विधानसभेची मागली निवडणूक त्यांनी भाजपाशी समझोता करून लढविली व तीत त्यांना प्रचंड बहुमत मिळाले. पुढे भाजपाने नरेंद्र मोदींचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केले तेव्हा नितीशकुमारांनी त्या पक्षापासून फारकत घेतली. परिणामी, भाजपाचे ९० आमदार सरकारची बाजू सोडून विरोधी बाकांवर जाऊन बसले. त्याही स्थितीत आपल्या पक्षाचे बहुमत शाबूत राखण्यात व आपले सरकार सत्तेवर ठेवण्यात नितीशकुमार यशस्वी झाले. त्यांची एक जास्तीची व स्थानिक अडचण ही, की त्यांच्या राज्यात एकेकाळी सत्तेवर असलेला व आजही सामर्थ्यशाली असणारा लालुप्रसादांचा राष्टÑीय जनता दल हा पक्षही त्यांच्याविरोधात या सार्या काळात दंड थोपटून उभा होता. परवाच्या निवडणुकीत बिहारमधील लोकसभेच्या ४० जागांपैकी नितीशकुमारांना अवघ्या दोन जागांवर विजय मिळविता आला, तर लालुप्रसादांचे चार उमेदवार विजयी झाले. परिणामी, त्या दोघांनाही या पराभवाचा मोठा फटका अनुभवावा लागला आहे. ही स्थिती नितीशकुमारांच्या राजकारणाला धक्का देणारी असली, तरी त्यांना राजीनामा द्यायला लावणारी मात्र नाही. लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांवर व एका वेगळ्या पातळीवर लढविली जाते. याउलट विधानसभेची निवडणूक प्रादेशिक व स्थानिक प्रश्नांवर उभी होते. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाचा विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयावर परिणाम करून घेणे नैतिक असले, तरी राजकीय नाही. बिहारच्या विधानसभेत आजही नितीशकुमारांच्या पाठीशी पूर्ण बहुमत आहे. शिवाय त्या विधानसभेतील काँग्रेस सदस्यांनी त्यांना बाहेरून पाठिंबा देण्याचे धोरण आखले आहे. आताच्या बदललेल्या परिस्थितीत लालूंचा राजद हा पक्षही त्यांच्यासोबत जाणार आहे. ही स्थिती नितीशकुमारांची राजवट जास्तीची बळकट व मजबूत करणारी आहे. मात्र, नितीशकुमारांनी घेतलेला पवित्रा राजकीय नसून नैतिक आहे. राजीनामा देण्याच्या त्यांच्या कृतीवर राजकीय ढोंगाचा आरोप कोणाला करताही येणार नाही. तशी ढोंगे करणारे लोक त्यांचे राजीनामे आपल्या पक्षाच्या अध्यक्षांकडे पाठवितात व काही काळाने ते गुपचूप मागेही घेतात. नितीशकुमारांनी त्यांचा राजीनामा थेट राज्यपालांकडे पाठविला आहे आणि तेवढ्यावर न थांबता आपला उत्तराधिकारी निवडण्यासाठी पक्षाच्या आमदारांची बैठकही तत्काळ बोलावली आहे. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांनीही नितीशकुमार हे आता मुख्यमंत्रिपदावर राहायला राजी नसल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. स्वच्छ व पारदर्शी प्रशासन आणि तेवढेच चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व यासाठी नितीशकुमार देशाच्या राजकारणात ख्यातकीर्त राहिले आहेत. मध्यंतरी त्यांचे नाव पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार व तिसर्या आघाडीचे नेते म्हणूनही देशभर चर्चिले गेले. परवाच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही आघाडीला निर्णायक बहुमत मिळाले नसते, तर नितीशकुमारांच्या वाट्याला कदाचित फार मोठे पद आले असते. मात्र, आताचा त्यांचा राजीनामा त्यांची पदावनती दाखविणारा असला, तरी देशाच्या राजकारणात त्यांची नैतिक उंची वाढविणारा आहे, हे सार्यांनीच लक्षात घेतले पाहिजे. नितीशकुमारांच्या वाट्याला आलेल्या पराभवासारखे पराभव इतरही अनेक पुढार्यांच्या वाट्याला परवा आले. आपल्या महाराष्टÑातच काँग्रेस पक्षाला लोकसभेच्या राज्यातील ४८ जागांपैकी अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले, तर शरद पवारांच्या आक्रमक म्हणविणार्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या चार जागा येथे मिळू शकल्या. नितीशकुमारांसारखे पाऊल उचलायचे या नेत्यांनी ठरविले, तर तो त्यांचाही गौरव होईल. ते बिचारे तसे करणार मात्र नाहीत.