नितीशकुमार यांची खुर्ची डळमळीत!

By Admin | Updated: May 15, 2014 09:25 IST2014-05-15T09:25:25+5:302014-05-15T09:25:25+5:30

भारतीय जनता पक्षासोबतची युती तोडून नितीशकुमार यांनी स्वत:च्याच पायावर कु-हाड मारून घेतली आहे. जद (यु)ने भाजपासोबत फारकत घेतली नसती, तर या युतीला बिहारमधील सर्व ४० जागा मिळू शकल्या असत्या.

Nitish Kumar's chair shaky! | नितीशकुमार यांची खुर्ची डळमळीत!

नितीशकुमार यांची खुर्ची डळमळीत!

रवी टाले

लोकसभा निवडणूक निकालाला अवघे काही तास बाकी असताना आणि संपूर्ण देशात भावी पंतप्रधान कोण, हाच चर्चेचा विषय असताना बिहारमध्ये मात्र मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे काय होणार, याची चर्चा रंगत आहे. विविध वृत्तवाहिन्यांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे बिहारसंदर्भातील निष्कर्ष, राजकीय विश्लेषकांच्या अंदाजांना दुजोरा देणारेच ठरले आहेत. प्रत्यक्ष निवडणूक निकालही त्याच धर्तीवर आल्यास नितीशकुमार यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची डळमळू लागण्याची दाट शक्यता आहे. बिहारमध्ये फिरताना एक बाब प्रकर्षाने जाणवली आणि ती ही, की भारतीय जनता पक्षासोबतची युती तोडून नितीशकुमार यांनी स्वत:च्याच पायावर कुºहाड मारून घेतली आहे. नितीशकुमार यांच्या जनता दल (युनायटेड) पक्षाच्या अनेक स्थानिक नेत्यांनीही ‘आॅफ द रेकॉर्ड’ बोलताना, या भावनेला दुजोरा दिला. जद (यु)ने भाजपासोबत फारकत घेतली नसती, तर या युतीला बिहारमधील सर्व ४० जागा मिळू शकल्या असत्या, असाच सार्वत्रिक सूर बिहारमध्ये उमटत होता. नितीशकुमार यांच्या निर्णयामुळे भाजपाचे अजिबात नुकसान होणार नाही; पण जद (यु)ला मात्र जबर फटका बसेल, असाच निष्कर्ष सर्वच मतदानोत्तर निवडणूक चाचण्यांमधून निघाला आहे. या चाचण्यांनी जद (यु)ला किमान शून्य, तर कमाल १० जागा दिल्या आहेत. बिहारमधील सर्वसाधारण सूर मात्र, जद (यु)ला दोन किंवा तीनपेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असाच आहे. निवडणूक निकालात ही शक्यता प्रत्यक्षात उतरल्यास, जद (यु)मध्ये आतापर्यंत दबक्या आवाजात उमटत असलेला नितीशकुमारविरोधी सूर जोर धरू लागण्याची दाट शक्यता आहे. भाजपासोबत काडीमोड घेण्याचा नितीशकुमार यांचा निर्णय त्यांच्या पक्षातील अनेकांना रुचला नव्हता. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर, भविष्याची चाहूल लागलेल्या जद (यु)च्या अनेक नेत्यांनी, पक्षाच्या बुडत्या जहाजावरून दूर होण्यातच भलाई मानली. त्यामध्ये रेणू कुशवाह, छेदी पासवान, परवीन अमानुल्ला, सुजाता कुमारी, अन्नू शुक्ल, पूनम यादव यासारख्या नेत्यांचा समावेश होता. नितीशकुमार मंत्रिमंडळाचे सदस्य असलेले नरेंद्र सिंह यांनी निवडणूक प्रचारसभेच्या व्यासपीठावरून, नितीशकुमार यांच्या उपस्थितीतच त्यांना ज्या प्रकारे खडे बोल सुनावले, त्यावरून जद (यु)मध्ये भविष्यात काय होऊ शकते, याची चाहूल लागली होती. जद (यु)च्या अनेक आमदारांनाही भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय पचनी पडलेला नाही. बिहारमध्ये भाजपा आणि जद (यु)ने एक नवे सामाजिक समीकरण जन्माला घातले होते. लालुप्रसाद यादव यांच्या गाजलेल्या ‘माय’ (मुस्लिम+यादव) समीकरणाला यशस्वीरीत्या छेद देण्याचे काम केले होते. नितीशकुमार यांच्या निर्णयामुळे ते समीकरण एका झटक्यात उद्ध्वस्त झाले. परिणामी, पुढील वर्षी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीत, जद (यु)च्या अनेक आमदारांची मार्गक्रमणा कठीण होईल. त्यामुळे जद (यु)च्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. या अस्वस्थ आमदारांना एकत्र करण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये बिहारमधील भाजपा नेत्यांनी अर्थातच पुढाकार घेतला आहे. जद (यु)चे किमान ६० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचा दावा कदाचित अतिरंजित असेल; पण त्यामध्ये काही तथ्य निश्चित आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल, मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांवर शिक्कामोर्तब करणारे निघाल्यास, या हालचालींना आणखी गती प्राप्त होईल. नितीशकुमार यांची मुख्यमंत्रिपदावरून गच्छंती अटळ झाल्यास चार शक्यता संभवतात. एक म्हणजे, जद (यु)चे एकतृतीयांश किंवा त्यापेक्षा जास्त आमदार पक्षातून बाहेर पडू शकतात आणि वेगळा गट स्थापन करू शकतात. भाजपा या गटाला सरकारस्थापनेसाठी बाहेरून समर्थन देऊ शकतो किंवा नव्या गटासोबत युती करून स्वत:च सरकार स्थापन करू शकतो. दुसरी शक्यता ही आहे, की जद (यु)मधून बाहेर पडणारे आमदार सरळ भाजपामध्ये सामील होऊन भाजपाचा सरकारस्थापनेचा मार्ग मोकळा करतील. तिसरी शक्यता ही आहे, की सत्तालोलुपतेचा आरोप टाळण्यासाठी भाजपा सरळ विधानसभा निवडणुकीला तोंड देणे पसंत करेल. याशिवाय, आणखी एक क्षीण शक्यताही आहे आणि ती म्हणजे, जद (यु)चे आमदार नितीशकुमार यांना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदावरून दूर करतील व नव्या नेत्याची निवड करून त्याला मुख्यमंत्रिपदावर आरूढ करतील.

( लेखक हे लोकमता अकोला आवृत्तीचे निवासी संपादक आहेत. )

Web Title: Nitish Kumar's chair shaky!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.