शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

सरकार नवं आहे, म्हणून नवा उन्माद?

By यदू जोशी | Updated: July 22, 2022 10:25 IST

नवीन सरकारची जरब असावी, धाक असावा हे ठीक; पण इतकी दादागिरी? आधीच्या सरकारचे निर्णय बदलाल; पण मग त्या सरकारमधले अवगुण?

- यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री शिंदे गटातील एका माजी मंत्र्याने त्याच्या मतदारसंघातील कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता मिळवून घेताना संबंधित खात्यात दिवसभर अक्षरश: हैदोस घातला. शिवीगाळ केली, अद्वातद्वा बोलले, इतके की अक्षरश: घाबरलेले संबंधित सहसचिव रजेवर जातो म्हणाले. नावात ‘सत्ता’ आहे म्हणून सत्ता मिळाली अन् मंत्रिपदही मिळणार हा उन्माद बरा नाही.  

नवीन सरकारची जरब असावी, धाक असावा हे ठीक आहे, दादागिरी कशी समजून घ्यायची? या सरकारला कसोटी, वन डे नाही तर टी-ट्वेन्टी खेळायची आहे. इथे शैलीवैली काही नसते, आडा बल्ला, ठोकपिट सब चलता है. क्रिकेटच्या खेळातील नजाकतीचा दूरदूर पत्ता नसतो. कसेही मारा, पण रन पाहिजेत. त्या नादात विकेट जाण्याचा धोका अधिक. तसे या सरकारचे होवू नये म्हणजे झाले ! आपल्या व्याख्येतील न्याय मिळवून घेताना कायदा हाती घेण्याचे समर्थन कसे करणार?

गेल्या सरकारमध्ये तीन मंत्र्यांच्या विकेटस् गेल्या, आणखी दोघांच्या जाण्याच्या बेतात असताना सरकारच गेलं. नवीन सरकारमध्ये वरखाली तेच असल्याने तो धोका नाही, पण शेवटी जनतेचीही एक ईडी अन् एक कोर्ट असतंच. ते कोर्ट तुम्हाला तुरुंगात नाही, पण घरी नक्की पाठवू शकतं. आधीपासूनच चालत आलेलं बदल्यांचं रेटकार्ड  महाविकास आघाडीच्या काळात फारच फुगलं होतं.  मोक्याच्या ठिकाणी एसडीओंना नेमण्याचे रेट पाच कोटींहून अधिक आहेत.  नोकरशाहीत बोकाळलेला भ्रष्टाचार हा सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. अधिकाऱ्यांच्या संघटनेने मागे ‘पगारात भागवा’ अभियान राबवलं होतं, ते केव्हाच गुंडाळलं गेलं आहे. पगार शिल्लक ठेवून सहज भागेल  अशी सर्वत्र चंगळच चंगळ आहे.  मंत्री अधिकाऱ्यांसाठीची आचारसंहिता ठरली पाहिजे. नाहीतर तुमच्यात आणि आधीच्यांमध्ये फरक काय राहिला? 

प्रश्न सरकारच्या स्वभावाचा आहे. आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय बदलाल पण आधीच्या सरकारमधले किंवा त्या आधीच्या तुमच्या सरकारमधील अवगुण बदलण्याचं धोरण असलं पाहिजे. 

सध्या लोक न्यूट्रल गिअरमध्ये आहेत. ते निरीक्षण करताहेत. १९७८ मधील पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयोग लोक अजूनही विसरलेले नाहीत. परवा घडलेल्या बंडाला तीच किनार आहे; त्यामुळेही आपल्याबद्दलचा चांगला समज (गुड परसेप्शन) तयार करण्याचं आव्हान शिंदे-फडणवीस सरकारसमोर आहे. जुने बडवे जाऊन नवे बडवे येणार असतील तर फरक काय पडेल? नवीन सरकारमध्येही आपली जागा शोधत नवे बडवे फिरत आहेत, त्यांच्यामुळे विठ्ठल धोक्यात येऊ शकतो. एकनाथ शिंदे स्वत:ला वारकरी समजतात, ते स्वत:चा विठ्ठल होवू देणार नाहीत; त्यामुळे बडवे त्यांना घेरणार नाहीत ही अपेक्षाही आहेच. 

भूषण गगराणी, श्रीकर परदेशी अशा संवेदनशील अधिकाऱ्यांना शिंदे-फडणवीस यांनी आपल्या ताफ्यात घेतलं आहे. फडणवीस इमेज कॉन्शस आहेतच, सुखद आश्चर्य म्हणजे “टीममध्ये गडबड माणसं नकोत रे बाबा ! चांगली स्वच्छ माणसं घ्या’ असं म्हणत शिंदेही तेच भान राखताना दिसतात !

नानाभाऊ अन् चित्राताई 

मध्यंतरी भाजपचे दोन जिल्हाध्यक्ष विवाहबाह्य संबंधांवरून अडचणीत आले तेव्हा भाजपच्या  प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मौनाची गोळी खाल्ली होती; पण आता काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक कथित व्हिडिओ समोर येताच चित्राताईंनी सवाल सुरू केले आहेत. आता पटोले त्यांच्या बदनामीविरुद्ध न्यायालयात जाणार आहेत. त्यांनी धनंजय मुंडे, संजय राठोडांचंही मार्गदर्शन  घ्यायला हरकत नाही. 

ओबीसींचं कौतुक कोण करणार?     

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दिलं म्हणून सगळेच श्रेय घेत आहेत. जयंतकुमार बांठिया यांच्या आयोगाने प्रसिद्धीपासून दूर राहत अहवाल दिला, तो सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला अन् आरक्षण मिळालं. बांठिया आयोगाच्या कार्यशैलीवर दहा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आता त्यांचं कौतुक करण्याची दिलदारी दाखवली पाहिजे. सर्वात जास्त कौतुक आहे ते समस्त ओबीसी समाजाचं. हक्काचं आरक्षण गेलं तरी या समाजाने कुठेही हिंस्र प्रतिक्रिया दिली नाही. कुठे दगडफेक नाही, जाळपोळ नाही की कुणाला शिवीगाळ नाही.  आरक्षण मिळालं, आता ओबीसींना लोकसंख्येच्या अनुपातात विकासनिधी मिळायला हवा.

२०१४ मधील ती घटना

१०० कोटींच्या बदल्यात मंत्रिपद मिळवून देऊ पाहणाऱ्या दलालांचा पर्दाफाश करणाऱ्या आमदार राहुल कुल यांचं अभिनंदन ! मंत्रिपदासाठी अशा दलालांच्या संपर्कात असलेले आणखी तीनचार जण आहेत, ते एव्हाना सावध झाले असतीलच. सहज आठवण आली म्हणून...२०१४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा काही दलालांनी एका आमदाराला-फार नाही-पण ३० लाखांची टोकन अमाउंट घेऊन गंडवलं होतं. ते आमदार मंत्री झालेच नाहीत. म्हणजे ते ३० लाखही गेले, मंत्रिपदही गेलंच !  ‘बय गेली अन् बयची वाकयही गेली’. 

जाता जाता : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार या अनोख्या मित्रांचा आज वाढदिवस आहे. सकाळचा शपथविधी टिकला नाही; अन्यथा वेगळं चित्र दिसलं असतं. नियती कशी असते पहा, २०१९ मध्ये दोन दिवस एका बाकावर बसले, नंतर एकदुसऱ्याच्या विरोधी बाकावर ३१ महिने  बसले, ३० जूनला बाकांची अदलाबदल झाली, पुढे काय होईल कोण जाणे ! दोघांचे बंगले हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे उगीच कुणाला वेशांतर करण्याचीही गरज नाही.. कल किसने देखा है !

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस