शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सरकार नवं आहे, म्हणून नवा उन्माद?

By यदू जोशी | Updated: July 22, 2022 10:25 IST

नवीन सरकारची जरब असावी, धाक असावा हे ठीक; पण इतकी दादागिरी? आधीच्या सरकारचे निर्णय बदलाल; पण मग त्या सरकारमधले अवगुण?

- यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री शिंदे गटातील एका माजी मंत्र्याने त्याच्या मतदारसंघातील कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता मिळवून घेताना संबंधित खात्यात दिवसभर अक्षरश: हैदोस घातला. शिवीगाळ केली, अद्वातद्वा बोलले, इतके की अक्षरश: घाबरलेले संबंधित सहसचिव रजेवर जातो म्हणाले. नावात ‘सत्ता’ आहे म्हणून सत्ता मिळाली अन् मंत्रिपदही मिळणार हा उन्माद बरा नाही.  

नवीन सरकारची जरब असावी, धाक असावा हे ठीक आहे, दादागिरी कशी समजून घ्यायची? या सरकारला कसोटी, वन डे नाही तर टी-ट्वेन्टी खेळायची आहे. इथे शैलीवैली काही नसते, आडा बल्ला, ठोकपिट सब चलता है. क्रिकेटच्या खेळातील नजाकतीचा दूरदूर पत्ता नसतो. कसेही मारा, पण रन पाहिजेत. त्या नादात विकेट जाण्याचा धोका अधिक. तसे या सरकारचे होवू नये म्हणजे झाले ! आपल्या व्याख्येतील न्याय मिळवून घेताना कायदा हाती घेण्याचे समर्थन कसे करणार?

गेल्या सरकारमध्ये तीन मंत्र्यांच्या विकेटस् गेल्या, आणखी दोघांच्या जाण्याच्या बेतात असताना सरकारच गेलं. नवीन सरकारमध्ये वरखाली तेच असल्याने तो धोका नाही, पण शेवटी जनतेचीही एक ईडी अन् एक कोर्ट असतंच. ते कोर्ट तुम्हाला तुरुंगात नाही, पण घरी नक्की पाठवू शकतं. आधीपासूनच चालत आलेलं बदल्यांचं रेटकार्ड  महाविकास आघाडीच्या काळात फारच फुगलं होतं.  मोक्याच्या ठिकाणी एसडीओंना नेमण्याचे रेट पाच कोटींहून अधिक आहेत.  नोकरशाहीत बोकाळलेला भ्रष्टाचार हा सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. अधिकाऱ्यांच्या संघटनेने मागे ‘पगारात भागवा’ अभियान राबवलं होतं, ते केव्हाच गुंडाळलं गेलं आहे. पगार शिल्लक ठेवून सहज भागेल  अशी सर्वत्र चंगळच चंगळ आहे.  मंत्री अधिकाऱ्यांसाठीची आचारसंहिता ठरली पाहिजे. नाहीतर तुमच्यात आणि आधीच्यांमध्ये फरक काय राहिला? 

प्रश्न सरकारच्या स्वभावाचा आहे. आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय बदलाल पण आधीच्या सरकारमधले किंवा त्या आधीच्या तुमच्या सरकारमधील अवगुण बदलण्याचं धोरण असलं पाहिजे. 

सध्या लोक न्यूट्रल गिअरमध्ये आहेत. ते निरीक्षण करताहेत. १९७८ मधील पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयोग लोक अजूनही विसरलेले नाहीत. परवा घडलेल्या बंडाला तीच किनार आहे; त्यामुळेही आपल्याबद्दलचा चांगला समज (गुड परसेप्शन) तयार करण्याचं आव्हान शिंदे-फडणवीस सरकारसमोर आहे. जुने बडवे जाऊन नवे बडवे येणार असतील तर फरक काय पडेल? नवीन सरकारमध्येही आपली जागा शोधत नवे बडवे फिरत आहेत, त्यांच्यामुळे विठ्ठल धोक्यात येऊ शकतो. एकनाथ शिंदे स्वत:ला वारकरी समजतात, ते स्वत:चा विठ्ठल होवू देणार नाहीत; त्यामुळे बडवे त्यांना घेरणार नाहीत ही अपेक्षाही आहेच. 

भूषण गगराणी, श्रीकर परदेशी अशा संवेदनशील अधिकाऱ्यांना शिंदे-फडणवीस यांनी आपल्या ताफ्यात घेतलं आहे. फडणवीस इमेज कॉन्शस आहेतच, सुखद आश्चर्य म्हणजे “टीममध्ये गडबड माणसं नकोत रे बाबा ! चांगली स्वच्छ माणसं घ्या’ असं म्हणत शिंदेही तेच भान राखताना दिसतात !

नानाभाऊ अन् चित्राताई 

मध्यंतरी भाजपचे दोन जिल्हाध्यक्ष विवाहबाह्य संबंधांवरून अडचणीत आले तेव्हा भाजपच्या  प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मौनाची गोळी खाल्ली होती; पण आता काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक कथित व्हिडिओ समोर येताच चित्राताईंनी सवाल सुरू केले आहेत. आता पटोले त्यांच्या बदनामीविरुद्ध न्यायालयात जाणार आहेत. त्यांनी धनंजय मुंडे, संजय राठोडांचंही मार्गदर्शन  घ्यायला हरकत नाही. 

ओबीसींचं कौतुक कोण करणार?     

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दिलं म्हणून सगळेच श्रेय घेत आहेत. जयंतकुमार बांठिया यांच्या आयोगाने प्रसिद्धीपासून दूर राहत अहवाल दिला, तो सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला अन् आरक्षण मिळालं. बांठिया आयोगाच्या कार्यशैलीवर दहा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आता त्यांचं कौतुक करण्याची दिलदारी दाखवली पाहिजे. सर्वात जास्त कौतुक आहे ते समस्त ओबीसी समाजाचं. हक्काचं आरक्षण गेलं तरी या समाजाने कुठेही हिंस्र प्रतिक्रिया दिली नाही. कुठे दगडफेक नाही, जाळपोळ नाही की कुणाला शिवीगाळ नाही.  आरक्षण मिळालं, आता ओबीसींना लोकसंख्येच्या अनुपातात विकासनिधी मिळायला हवा.

२०१४ मधील ती घटना

१०० कोटींच्या बदल्यात मंत्रिपद मिळवून देऊ पाहणाऱ्या दलालांचा पर्दाफाश करणाऱ्या आमदार राहुल कुल यांचं अभिनंदन ! मंत्रिपदासाठी अशा दलालांच्या संपर्कात असलेले आणखी तीनचार जण आहेत, ते एव्हाना सावध झाले असतीलच. सहज आठवण आली म्हणून...२०१४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा काही दलालांनी एका आमदाराला-फार नाही-पण ३० लाखांची टोकन अमाउंट घेऊन गंडवलं होतं. ते आमदार मंत्री झालेच नाहीत. म्हणजे ते ३० लाखही गेले, मंत्रिपदही गेलंच !  ‘बय गेली अन् बयची वाकयही गेली’. 

जाता जाता : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार या अनोख्या मित्रांचा आज वाढदिवस आहे. सकाळचा शपथविधी टिकला नाही; अन्यथा वेगळं चित्र दिसलं असतं. नियती कशी असते पहा, २०१९ मध्ये दोन दिवस एका बाकावर बसले, नंतर एकदुसऱ्याच्या विरोधी बाकावर ३१ महिने  बसले, ३० जूनला बाकांची अदलाबदल झाली, पुढे काय होईल कोण जाणे ! दोघांचे बंगले हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे उगीच कुणाला वेशांतर करण्याचीही गरज नाही.. कल किसने देखा है !

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस