नरेन्द्र मोदींचा हेकट स्वभावच घातक ठरेल?
By Admin | Updated: May 28, 2015 23:39 IST2015-05-28T23:39:07+5:302015-05-28T23:39:07+5:30
२०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसप्रणित संपुआ पराभूत होईल असा अंदाज जर तुम्ही २०१० साली व्यक्त केला असता, तर लोकानी तुम्हाला वेड्यातच काढले असते.

नरेन्द्र मोदींचा हेकट स्वभावच घातक ठरेल?
भारतीय राजकारणाबाबत एकच गोष्ट निश्चितपणे सांगता येईल व ती म्हणजे त्यातील अनिश्चितता. २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसप्रणित संपुआ पराभूत होईल असा अंदाज जर तुम्ही २०१० साली व्यक्त केला असता, तर लोकानी तुम्हाला वेड्यातच काढले असते. कारण कॉंग्रेसला आपल्या विजयाचा तेव्हां कमालीचा आत्मविश्वास होता. आज आपल्या सत्तेचे ३६५ दिवस साजरे करणाऱ्या मोदी सरकारलाही २०१९ सालचा विजय आपलाच असल्याचे वाटते आहे. त्यात प्रश्न इतकाच की मनमोहनसिंग सरकारलाच्या ऱ्हासाला जसा त्याचा आत्मसंतुष्टपणा कारणीभूत ठरला, तसाच मोदी सरकारचा हेकटपणा त्याच्या पराभवाला कारणीभूत ठरेल का?
‘किमान प्रशासन आणि कमाल उद्धटपणा ’हेच मोदी सरकारचे घोषवाक्य असले पाहिजे, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. याच संदर्भात काही निवडक माध्यम प्रतिनिधींसोबतच्या खासगी चर्र्चेत बोलताना, पंतप्रधान मोदी यांनी मात्र असे म्हटले होते की, जेव्हां टीकाकारांकडे आपल्या विरोधात भक्कम कारणे नसतात तेव्हां ते आपल्याला सरळ उद्धट म्हणून मोकळे होतात. याच मुद्यावर जेव्हा मी अमित शाह यांना छेडले, तेव्हां ते म्हणाले की, उद्धटपणा आणि आत्मविश्वास यात एक नाजूक रेषा असते व ती न ओलांडण्याची पुरेपूर काळजी मोदी घेत असतात.
तसे तर मोदींच्या राजकीय कारकिर्दीच्या आरंभापासूनच त्यांच्यावर उद्धटपणाचे आरोप होत आहेत. १९९० च्या दरम्यान त्यांना गुजरातच्या राजकारणातून विजनवासात पाठवण्यात आले, तेव्हां त्यामागील कारणदेखील त्यांच्या वागणुकीविषयीचे आरोप हेच होते. ते त्यावेळी स्वत:ला गुजरातच्या मुख्यमंत्र्यापेक्षा वरचढ मानीत आणि आपले श्रेष्ठत्व पक्षातील अन्य वरिष्ठ नेत्यांनीही मान्य करावे अशी त्यांची अपेक्षा असे. अखेरीस २००१ साली ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले, पण तेव्हांदेखील त्यांचा कथित अहंकार त्यांच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरतो की काय अशी भीती अनेकांच्या मनात होती. २०१३ साली त्यांचे नाव भावी पंतप्रधान म्हणून पुढे करण्यात आले, तेव्हा सुद्धा अशी काळजी व्यक्त केली गेली की, पक्ष एका हुकुमशहाच्या उदयाची जोखीम पत्करत असून हा हुकुमशहा कालांतराने संघटनेपेक्षा स्वत:चे महात्म्य वाढवून ठेवील. अर्थात ही काळजी व्यक्त करणारी व्यक्ती कुणी दुसरी तिसरी नव्हती, तर मोदींचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांनीच ती व्यक्त केली होती.
मोदींनी अगदी तरुण वयातच संघाचा प्रचारक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली होती. प्रचारकांनी ्अहंकाराचा त्याग करुन कमालीच्या नम्रतेने व शांतपणे काम करणे संघाला अपेक्षीत असल्याने मोदींवर होणारा उद्धटपणाचा आरोप जरा विचित्रच वाटतो. एक मात्र खरे की, त्यांच्यात व्यक्तिगत इच्छा-आकांक्षांना तसूभरही स्थान नाही. ज्याची राहणी आणि विशेषत: पेहराव एव्हाना सार्वत्रिक चर्चेचा विषय बनलेला आहे, तोच माणूस साध्या कुडत्या-पायजम्यातील प्रचारक होता? प्रथमपासूनच का मोदी इतरांपेक्षा वेगळे होते? त्यांच्या राहणीमानाचा विचार जरा मोकळेपणाने करु या. स्वत:ची नाममुद्रा अंकित केलेला त्यांचा सूट वा एव्हाना त्यांच्या नावाने प्रसिद्ध झालेले मोदी जॅकेट किंवा त्यांचा गॉगल अथवा घड्याळ यावरुन मोदींच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख होऊ शकत नाही. आपले पंतप्रधान त्यांच्या राहणीमानीविषयी जरा जास्तीच सजग आहेत हा त्यांच्या उद्धटपणाचा पुरावा होऊ शकत नाही. जवाहरलाल नेहरुंच्यासुद्धा राहणीमानाविषयीच्या काही निश्चित आवडी-निवडी होत्या. त्यांच्याकडेही महागड्या वस्तुंचा संग्रह होता. पण त्यांच्यावर गर्विष्ठपणाचा आरोप मात्र कधीच झाला नाही. नेहरू जॅकेट जर प्रसिद्ध होऊ शकते, तर मग मोदी जॅकेट का होऊ नये?
मोदींवर होणारा आणखी एक आरोप म्हणजे व्यक्तिगत प्रसिद्धीची त्यांची अमर्याद आवड. पण ही टीकादेखील अनुचित आहे. आजचे युग माध्यमांचे आहे. जर पंतप्रधानांकडे या माध्यमांचा उपयोग करून स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्याची क्षमता असेल तर आपण त्याकडे एक कौशल्य म्हणूनच बघितले पाहिजे आणि कोणतेही कौशल्य आणि उद्धटपणा यांची अशी सरिमसळ होऊ शकत नाही. त्याचबरोबर आपले टीकाकार आपल्यावर आरोप करताना भरकटून जातात व आपल्याला उद्धट म्हणून मोकळे होतात, असा जर मोदींचा दावा असेल तर तेही पूर्ण सत्य नाही. सत्य वेगळीकडेच आहे आणि संस्था आणि व्यक्ती यामध्ये व्यक्तीला मोठे स्थान देण्याच्या मोदींच्या वृत्तीत ते कुठेतरी लपले आहे. गुजरातमध्येच तेच निदर्शनास आले होते. तेथील विधिमंडळ, मानवी हक्क संस्था, माहिती आयोग आणि समस्त बिगर सरकारी स्वयंसेवी संघटना अवघडल्यागत झाल्या होत्या. गुजरातच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी आणि सहकारी दूध संस्थांसाठी मोठे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थादेखील त्यातून सुटल्या नव्हत्या व खरे तर तोच धोक्याचा इशारा होता.
आज केंद्रातही, माध्यमे, न्यायाधीकरण, संसद आणि मंत्रिमंडळ या लोकशाहीच्या आधारभूत संस्थादेखील ‘बिग बॉस’च्या भयाखाली वावरताना दिसतात. गेल्या वर्षभरात पंतप्रधानांनी माध्यमांसमवेत एकदाही जाहीर संवाद साधला नाही वा एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही. न्यायाधीशांच्या नेमणुकांच्या संदर्भात न्याय व्यवस्थेतील मोठे लोक सर्वोच न्यायालयात सरकारच्या भूमिकेच्या विरोधात उभे ठाकले आहेत, वर्षभरात कोणत्याही विधेयकावर चर्चा करण्यासाठी एकही सर्वपक्षीय बैठक बोलाविली गेली नाही. सुषमा स्वराज सारख्या मंत्री अगदी मौनात गेल्या आहेत आणि बिगर सरकारी स्वयंसेवी संघटना आणि मानवी हक्क संघटना यांच्याकडे तर साफ दुर्लक्षच केले गेले आहे.
याच मुद्यांवर आता पंतप्रधानांनी काळजी घ्यायला हवी. सतत प्रचारकी थाटात बोलणे आणि इतरांवर संदिग्ध स्वरुपाची व्यक्तिगत टीका करणे यापेक्षा त्यांनी भ्रष्टाचार विरोधी मोहिमेवर लक्ष केन्द्रीत करायला हवे. चमकदार घोषणांना बातम्यांमध्ये आकर्षक स्थान मिळू शकते, पण त्यातून प्रशासकीय सुधारणा होत नसतात. स्वत:स प्रधानसेवक म्हणून संबोधित करुन घेणाऱ्या नेत्याने हेही समजून घेतले पाहिजे की, आजचा आत्मविश्वास हीच कदाचित उद्याच्या झोटिंगशाहीची पायाभरणी ठरु शकते.
ता.क.- महत्वाच्या क्षण सेल्फीच्या माध्यमातून चित्रबद्ध करुन ठेवण्याची कला अवगत असणारे आणि तिचा सतत वापर करणारे मोदी पहिलेच पंतप्रधान आहेत. तरीसुद्धा टेराकोटा संग्रहालयात (चीनमधील) त्यांनी डोळ्यावर चढवलेला रेबॅनचा गॉगल पाहून इंटरनेटवर बरेच विनोद केले गेले. निरंतर स्वत:चेच प्रतिमापूजन करीत राहणे ही एक दुधारी तलवारच असते.
राजदीप सरदेसाई
(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)