नमोजी आता लागा कामाला

By Admin | Updated: May 24, 2014 18:26 IST2014-05-24T18:26:35+5:302014-05-24T18:26:35+5:30

अखेर नरेंद्र मोदी जिंकलेच. त्यांचा विजयही असा, की इतिहास झाला. मोदींच्या जयाची अनेक कारणे सांगितली जात आहेत. कुठले एखादे नेमके कारण सांगणे अवघड आहे.

Namozi has started working now | नमोजी आता लागा कामाला

नमोजी आता लागा कामाला

- विश्वनाथ सचदेव

अखेर नरेंद्र मोदी जिंकलेच. त्यांचा विजयही असा, की इतिहास झाला. मोदींच्या जयाची अनेक कारणे सांगितली जात आहेत. कुठले एखादे नेमके कारण सांगणे अवघड आहे. नेमक्या शब्दांत सांगायचे, तर काँग्रेसचे कुशासन आणि मोदींची आश्वासनांनी ही जादू केली. लाखो भाजपा कार्यकर्ते आणि संघ परिवाराच्या अथक परिश्रमाने आपण जिंकू शकलो, असे मोदी म्हणत असले, तरी हे काम सोपे नव्हते. विजयाचे श्रेय मोदींनाच जाते. गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी कृष्णाच्या सवंगड्यांनी आपल्या लाठ्या लावल्या. पण, गोवर्धन टिकला तो कृष्णाच्या करंगळीवर. सप्टेंबरमध्ये त्यांची निवड झाली. त्या दिवसापासून मोदी प्रचाराला भिडले होते. स्वत:च्या जोरावर देशभर सुमारे तीन लाख किलोमीटर फिरले. भाजपाची हवा बनवली. मोदींमधली ऊर्जा, रणनीती कौशल्य आणि क्षमता यांचा हा नमुना आहे. भाजपा सरकार बनतंय, ही ‘नरेंद्रभाई मोदी की कृपा’ असे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले आहे. पक्षाने व्यक्त केलेली कृतज्ञता या अर्थानेच याकडे पाहिले पाहिजे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ‘भारत मेरी मां है, भाजपा भी मेरी मां है और बेटा कभी मां पर कृपा नही कर सकता’ असे म्हणणारे मोदी देशाला नवे होते. हे शब्द, या भावना कुण्या एजन्सीने त्यांना लिहून दिल्या नव्हत्या. ते आतून आले होते. भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत भाग घेण्यासाठी मोदी संसद भवनात आले, तेव्हा पायर्‍यांवर त्यांनी डोके टेकवले. संसदेला मंदिर मानणारे मोदी देशासाठी नवे होते. असे करण्याचा सल्ला मोदींना कुणी दिला असेल, असे मला वाटत नाही. संसदेच्या पायर्‍यांवर मोदी अचानक वाकले, तेव्हा त्यांचे अंगरक्षकही गांगरले. पण, मोदींच्या भावना देश समजला. त्यामुळेच जनतेच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. चांगले दिवस येण्याची लोक वाट पाहू लागले आहेत. जनतेने खोर्‍याने मतं दिली. आता मोदींना शब्द पाळायचा आहे. पहिल्या दिवसापासूनच असा कारभार करावा लागेल, की लोकांना वाटले पाहिजे... मोदी विश्वासाला जागले. मोदींनी आश्वासनपूर्तीच्या दिशेने पावले टाकणे सुरू केले आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात मोदींनी देशाला विकासाची स्वप्नं दाखवली, विकासाचे दावे केले, ते खरे करून दाखवण्याची वेळ आता सुरू झाली आहे. महागाई, भ्रष्टाचार, गोंधळ, बेरोजगारी यांमुळे आलेल्या निराशेच्या गर्तेतून देशाला बाहेर काढायचे आहे. मोदी बोलतात चांगले. स्वप्नं विकण्यातही ते वस्ताद आहेत. जे बोलले, ते आता सिद्ध करून दाखवावे लागेल. मागे एका मुलाखतीत त्यांना धर्मनिरपेक्षतेचा अर्थ विचारला होता. मोदी म्हणाले, ‘नेशन फर्स्ट.’ प्राधान्यक्रमाविषयी विचारले, तेव्हा मोदी पुन्हा म्हणाले, ‘नेशन फर्स्ट.’ म्हणजे देशाचा विचार आधी. देशहितापुढे सारे गौण आहे. मग प्रश्न निर्माण होतो, की देशहित म्हणजे काय? देशहित म्हणजे प्रत्येक नागरिकाचे हित. देशाच्या १२५ कोटी लोकसंख्येच्या हिताआड कुठला धर्म, जात, वर्ण, भाषा येता कामा नये. लोकशाहीत बहुमताचे सरकार असते. पण, बहुमताची हुकूमशाही नसते. अल्पमताच्या संरक्षणाची हमी लोकशाही देते. अल्पमताच्या संरक्षणाबद्दल मोदी सरकारला अधिक सावध राहावे लागेल. २००२मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगली ही विसरण्यासारखी गोष्ट आहे, असे भासवण्यात मोदींना यश आले असेल. पण, भाजपाच्या विजयी खासदारांमध्ये एकही मुसलमान नाही, एकही ख्रिश्चन नाही, हेदेखील वास्तव आहे. हे टाळता आले असते. अजून वेळ गेलेली नाही. ‘सर्वांचा भारत आणि सर्वांसाठी भारत’ हा नारा नव्या सरकारला वास्तवामध्ये खरा करून दाखवावा लागेल. अल्पसंख्याकांमधली भीती केवळ दूरच करायची नाही, तर त्यांना बरोबरीचे हक्क आपण देतो आहोत, असा विश्वास निर्माण केला पाहिजे. आपणही देशाचे समान हक्काचे नागरिक आहोत, असे अल्पसंख्याकांना वाटले पाहिजे, तरच ‘सच का साथ, सबका विकास’ हा नारा सार्थकी लागेल. देशाला भेडसावणारे प्रश्न सोडवायला घ्यायचे असतील, तर आर्थिक विकासाचा कार्यक्रम अग्रक्रमाने हाती घ्यावा लागेल, हे मोदींना छान कळते. पण, हे काम संघ परिवार किंवा उद्योगपतींच्या इशार्‍यावर चालून फत्ते होणार नाही. प्रश्न धोरणांच्या अंमलबजावणीचा आहे. आपल्याकडे धोरणं खूप ठरतात. पण, त्याला अनुकूल निर्णय होत नाहीत. ‘स्वत: निर्णय घेणारा नेता’ अशी मोदींची छबी आहे. या छबीला ते किती जागतात, ते पाहावे लागेल. तरुणांच्या समस्या आहेत, गरिबीचे प्रश्न आहेत. मोदी किती झटपट निर्णय करतात व किती प्रामाणिकपणे त्यांची अंमलबजावणी होते, ते पाहायचे. कुठल्याही सरकारकडे जादूची छडी असत नाही. छडी फिरवली आणि समस्या सुटल्या, असे होत नाही. तशी अपेक्षाही जनतेने करू नये. पण, समस्या सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न सरकार करीत आहे, असे लोकांना वाटले पाहिजे. जे बोललो ते होतंय, असे दिसले पाहिजे. मोदींना आपल्या क्षमतेचा परिचय द्यावा लागेल. ते इथपर्यंत पोहोचले, तो रस्ता खडतर होता. पण, या पुढचा रस्ता आणखी कठीण आहे...

(लेखक ज्येष्ठ स्तंभलेखक आहेत)

Web Title: Namozi has started working now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.