नाव फक्त सोनूबाई
By Admin | Updated: April 8, 2015 00:04 IST2015-04-08T00:04:10+5:302015-04-08T00:04:10+5:30
औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. प्रत्येक पक्ष विकासाचे स्वप्न दाखविण्यासाठी आपल्या जादूच्या पोतडीतून आश्वासनांची

नाव फक्त सोनूबाई
सुधीर महाजन -
औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. प्रत्येक पक्ष विकासाचे स्वप्न दाखविण्यासाठी आपल्या जादूच्या पोतडीतून आश्वासनांची वेगवेगळी आकर्षणं बाहेर काढत आहे. कोणी चोवीस तास पाणीपुरवठ्याचे चॉकलेट पुढे सरकवतो, तर कोणी चकचकीत रस्त्यांचे स्वप्न दाखवतो. मराठवाड्याची राजधानी म्हणून शहराच्या बव्हंशी विकासाचा धोशा कोणी लावतो. त्यामुळे औरंगाबाद शहर पाच वर्षांत पंचतारांकित अथवा आजच्या विकासाच्या निकषाच्या भाषेत ‘स्मार्ट सिटी’ होणार, असा समज व्हायला हरकत नाही. औरंगाबाद शहर मराठवाड्याची राजधानी. मोठा इतिहास असलेले, आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर असलेले शहर, वेरूळ-अजिंठा या पर्यटनस्थळांना जाण्यासाठी सोयीचे ठिकाण. याशिवाय देशाच्या औद्योगिक नकाशावरचे महत्त्वाचे शहर. आता तर दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये (डीएमआयसी) समावेश असल्याने उद्योग क्षेत्रात महत्त्व वाढलेले. कारण या योजनेअंतर्गत आज या शहरात उद्योगासाठी थोडीथोडकी नव्हे, तर दहा हजार एकर जमीन देशभरात या एकाच शहरात उपलब्ध असल्याने हेसुद्धा औरंगाबादचे वैशिष्ट्य बनले आहे. म्हणजे एखाद्या उद्योगाला आपला नवा उद्योग उभारण्यासाठी २०० एकर जमिनीची गरज असेल तर ती औरंगाबादमध्ये सहज उपलब्ध आहे.
राज्याचा विकास मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्ण त्रिकोणात एकवटला गेला आहे. उद्योगामुळे पायाभूत सेवा विकसित झाल्या; शिवाय जमीन, पाणी यामुळे पश्चिम महाराष्ट्र शेतीमध्ये पुढे आहेच.
मराठवाड्याच्या विकासाचे चक्र गतिमान होत नाही आणि ते फिरण्याचे संकेत असले तरी वास्तव वेगळेच आहे. औरंगाबाद शहराचा विचार केला तर शहराचा विस्तार अनिर्बंध झाला. लोकसंख्येच्या आधारावर महापालिकेला ‘क’ दर्जा मिळाला. म्हणजे १२ ते १५ लाख लोकसंख्येनुसार दर्जा वाढला; पण शहराची अवस्था ‘ड’ वर्ग महापालिकेपेक्षा वाईट आहे. महानगरपालिकेने गेल्या पाच वर्षात रस्त्यांसाठी २६० कोटी रुपये खर्च केले; पण शहरातील एकही रस्ता व्यवस्थित नाही. अनिर्बंध वाढीमुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. या नव्या दर्जानुसार शहराचे दरडोई उत्पन्न दरमहा पाच हजार रुपये असायला हवे. शहराची लोकसंख्या वाढली; पण दरडोई उत्पन्न मात्र तीन हजारांवर आहे. याचा अर्थ लोकसंख्या वाढली; पण त्या प्रमाणात रोजगार वाढला नाही. म्हणजे विकासाचे चाक रुतलेले आहे. दुसरीकडे मानव विकास निर्देशांकाचा विचार केला, तर औरंगाबाद तेराव्या क्रमांकावर आहे. त्याच्यावर सोलापूर, रत्नागिरी, सांगलीसारखे जिल्हे आहेत. मराठवाडा म्हणून उस्मानाबाद, बीड, जालना हे तर पार तळाशी गेलेले दिसतात. या घटकांचा विचार केला, तर औरंगाबाद शहर वाढले; पण विकास खुंटला. मराठवाड्यात एसईझेडची संख्याही नगण्य आणि त्यापैकी बहुतांश बंद पडलेले.
औरंगाबाद हे आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावरील शहर. वेरूळ, अजिंठ्यामुळे महत्त्वाचे; परंतु गेल्या काही वर्षांत पर्यटकांची संख्याही घटत आहे. गेल्या काही वर्षांत हे ठळकपणे जाणवते. औरंगाबादचे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे. येथे मुंबईसाठी पाच, तर दिल्लीसाठी एक अशी सहा उड्डाणे आहेत; पण गेल्या काही दिवसांत औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा बंद झाली. औरंगाबाद-दिल्लीचे एक उड्डाण बंद करण्यात आले. औरंगाबादला येणारे पर्यटक औरंगाबाद, वेरूळ,अजिंठा, शिर्डी असा दौरा ठरवून येतात. लवकरच शिर्डी येथील विमानतळ कार्यान्वित होण्याच्या तयारीत आहे. त्याचा फटका औरंगाबादला बसणार आणि येथील उड्डाणांची संख्या आणखी कमी होण्याचा धोका आहे. औरंगाबादेतील औद्योगिक क्षेत्र वाढले; पण बंद पडलेल्या उद्योगांची संख्याही मोठी आहे. ओस पडलेले चिकलठाणा औद्योगिक क्षेत्र त्याची साक्ष आहे. अशा एक ना अनेक आघाड्यांवर औरंगाबादची पीछेहाट चालू आहे. वाढते आहे ती लोकसंख्या आणि बकालपणा.