नाम हे परमात्म्याचे रूप
By Admin | Updated: June 5, 2014 08:59 IST2014-06-05T08:59:18+5:302014-06-05T08:59:18+5:30
सर्व साधनांत नाम खरोखर सारभूत श्रेष्ठ आहे. हे बोलणे समजत नसेल, तर वेद, शास्त्रे, पुराणे, संतवचने शोधून पाहा, व्यर्थ संशय सोडून शोध घ्यावा.

नाम हे परमात्म्याचे रूप
मोहनबुवा रामदासी
समस्तांमध्ये सार साचार आहे।
कळेना तरी सर्व शोभून पाहें।
जिवा संशयो वाउगा तो त्यजावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।।
श्लोकार्थ : सर्व साधनांत नाम खरोखर सारभूत श्रेष्ठ आहे. हे बोलणे समजत नसेल, तर वेद, शास्त्रे, पुराणे, संतवचने शोधून पाहा, व्यर्थ संशय सोडून शोध घ्यावा. त्या प्रभुरामचंद्रांचे रोज सुप्रभाती चिंतन करावे. भवसिंधू तरुण जाणेसाठी सर्व उपायांमध्ये रामनाम हेच साचार खरोखर सत्य साधन आहे. हे नीट समजत नसेल, तर बा मना, जरा नीट शोध घे म्हणजे ग्रंथ-ग्रंथातरी नीट विचार करून शोधून पाहा, सद्गुरूला शरण जाऊन त्यांचेकडून समजून घे, म्हणजे कळेल. पण असा काहीच प्रयत्न न करता नामात काय आहे? त्याने काय होणार? अशा निरर्थक संशयात गुरफटून राहू नकोस. संशयाने कल्याण होणार नाही. आयुष्य मात्र फुकट जाईल, असा या श्लोकाचा थोडक्यात मथितार्थ आहे. समर्थ सांगतात ‘रामदास म्हणे सारांचे ही सार। सर्वांसी आधार भक्ती भाव।। नाम हेच पारमार्थिक साधनातील सारभूत साधन आहे. याबद्दल सर्वच संतांची एकवाक्यता आहे, हे नामसाधन सार कसे याचा येथे उलगडा न करता त्याचा जिवा तूच सर्व दृष्टीने विचार करून शोध घे, असे समर्थ सांगतात. नाम चिंतनाचे सामर्थ्य सामान्य मनुष्यास कळत नाही. ग्रंथ वाचून पांडित्य करणार्यासही त्याचे महत्त्व कळून तो ते साधन म्हणून आचरणात आणेलच असे नाही. त्याला सद्गुरूकृपा हवी. त्या वाचून ते कळणार नाही. भगवत्नाम, भक्ती, प्रेम ही गूढ रहस्ये आहेत. ती बोलण्याची नाहीत, अनुभवाची आहेत. या गूढ रहस्याचा अनुभव गुरूकृपेवाचून येत नाही. सर्व संतांनी नाम हेच सार का म्हटले? जे कालाच्या मर्यादेत न राहता चिरंतन असते ते सार. उदा. सोने हे सत्य, पण त्याच रूपाने दागिने हे असत्य. तसेच परमात्मा हा सत्य व त्याच्या आधारावर भासमान होणारे नानारूपाने नटलेले जग अशाश्वत. आकाराला आलेल्या दागिन्याची रूपे नष्ट झाली तरी त्या रूपाबरोबर सत्य सोने नष्ट होत नाही, ते राहतेच. माणसांची नावे धारण करणारी अनेक रूपे जन्माला आली. नामानेच त्यांच्या रूपाची ओळख पटली. ती नामे नष्ट झाली तरी नामे मागे कायम आहेतच. मग नाम हे देशकाल मर्यादेपलीकडचे आणि रूपापेक्षाही ते जास्त सत्य म्हणून श्रेष्ठ नाही का? या सत्ला म्हणजे परमात्म्याला काही रूप दिल्याशिवाय त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही. म्हणून नाम हेच त्याचे रूप होय. भगवंत हा सर्व सृष्टीचा एकच आधार असून, तो अलौकिक चैतन्य घन असल्यामुळे त्याचे नामही आपोआपच भौतिक अत एव सत्य आहे.