माझे गुरू
By Admin | Updated: August 7, 2016 02:07 IST2016-08-07T02:07:57+5:302016-08-07T02:07:57+5:30
‘गुरू: ब्रह्मा गुरू: विष्णू, गुरू: देवो महेश्वरा,गुरू: साक्षात परब्रम्ह, तस्मै: श्री गुरूवे नम: ! गुरूची महती दर्शविणारा हा संस्कृत श्लोक. गाणे असे क्षेत्र आहे, जिथे चांगला गुरू मिळणे

माझे गुरू
- आनंद भाटे
‘गुरू: ब्रह्मा गुरू: विष्णू, गुरू: देवो महेश्वरा,गुरू: साक्षात परब्रम्ह, तस्मै: श्री गुरूवे नम: ! गुरूची महती दर्शविणारा हा संस्कृत श्लोक. गाणे असे क्षेत्र आहे, जिथे चांगला गुरू मिळणे खूप महत्त्वाचे असते. कोणतीही कला ही पुस्तक वाचून शिकता येत नाही. त्यासाठी चांगल्या गुरूंचे मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. मला प्रत्येक टप्प्यावर चांगले गुरू मिळत गेले, हे मी माझे भाग्य समजतो.
अगदी लहान असताना घरी जेव्हा गाण्याची सुरुवात झाली, तेव्हा घरात गाणे होते, माझ्या पणजोबा, भाटेबुवांमुळे. त्या काळात ते खूप प्रसिद्ध होते. त्या वेळपासून घरात गाण्याची परंपरा चालत आली आहे. बाबा खूप चांगले गायक होते. दोन्ही बहिणीदेखील उत्तम गायच्या. त्या परफॉर्मर नाहीत, पण छान गातात. बाबा आणि बहिणी हे अगदी माझे पहिले गुरू म्हणता येतील, ज्यांनी पहिल्यांदा माझ्या गाण्याचे इंक्लिनेशन ओळखले, मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे पुढे गाण्याकडे वळू शकलो. बालगंधर्वांचे नाट्यसंगीत सर्वप्रथम चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडून शिकलो. हरिभाऊ देशपांडे जे बालगंधर्वांचे आॅर्गनवादक होते, त्यांचे ते चिरंजीव. त्यांनी बालगंधर्वांची गाणी शिकविली. त्या वेळी माझे वय लहान होते. त्यामुळे त्यांना माझ्या कलाने शिकवावे लागले. काही गाण्यांचे ताल अवघड आणि सोपे आहेत, पण माझी आकलन शक्ती पाहून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मला शिकविले. मी स्वत: थोडी पेटी वाजवत असल्याने, ती घेऊन त्यांच्यासमोर बसायचो आणि देशपांडे गुरूजींचे तबल्याचे ज्ञान उत्तम असल्याने तबल्याच्या बरोबरीने ते मला शिकवायचे. त्याच्यामुळे फायदा असा झाला की, तालाचा सेन्स हा शिकता-शिकताच आला. त्याच्यासाठी वेगळी प्रॅक्टिस करावी लागली नाही.
कुठलेही गाणे म्हटले की, शास्त्रीय संगीताचा पाया हा लागतोच. नाट्यसंगीत शिकायला लागलो, तसे दोन ते चार वर्षांनी शास्त्रीय संगीतही शिकायला लागलो. यशवंतबुवा मराठे गाण्यातले अतिशय चांगले गुरू. त्यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. ते जसे शास्त्रीय संगीतात पारंगत होते, तसेच ते संस्कृतचे अभ्यासक होते. त्यांना दृष्टी नव्हती. तरीही सुरुवातीला दोन्हीचे शिक्षण घेतल्यामुळे ते दोन्ही क्षेत्रात शिकवायचे. संस्कृतमध्ये वेदांत वाचून दाखवायला लोके यायचे. मग ते त्याचा अर्थ सांगायचे. गाण्यातही खूप विद्वान. माझा गाण्याचा पाया त्यांनी तयार करून घेतला. गाणे कसे ऐकावे, लोकांकडून कसे शिकावे ही दृष्टी त्यांनी दिली. त्याचा पुढे खूप फायदा झाला. एक महत्त्वाचे म्हणजे, पुरुषांचा आवाज जेव्हा फुटतो, तो एक शारीरिक बदलाचा तीन ते चार वर्षांचा काळ असतो, त्यात विशेष रियाज करावा लागतो. मग तो खर्जाचा असो किंवा ओंकार साधनेचा. रियाज विशेषत: वरच्या स्वरांवर लक्ष्य केंद्रित करावे लागते. इथे गुरूंचे मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे असते. त्या बदलाच्या काळात आवाज परत नीट होऊन सेट होतो. पुढचे सगळे करिअर त्यावर अवलंबून असते. जसा शास्त्रीय संगीताचा पाया हा रागसंगीत. त्या रागसंगीतातील ठुमरीसारखे सांगीतिक प्रकार त्यांनी करवून घेतले. या टप्प्यावर त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल सदैव त्यांचा ॠणी राहीन. नंतर भाग्य लाभले ते पंडित भीमसेन जोशी यांच्याकडे शिकण्याचे. १९८८पासून जवळपास २० ते २२ वर्षे त्यांच्याकडे शिकण्याचा योग आला. लहानपणापासून भीमसेनजींचे गाणे खूप आवडायचे. जेव्हा शिकत होतो, तेव्हा जी गाणी ऐकायचो, त्यात भीमसेनजींची गाणी होती. शास्त्रीय संगीत म्हटले की, ते भीमसेनजींसारखेच पाहिजे असे एक समीकरण होते. त्यांच्याकडे गेल्यावर जेवढे शिकलो, तेवढे त्यांना गाऊन दाखविले. बालगंधर्वांची माझी गाणी त्यांनी ऐकली होती. त्यांनी जेव्हा शिकविण्यासाठी होकार दिला, तेव्हा एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले.
भीमसेनजींबद्दल बोलायचे झाले, तर शब्दही अपुरे पडतील, दैवी व्यक्तिमत्त्व आणि दैवी गाणे असा आम्हा शिष्यांना अनुभव यायचा. अतिशय मोठे गायक असूनही ते एक चांगले गुरूही होते, हे मिश्रण खूप महत्त्वाचे आहे. सुरुवातीला माझा आवाजाचा रियाज त्यांनी करून घेतला. विशेषत: गायकी शिकविली. शिष्याला किराणा घराण्याच्या गायकीचे ज्ञान त्यांनी दिले. त्यांचे मन इतक मोठे होते की, गाणे शिकता-शिकता माझे इंजिनीअरिंग, एमटेक सुरू होते. आयटीमध्ये नोकरीही केली. त्यांनी मला दोन्ही चालू ठेवायला प्रोत्साहन दिले. असे होते की, गुरू सांगू शकतो की, एक तर तू शिक्षणावर तरी लक्ष्य केंद्रित कर किंवा गाण तरी शिक. मात्र, त्यांना मी शिकतोय, याचे कौतुक होते. गाणे कसे गावे, लय कशी असावी, प्रेक्षक बघून रागाची निवड कशी केली पाहिजे. ते एक वैविध्यपूर्ण शिक्षण होते. ते कधी-कधी खूप बोलायचे नाहीत, जे बोलायचे ते गाण्यातून. त्यात खूप अर्थ सामावलेला असायचा. आपल्याला जो वेळ मिळाला आहे, त्यामध्ये गाणे मांडता आले पाहिजे. शिष्यांना ते हेदेखील सांगायचे, तुम्ही तुमच्या आवाजात गा, कुणाच्या आवाजाची नक्कल करू नका, प्रत्येकाची शैली ही वेगळी असते. हा आमच्यासाठी खूप मोठा धडा होता. त्यांचे व्यक्तिमत्त्व अद्वितीय होते. लोकांशी जसे संवाद साधायचे, त्यामुळे कुणीही येऊन त्यांच्याशी बोलू शकायचे. ज्यांना गाण्याचे शास्त्र माहीत आहे, त्यांना आणि ज्यांना माहीत नाही, त्यांनाही समजेल अशा भाषेत त्यांनी गाणे पोहोचविले. त्यांच्याबरोबर राहाणे, शिकणे त्यांना बघणे हा कधीही विसरता न येण्यासारखा अनुभव आहे. (आॅगस्ट महिन्याचे मानकरी असलेले लेखक प्रसिद्ध गायक आहेत.) शब्दांकन : नम्रता फडणीस