मोदीसाहेब, लोक नाराज का आहेत?

By Admin | Updated: June 10, 2015 00:36 IST2015-06-10T00:36:51+5:302015-06-10T00:36:51+5:30

सत्तेचे एक वर्ष पूर्ण होताच ‘मोदी भक्त’ आणि ‘मोदी विरोधक’ विविध माध्यमांद्वारे आपापली बाजू त्वेषाने मांडताना दिसत आहेत.

Modi saheb, why are people angry? | मोदीसाहेब, लोक नाराज का आहेत?

मोदीसाहेब, लोक नाराज का आहेत?

डॉ. गिरीष जाखोटीया
सत्तेचे एक वर्ष पूर्ण होताच ‘मोदी भक्त’ आणि ‘मोदी विरोधक’ विविध माध्यमांद्वारे आपापली बाजू त्वेषाने मांडताना दिसत आहेत. काही जण कुंपणावर बसून मजादेखील बघत आहेत. (म्हणजे भाजपाचा रोष नको नि काँग्रेसची नाराजीही नको!) एकूण मतांपैकी फक्त ३१ टक्के मते मिळवून ‘स्पर्धात्मक राजकारणा’त ‘भाजपा-समूह’ सत्तेत आला. निवडणुका होण्यापूर्वी, झाल्यावर व गेल्या पंधरवड्यातील ‘मोदी-प्रिय’ अर्थशास्त्रीय विधाने तसापली की कळू लागते ‘मुळातच काहीतरी गडबड आहे’ ज्या स्व.दिनदयालजी उपाध्याय यांचे नाव संघ सदस्य नेहमी घेतात त्यांच्या ‘एकात्म मानववादा’च्या अंमलबजावणीची पूर्ण खात्री आता वाटत नाही. साठ वर्षाच्या काँग्रेसी कारकिर्दीशी एका वर्षाच्या ‘मोदी कारकिर्दी’ची तुलना करता येणार नाही, हे मान्य. परंतु गेल्या वर्षभरातील घटनांचे व घोषणांचे परखड विश्लेषण केले तर भारतीय सामान्यजन मोदी साहेबांबाबतीत नाराज का होत आहे याची कारणे समजू शकतात.
या नाराजीची मला दहा कारणे दिसतात. त्यातील काही दूरगामी परिणाम दाखविणारी आहेत. अपेक्षा प्रचंड वाढवून सत्तारूढ झाल्यानंतर अपेक्षापूर्ती करण्यासाठी बऱ्याच गोष्टींची सांगड घालावी लागते हे मोदी साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांना पुरेपूर माहीत होते. ‘मी दिल्लीत नवा आहे शिकतो आहे’ अशा विधानाने मग सुटका होत नाही. परदेश दौऱ्याची निवड, तेथील संभाषणे व आश्वासने पाहता, मोदी आंतराष्ट्रीय राजकारणात खूप मुरल्यासारखे वाटतात. पण मायदेशी मात्र नाराजी ओढवून घेतात, याचे महत्वाचे कारण त्यांच्या ‘अर्थनीती‘मध्ये दडले आहे.
प्रा. भगवती व प्रा.पंगारिया सतत अर्थवृध्दी- गुंतवणूक बदल याबाबत बोलतात. दुसऱ्या बाजूला प्रा. अमर्त्य सेन हे रोजगार व गरिबांची कार्यक्षमता वाढविण्याबाबत बोलतात. मोदींच्या पहिल्या वर्षाच्या कामावरून त्यांना अर्थवृद्धीची घाई झालेली दिसते पण त्यातून निघणाऱ्या संधीवर गरीब कसे काम करतील, या बाबतीत ‘कार्यात्मक’ व ‘धोरणात्मक’ असे ठोस पाऊल उचललेले दिसत नाही. ‘संधी’ आणि ‘कार्यक्षमता’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या पहिल्या कारणास जोडून दुसरे कारण आहे, ‘शिक्षण धोरणा’बाबत. मला आश्चर्य वाटते की मोदीजींना संघ परिवारात श्रीमती स्मृती इराणींपेक्षा अधिक चांगला शिक्षणतज्ज्ञ मिळू नये? आजच्या बीकॉम, बीए, बीएस्सीसारख्या पदव्या बाजारात चालत नाहीत. भारतीय प्राध्यापकांची सरासरी कुवतही जेमतेम आहे. उत्तम कौशल्याबाबतीत हलगर्जीपणा केल्यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्था ‘मंद’ झाली आहे. भगवती-पंगारियांनी हे मोदींच्या निदर्शनास आणून दिले असावे.
नाराजीचे तिसरे कारण सर्वात महत्त्वाचे. जमीन अधिग्रहण कायद्यामध्ये गंभीर त्रुटी आहेत. सर्वांचेच भले साधणारा कायदा प्रस्तुत लेखकाने भारतीय किसान संघास पाठविला व या संघाने त्याचे स्वागत केले. ‘मर्यादित जबाबदारीची कंपनी’ चालविणारा उद्योगपती व अमर्याद जोखीम घेणारा शेतकरी, अशा एकूणच व्यवहारात शेतकऱ्याला पूर्ण न्याय देणारा कायदा हवा. मोदींच्या सरकारने ही काळजी नीटपणे घेतलेली दिसत नाही. जमिनीचे मूल्यांकन, भविष्याची तरतूद, भाडेपट्टीवर देण्याचे स्वातंत्र्य जमिनीच्या वाढीव बाजारभावातील हिस्सा इ. गोष्टींचा साकल्याने विचार केलेला नाही. मोदी सरकारबद्दलचे या बाबतीतले तयार झालेले ‘जनमत’ धोकादायक ठरू शकते.
चौथे कारण महराष्ट्रातील जलसिंचनाच्या घोटाळ्याची चौकशी करण्याबाबतचे. ‘स्पर्धात्म राजकारणा’मध्ये अस्पृश्यता पाळता येत नाही, हे पुढाऱ्यांचे खूप आवडते विधान आहे. परंतु जनता अशा विधानांना हल्ली भुलत नाही. एका संघीय कार्यकर्त्याने याबाबतीत माझ्याकडे मजेशीर विधान केले.तो म्हणाला, ‘मोठ्या उद्दिष्टासाठी काही छोट्या तडजोडी कराव्याच लागतात’!
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव ५० टक्क््यांनी घसरल्यानंतर भारतातील भाव त्या प्रमाणात कमी झाले नाहीत. तेल कंपन्यांचा जुना तोटा भरून काढणे, भविष्यनिधी वाढविणे इ. कारणासाठी येथील किरकोळ विक्रीचे भाव विशिष्ट पध्दतीने हाताळावे लागतात. अशी कारणमीमांसा नीटपणे न सांगितल्याने भारतीय ग्राहक संभ्रमित आहे. नाराजीचे हे पाचवे कारण गंभीर आहे. भरीस भर म्हणून सेवाकर १४ टक्के केला. इथे काही टप्पे करता आले असते. सरसकट १४ टक्के जुलमी वाटतात.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय साप्ताहिके स्वार्थासाठी गरीब देशांच्या प्रमुखांवर टीका करतात. परंतु एक मात्र सत्य की, मोदींंची प्रतिमा सरकार व पक्षापेक्षा खूप मोठी वाटते. ‘सामूहिक नेतृत्वा’ बद्दल नेहमी बोलणाऱ्या संघासाठी ही बाब नक्कीच दुर्लक्षणीय नसेल. मोदींच्या झंझावातामुळे हवशे-गवशे-नवशेसुध्दा निवडून आले. परंतु ही जादू दिल्लीत चालली नाही. मोदींचे ‘स्व-प्रतिमा प्रेम’ धोकेदायक ठरू शकते. अन्य मंत्र्यांना स्वातंत्र्य किती, हा प्रश्न जनतेला नक्कीच सतावतो व हे नाराजीचे सातवे कारण होय.
सत्तेचे एक वर्ष पूर्ण झाले तरीही पण मोदींची भाषणे प्रचारकी व आक्रमक वाटतात. चीनमधील भारतीयांसमोरचे भाषण हे याचे उत्तम उदाहरण होय. नाराजीचे हे आठवे कारण. विशिष्ट उद्योग समूहांसाठी मोदी जास्त काम करतात, असेही जनमत आज बनले आहे. ‘मुद्रा’ बँकेचे उद्घाटन झाले, ही एकूण संकल्पना चांगलीच आहे. परंतु भाजपाचा मतदार असलेला छोटा उद्योजक अजून तरी वाढीव व्याजदराने व महागाईने त्रस्तच आहे. हे नववे कारण भाजपाच्या परंपरागत मतदार समूहास छोटे करू शकते. नाराजीचे दहावे कारण बहुधा मोदींच्या नियंत्रणात नसावे. त्यांच्या पितृसंस्थेने या बाबतीत गांभीर्याने विचार करावयास हवा. भारतातील वीस कोटी मुस्लिमांना आश्वस्त करणारे, त्यांच्या आर्थिक व सामाजिक उत्थानासाठी आवश्यक असणारे उत्तम- टिकाऊ -पारदर्शक धोरण संघपरिवाराकडे नसावे. गेल्या तीन दशकात ‘मुस्लीम जग’ ढवळून निघाले आहे. भारतीय मुस्लीम हे जगातील समस्त मुस्लिमांना ‘सहकार्यात्मक विकासाच्या मार्गावर आणू शकतात. अशी दूरदृष्टी संघाकडे आहे की नाही, माहीत नाही. पण मोदी त्यांची नाराजी कशी दूर करतात, ते पाहावे लागेल.

(लेखक हे नामवंंत अर्थतज्ज्ञ आहेत)

Web Title: Modi saheb, why are people angry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.