उत्तर प्रदेशातील अपूर्व विजयाचा अर्थ

By Admin | Updated: May 17, 2014 13:24 IST2014-05-17T13:24:28+5:302014-05-17T13:24:56+5:30

लोकसभेच्या ८0 जागा असलेल्या उत्तर प्रदेश राज्याने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चमत्कार घडविला आहे.

Meaning of Apoorva Vijay in Uttar Pradesh | उत्तर प्रदेशातील अपूर्व विजयाचा अर्थ

उत्तर प्रदेशातील अपूर्व विजयाचा अर्थ

>विश्लेषण
कृष्णप्रताप सिंह -ज्येष्ठ पत्रकार
 
लोकसभेच्या ८0 जागा असलेल्या उत्तर प्रदेश राज्याने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चमत्कार घडविला आहे. या राज्यातील जनतेने समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस या पक्षांच्या विरोधात मतदान करून भारतीय जनता पक्षाच्या झोळीत आपली मते टाकून त्या पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड संख्येने विजयी केले आहे. एवढा विजय मिळेल, अशी त्या पक्षाने कधी अपेक्षाही केली नव्हती.  उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला राम मंदिर आंदोलनाच्या काळातही एवढे यश मिळाले नव्हते. 
अंतर्गत आणि बाह्य विरोधाला डावलून भाजपाध्यक्ष राजनाथसिंह यांनी नरेंद्र मोदींच्या नावाची ‘रालोआ’चे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केल्यानंतर अमित शाह यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी नेमण्यात आले होते. अमित शाह यांनी उत्तर प्रदेशातील ५0 जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले होते. त्या वेळच्या परिस्थितीत ते लक्ष्यही कठीण वाटत होते. उत्तर प्रदेशातील ज्या भाजपा नेत्यांकडे बूथ सांभाळण्याची जबाबदारी ते सोपवीत होते, ते ती जबाबदारी झटकून टाकीत पळ काढीत होते. निवडणुकीचा प्रचार सुरू असताना डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या नेत्यालाही मोदींची लाट कुठे दिसत नव्हती.
उत्तर प्रदेशात भाजपाला अपेक्षेपेक्षा जे अधिक प्रमाणात यश मिळाले, ते अमित शाह यांच्या रणनीतीचे आणि निवडणूक व्यवस्थापनाचे यश समजायला हवे, त्यामुळे उमेदवारांच्या तिकीट वाटपावरून भाजपात जो असंतोष निर्माण झाला होता, त्यावर नियंत्रण ठेवणे त्यांना शक्य झाले. तसेच उत्तर प्रदेशातील निरनिराळ्या राजकीय पक्षांत जो अंतर्विरोध होता, त्याचा लाभही त्यांना घेता आला. 
मोदींना रोखण्याचा खरोखर कोणता पक्ष प्रयत्न करीत आहे, हे अल्पसंख्य समाजाला समजले नाही, त्यामुळे त्या पक्षाची मते अन्य पक्षात गेली. त्याचा एकगठ्ठा लाभ मिळण्याची संधी या पक्षांनी गमावली. आपली खरी लढाई बसपाशी आहे, असा भ्रम भाजपाने जाणीवपूर्वक पसरविला. त्याचा लाभ त्या पक्षाला मिळाला. मुस्लिम-यादव समीकरण अनेक कारणांनी विस्कळीत झाल्यामुळे, समाजवादी पक्षाच्या मार्गात अडचण निर्माण झाली. याशिवाय दिल्लीतील काँग्रेसच्या सरकारला चालविण्याचे काम सपा आणि बसपा हे पक्ष करीत असल्याने, त्यांना मतदान करणे म्हणजे काँग्रेसला मतदान करण्यासारखे आहे. या कल्पनेने मतदारांनी या दोन्ही पक्षांना मतदान केले नाही. काँग्रेसविषयी असलेला देशव्यापी संताप या राज्यातही पक्षाला भोगावा लागला.
नरेंद्र मोदींच्या ‘गुजरात मॉडेल’चा आणि विकासाचा हा विजय आहे, असे प्रतिपादन भाजपातर्फे करण्यात येत आहे. या विकासाच्या मॉडेलने बसपाच्या सोशल इंजिनियरिंगवर तसेच सपाच्या धर्मनिरपेक्षतेवर आणि काँग्रेसच्या सर्वधर्मसमभावावर मात केली. भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात राममंदिराचा समावेश केला नसता तर भाजपाचा दावा सार्थ ठरला असता. भाजपाच्या उत्तर प्रदेशातील नेत्रदीपक विजयाचे कारण मध्यमवर्गाला राहुल गांधी, मुलायमसिंह यादव आणि मायावती यांच्याविषयी वाटणारा तिरस्कार हेही आहे.
निवडणूक वेिषकांचे म्हणणे आहे, की काँग्रेस आणि भाजपा यांना मध्यमवर्ग आणि सवर्णांचा आधार असतो, त्यांपैकी एकाचा आधार कमजोर होतो तेव्हा तो दुसर्‍यास अजिंक्य करीत असतो. या वेळी त्याने भाजपाला अजेय बनविले. आपल्या सुनामीमध्ये सपा, बसपा आणि काँग्रेस हे सारे वाहून जातील, असे मोदी जे म्हणत होते ते खरे ठरले आहे.

Web Title: Meaning of Apoorva Vijay in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.