चीन सध्या एका वेगळ्याच समस्येनं त्रस्त आहे. एकीकडे तिथली युवापिढी लग्नाला, मुलं जन्माला घालायला नकार देते आहे, दुसरीकडे स्त्री-पुरुषांच्या लिंग गुणोत्तरात कमालीचा विरोधाभास दिसतो आहे. चीनमध्ये अनेक कारणांनी तरुणाईनं लग्नाकडे पाठ फिरवली आहे, मात्र दुसरीकडे असंही चित्र आहे, अनेक तरुणांना लग्न तर करायचं आहे, पण त्यांना मुलीच मिळत नाहीत.
चीनमध्ये २०२० साली झालेल्या जनगणनेनुसार १०५ पुरुषांमागे केवळ शंभर महिला आहेत. दहा ते चौदा वयोगटात हेच प्रमाण ११८ मुलांमागे केवळ शंभर मुली आहेत. हेच कारण आहे की अनेक तरुणांचं लग्नाचं वय उलटत चाललंय. त्यामुळे लग्नासाठी मुली पुरवणाऱ्या तस्करांच्या अनेक टोळ्या चीनमध्ये कार्यरत झाल्या आहेत. बांगला देश, म्यानमार, व्हिएतनाम, कंबोडिया.. यासारख्या गरीब देशांतील मुलींना फूस लावून, त्यांना नोकरीचं, चांगल्या आयुष्याचं आमिष दाखवून चीनमध्ये आणलं जातं आणि इथे आल्यावर त्यांना विकलं जातं.
त्यांच्यावर एकतर शरीरविक्रीसाठी दबाव आणला जातो, मुलं जन्माला घालण्यासाठी त्यांच्यावर सक्ती केली जाते किंवा त्यांचा बळजबरी विवाह लावून दिला जातो. या तस्करांच्या नादी लागून चीनमधील अनेक तरुणांना आतापर्यंत आपला खिसा रिकामा करावा लागला आहे आणि त्यांचं दिवाळं निघालं आहे. त्यामुळे खुद्द चीन सरकारनंच आता आपल्या नागरिकांना आवाहन केलं आहे की, लग्नासाठी कोणीही बांगला देश, म्यानमारसारख्या देशांतून मुली ‘विकत’ आणू नका! या हनी ट्रॅपमध्ये अडकून तुम्ही तर फसालच, पण त्यामुळे देशाचंही नुकसान होईल ! नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार २०५० पर्यंत चीनच्या सुमारे ५ कोटी पुरुषांचं लग्न होऊ शकणार नाही. कारण चीनमध्ये त्यांच्यासाठी मुलीच नाहीत !
चीनमधील तरुण पुरुषांचा हा प्रश्न मिटवण्यासाठी, त्यांचा विवाह व्हावा यासाठी विदेशातून मुली ‘आयात’ कराव्यात असा सल्ला गेल्या वर्षीच चीनमधील जियामेन विद्यापीठाच्या एका प्रोफेसरांनी दिला होता. त्यामुळे चीनमधील घटते विवाह आणि स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर यात सुधारणा होईल असं त्यांचं मत होतं. यामुळे महिलांचं शोषण वाढून वेश्याव्यवसायाला उत्तेजन मिळेल अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली होती, पण ही गोष्ट आता खरी होताना दिसते आहे. चिनी पुरुष मोठ्या प्रमाणात तस्करांच्या जाळ्यात फसत आहेत.
हे तस्कर चीनच्या शेजारील देशांमध्ये खेडेगावांत, गरीब वस्तीत जाऊन मुलींना, त्यांच्या आईबापांना खोटी आमिषं दाखवून चीनमध्ये आणतात आणि इथे आल्यावर त्यांचा पाच हजार ते वीस हजार डॉलरमध्ये सौदा करतात ! भारतीय रुपयांत ही किंमत साधारणपणे चार ते वीस लाख रुपये इतकी होते. ज्या चिनी पुरुषांना या मुली विकल्या जातात, त्यातील बहुतेक पुरुष अल्पशिक्षित शेतकरी किंवा मजूर आहेत. ‘बायको’ मिळवण्यासाठी ते या तस्करांच्या संपर्कात येतात. बऱ्याचदा त्यांची फसवणूकच होते. पैसे तर जातातच, ‘बायको’ही मिळत नाही. एकच मुलगी अनेकांना विकल्याचीही अनेक उदाहरणं इथे घडली आहेत. अनिच्छेनं इथे आलेल्या या मुलीही देहविक्रीच्या चक्रव्यूहात अडकतात. ‘तुम्ही आम्हाला मूल द्या, आम्ही तुम्हाला जाऊ देऊ’ या अहवालानं तर संपूर्ण जगात खळबळ उडाली होती!