शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

अग्रलेख: अरविंद केजरीवालांच्या अटकेने राजकारण ढवळून निघाले... या प्रश्नांची उत्तरे मिळतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 06:49 IST

एवढे दिवस केजरीवाल यांना अटक केली नाही, तर लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया प्रारंभ होताच अटक का, या प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकार आणि ईडीकडून अपेक्षित आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे राजकारण ढवळून निघाले असतानाच, अनेक प्रश्नांनाही जन्म दिला आहे. देशातील सर्वसामान्य जनतेला त्या प्रश्नांची उत्तरे जशी केंद्रीय तपास संस्थांकडून, केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून हवी आहेत, तशीच ती केजरीवाल, त्यांचा आम आदमी पक्ष आणि सर्वच विरोधकांकडूनही हवी आहेत. केजरीवाल यांना ज्या प्रकरणात अटक झाली, तो दिल्लीतील मदिरा घोटाळा काही नव्याने उघडकीस आलेला नाही, तर सुमारे दोन वर्षांपासून गाजत आहे. त्याच प्रकरणात केजरीवाल यांचे मंत्रिमंडळातील सहकारी गत काही महिन्यांपासून कारागृहात आहेत. स्वत: केजरीवाल यांना गत काही दिवसांत सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीकडून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास बजावणारे तब्बल नऊ समन्स धाडण्यात आले होते; परंतु केजरीवाल यांनी त्यांना केराची टोपली दाखवली. मग एवढे दिवस केजरीवाल यांना अटक केली नाही, तर  लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया प्रारंभ होताच अटक का, या प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकार आणि ईडीकडून अपेक्षित आहे.

केंद्रीय तपास संस्था सातत्याने विरोधी नेत्यांनाच लक्ष्य का करतात? सत्ताधारी भ्रष्टाचार करीतच नाहीत का? जे विरोधी नेते सत्ताधारी गोटात सामील होतात, त्यांच्या विरुद्ध सुरू असलेली प्रकरणे थंड बस्त्यात का जातात? हे केवळ विरोधकांकडून होत असलेले आरोप नाहीत, तर सर्वसामान्य जनतेच्या मनातही हे प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे सत्ताधारी आणि तपास संस्थांकडून अपेक्षित आहेत. विरोधी पक्षांना येन केन प्रकारेण नामोहरम करून स्वत:चा सत्तेचा मार्ग निष्कंटक करण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोपही विरोधक करीत आहेत. त्यावरही सत्ताधाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे.

दुसरीकडे विरोधक निष्कलंक आहेत, अशातलाही भाग नाही. लालूप्रसाद यादव यांच्यासारख्या अनेक विरोधी नेत्यांना न्यायालयांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावल्या आहेत. केजरीवाल यांचे मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्यासारखे सहकारी गत काही महिन्यांपासून जामीन मिळत नसल्याने कारागृहात खितपत पडले आहेत. एवढे दिवस उलटूनही त्यांना न्यायालयांकडून दिलासा का मिळत नाही? केजरीवाल आणि सिसोदिया यांना ज्या मदिरा धोरण प्रकरणी अटक झाली आहे, त्या धोरणाची पाठराखण आम आदमी पक्ष अद्यापही करीत आहे. ते धोरण एवढेच चांगले आहे, तर घोटाळ्याचा गवगवा सुरू होताच धोरण रद्द का करण्यात आले? मुळात ही मंडळी देशातील राजकारण बदलण्याचा दावा करीत, राज्यघटना व कायदा सर्वोच्च मानून स्वच्छ व पारदर्शक कारभार करण्याचे आश्वासन देत सत्तेत आली होती. मग, केजरीवाल यांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन का केले नाही? वारंवार समन्स झुगारणे, हे कोणते कायद्याचे पालन आहे? केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आता आम आदमी पक्षाकडून केजरीवाल सरकारने दिल्लीत शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांमध्ये किती चांगले काम केले, याचे दाखले दिले जात आहेत; पण काही चांगली कामे केली म्हणजे भ्रष्टाचाराची मुभा मिळते का?

मदिरा घोटाळ्याची चर्चा सुरू होताच आम आदमी पक्षाला धारेवर धरणारे काही पक्ष आता त्याच पक्षाची पाठराखण का करीत आहे? मग त्यांची तेव्हाची भूमिका चूक होती की आताची? या प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य जनतेला विरोधकांकडूनही अपेक्षित आहेत. राहता राहिला प्रश्न राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्याचा, तर देशाचा इतिहास हे सांगतो, की जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाला सत्तेत असताना संधी मिळाली, तेव्हा त्यांनी कायदेशीर प्रक्रियांचा वापर करीत विरोधकांना चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. देशाच्या पातळीवर, राज्यांच्या पातळीवर अशी अनेक उदाहरणे आहेत. आणीबाणीत काय झाले होते? आणीबाणीनंतर सत्ताबदल होताच काय झाले होते? आज ज्यांच्या निर्देशांवरून केंद्रीय तपास संस्था विरोधकांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप होत आहे, त्यांनाही काही वर्षांपूर्वी तपास संस्थांचा वापर करून नामोहरम करण्याचा प्रयत्न झाला होताच ना? वस्तुस्थिती ही आहे, की धुतल्या तांदुळाचे कुणीही नाही! आज जे सुपात असतात, ते उद्या जात्यात असतात अन् जे आज जात्यात असतात, ते उद्या सुपात असतात! ही स्थिती बदलायची असल्यास, कायद्यांमध्ये बदल करून अधिक पारदर्शकता आणणे, कायद्यांमधील पळवाटा बंद करून खटल्यांचे निकाल ठरावीक कालमर्यादेत लागण्याची तजवीज करणे, हेच उपाय आहेत; पण त्यासाठी पुढाकार कोण घेईल?

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालArrestअटकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकCBIगुन्हा अन्वेषण विभाग