महात्मा गांधींच्या ‘अपहरणा’चा कट!

By Admin | Updated: October 1, 2015 22:02 IST2015-10-01T22:02:35+5:302015-10-01T22:02:35+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नथुराम गोडसे करवी महात्मा गांधींचा खून करविला. नथुरामला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आणि तो फाशी गेला

Mahatma Gandhi's 'abduction' cut! | महात्मा गांधींच्या ‘अपहरणा’चा कट!

महात्मा गांधींच्या ‘अपहरणा’चा कट!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नथुराम गोडसे करवी महात्मा गांधींचा खून करविला. नथुरामला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आणि तो फाशी गेला. महात्मा गांधींचा खून झाला त्या दिवशी पुणे आणि कोल्हापूरसारख्या अनेक शहरांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पेढे वाटले. आता नथुरामाच्या फाशीचा दिवस ‘शौर्य दिन’ म्हणून पाळणे सुरू केले आहे. नथुरामाची देवळे बांधण्याचे आदेश हिंदुत्ववादी संघटनांनी दिले आहेत.
दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आरूढ होऊन महात्मा गांधींच्या नावाची रस्ते झाडण्याची दिखाऊ योजना आणून ‘महात्मा गांधी की जय’ असे तोंडाने म्हणत आहेत आणि त्याचवेळी महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाच्या पूर्णपणे विरोधी धोरणे आखून ‘गांधीवाद मुर्दाबाद’ अशी कृती करीत आहेत. ‘महात्मा गांधी झिंदाबाद’ आणि ‘गांधीवाद मुर्दाबाद’ ही गांधींच्या अपहरणाची रणनीती आहे. प्रतिमा पुजायच्या आणि विचारांचे दफन करायचे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याची पिलावळ असलेल्या कथित हिंदुत्ववादी संघटनांची कार्यपद्धतीच आहे.
‘युद्धाच्या धुमश्चक्रीत मुसलमानांचा पवित्र गं्रथ कुराण हाती आला तर तो साफसुथरा करून आपल्या पदरी असलेल्या मुसलमानांकडे सुपूर्द करावा,’ अशी आज्ञा स्वत:च्या सहीने आपल्या सैन्याला देण्याच्या आपल्या हुकुमात छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहून ठेवले आहे, ‘आपला धर्म आपणास प्यारा, त्यांचा धर्म त्यांना प्यारा.’ असेही या आज्ञेत म्हटले आहे. त्या शिवाजी महाराजांचा जयजयकार करायचा आणि त्याचवेळी मुस्लिम द्वेष पसरविण्यासाठी खोटी व भडकाऊ भाषणे करण्याची प्रचारनीती अवलंबली जात आहे.
स्वामी विवेकानंद म्हणाले होते, ‘मी समाजवादी आहे’. त्यांनी केव्हाही परधर्मद्वेष सांगितला नाही. अशा स्वामी विवेकानंदांचे पुतळे व स्मारके उभी करायची परंतु, त्यांचे समाजवादासंबंधीचे व सर्वधर्म समभावाचे विचार गाडण्याची कृती करायची, ही रणनीती सुरू असते, अशी, अनेक उदाहरणे देता येतात. आता गांधींच्यासंबंधी हीच प्रचारनीती अंमलात आणली जात आहे.
महात्मा गांधींनी समाजातल्या सर्वांत दुबळ््या, बहुसंख्य समाज विभागांच्या कल्याणाचा विचार सांगितला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान मोदी समाजातील अत्यल्प भारतातील व परदेशातील सर्वांत श्रीमंत समाजविभागाला अधिक श्रीमंत करण्याचे धोरण राबवत आहेत आणि महात्मा गांधींचा जयजयकारही करत आहे.
महात्मा गांधींनी हरिजनोद्धाराचा विचार व कार्यक्रम सांगितला होता. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पिलावळ ‘गीता’ हा ‘राष्ट्रीय ग्रंथ’ म्हणून घोषित करा, अशी मागणी करीत आहे. राजस्थान हायकोर्टासमोर विषमतेचा ठाम पुरस्कार करणाऱ्या, मनुस्मृती सांगणाऱ्या मनुचा पुतळा बसविलाच आहे.
महात्मा गांधींची मनाची स्वच्छता करणारी मोहीम होती. शूद्रांच्यावर रस्ते, गटारे व संडास सफाईची कामे लादावयाची व आणि तसली कामे ते करतात म्हणून त्यांना हिणवून ‘शूद्र’ म्हणायचे. या नीतीला गांधींचा विरोध होता. उच्चवर्णियांनाही संडास, गटारे व रस्ते सफाई करायला शिकवून त्यांनी मने साफ करावयाची, ही त्यांची शिकवण होती. फोटो काढण्यापुरती सफाई करायची आणि मनात कथित शूद्रांच्या द्वेषाची जुनाट घाण तशीच ठेवायची व वाढवायची हे गांधींच्या शिकवणीच्या विरुद्ध आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंतप्रधान मोदी यांची सफाई मोहीम ही गांधीवादाची, गांधींच्या तत्त्वज्ञानाची ‘सफाई’ करण्यासाठी वापरली जात आहे. जे चालू आहे त्याचे वर्णन घोषणेत करायचे म्हटले तर नरेंद्र मोदींची घोषणा ‘महात्मा गांधी जिंदाबाद, गांधीवाद मुर्दाबाद’ असे ठळकपणे म्हणता येते. गांधींचा खून करूनही त्यांचा विचार संपत नाही, हे पाहिल्यावर प्रतिमांचा जयजयकार करणे व विचारांचे अपहरण करणे, ही रणनीती वापरली जात आहे. गांधीवादाचे अपहरण केले जात आहे आणि त्यात आणखीनच वाईट म्हणजे गांधींचा वारसा मिरवणारे (ते सुद्धा फक्त फोटोच लावतात) ते पराभवाने एवढे खचून गेलेले दिसतात की त्यांना काय करावे हेच कळत नाही. त्यांना कळत नसेल तर ना कळूद्या. काय चालले आहे, ते आपण समजून घेऊया आणि जमेल तेवढे करूया.
---------
सामाजिक विचारवंत गोविंद पानसरे यांनी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त लोकमतसाठी लिहिलेला हा लेख अंमळ उशीरा हाती आला. त्यानंतर महिनाभराच्या आतच पानसरे यांंची अत्यंत निर्घृण हत्त्या केली गेली. आज बापूंच्या जयंतीदिनी त्यांचा तोच अप्रकाशित लेख येथे प्रसिद्ध करीत आहोत.

Web Title: Mahatma Gandhi's 'abduction' cut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.