भाजपामध्ये निष्ठावानांना बळ

By Admin | Updated: January 30, 2015 03:16 IST2015-01-30T03:16:59+5:302015-01-30T03:16:59+5:30

केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्याने सत्ताधारी भाजपामध्ये प्रवेशासाठी अन्य पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे.

Loyal to the BJP | भाजपामध्ये निष्ठावानांना बळ

भाजपामध्ये निष्ठावानांना बळ

मिलिंद कुळकर्णी - 

केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्याने सत्ताधारी भाजपामध्ये प्रवेशासाठी अन्य पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. ‘शतप्रतिशत’चा घोष करीत विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढताना शिवसेनेच्या वाटेला असलेल्या मतदारसंघात झालेली दमछाक भाजपा नेते विसरलेले नाहीत. शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपा वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
पाचोरा या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार निवडून आले. तेथील मनसेचे उमेदवार डी.एम. पाटील आणि ऐनवेळी माघार घेतलेल्या राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या दोघांचा प्रवेश म्हणजे भाजपाच्या शतप्रतिशत व्यूहरचनेचा भाग आहे. अन्य पक्षातील माजी आमदार, नेते व प्रमुख कार्यकर्ते भाजपाच्या संपर्कात असल्याची जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची घोषणा त्याचेच निदर्शक आहे.
एकीकडे भाजपा प्रवेशाचे सोहळे रंगत असताना दोन प्रमुख पदांवर निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे. आयारामांचे स्वागत असले तरी लगेच पद मिळणार नाही, असा संदेश यानिमित्त पक्षाने दिला आहे.
एकनाथराव खडसे यांचे निकटचे सहकारी मो. हुसेन खान यांची राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. खान हे खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील आहेत. खडसे यांच्याकडे अल्पसंख्याक विकास हे खाते असल्याने त्यांनी समर्थकाला न्याय दिला. खान हे भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. खान यांच्या रूपाने मुस्लीम मते कायम खडसे यांना मिळत असतात. भाजपाविषयी मुस्लिमांना आक्षेप असला तरी जळगाव जिल्ह्यात खडसे यांच्याविषयी ममत्व आहे. त्यालाही कारण आहे. उर्दू शाळांचे प्रश्न, कब्रस्तानची जागा, हज यात्रेकरुंच्या अडचणी सोडविणे यासाठी खडसे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कॅबिनेट दर्जाचे हे पद जिल्ह्यातील समर्थकांसाठी खडसे यांनी खेचून आणले. अर्थात या पदासाठी भाजपामध्ये फारसे पर्याय नव्हते. त्यामुळे चुरस असण्याचा प्रश्न नव्हता.
विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी मात्र भाजपामध्ये मोठी चुरस होती. शायना एन.सी., माधव भंडारी, सुजीतसिंह ठाकूर यांची नावे चर्चेत असताना अचानक स्मिता वाघ यांचे नाव पुढे आले आणि त्यांची बिनविरोध निवड झाली. ही नियुक्ती धक्कादायक असली तरी वाघ या पदासाठी पात्र होत्या, हे निसंशय.
भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या वाघ यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. अमळनेर या विधानसभा मतदारसंघात इच्छुक असूनही पक्षाने दोनदा त्यांना डावलले तरी त्यांनी पक्षकार्य सुरू ठेवले. त्यांचे पती उदय वाघ हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळात भाजपाचे दोन खासदार, सहा आमदार, एक विधान परिषद सदस्य अशी भक्कम कामगिरी झाली. ही कामगिरीदेखील पक्षश्रेष्ठींनी विचारात घेतली असावी.
जिल्ह्यात एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांचे दोन गट कार्यरत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही गटांनी वाघ यांच्या नावाला संमती दिली. पुन्हा वाघ दाम्पत्याला अभाविपची असलेली पार्श्वभूमीदेखील लाभदायक ठरली. वाजपेयी-अडवाणींचा भाजपा ही ओळख पुसून मोदी-शाह यांचा भाजपा ही नवी ओळख रूढ केली जात असली तरी, पक्षकार्याला वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जात आहे. त्याचाच भाग म्हणून खान आणि वाघ यांच्या नियुक्तीकडे पाहायला हवे.
खान्देशातील एका आमदाराने भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास काही वर्षांपूर्वी असमर्थता व्यक्त केली होती. आता मंत्रिपदासाठी हे आमदार प्रयत्नशील असताना पक्षश्रेष्ठींनी त्यांना या गोष्टीची आवर्जून आठवण करुन दिली. भाजपाची आगामी काळातील दिशा यावरून स्पष्ट होते.
 

Web Title: Loyal to the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.