‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...

By विजय दर्डा | Updated: May 19, 2025 07:40 IST2025-05-19T07:39:58+5:302025-05-19T07:40:33+5:30

काहीही अशक्य नाही, असे मी मानतो. आपण आव्हान घेतले नाही तर दुसरा कोणी घेईलच. कुणी ते काम करणारच असेल तर मग आपणच का करू नये...? 

Lokmat Editorial How long we live is not important how we live is more important |  ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...

 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...


डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

मी आयुष्याची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. अंकगणिताच्या हिशेबाने पाहिले, तर हे वय मोजण्याचे एक परिमाण म्हणता येईल. माझे कुटुंब, माझे मित्र, मनापासून ज्यांना मी हवा असतो त्या सर्वांनी याला ‘अमृतमहोत्सव’ असे नाव दिले. खरे तर हा ‘अमृतोत्सव’! वाढदिवसाच्या दिवशी जगभरच्या जिवलगांनी माझी आठवण काढली.  खूप सारे संदेश मिळाले. शुभेच्छांची कोसळती बरसात इतकी दिलबहार होती, की मन प्रफुल्लित झाले. खरे सांगायचे तर आभार मानण्यासाठी शब्द अपुरे आहेत. मनापासून दिलेल्या शुभेच्छांसाठी ‘धन्यवाद’, ‘आभार’ हे शब्द पुरेसे कसे पडतील? बस, ‘आपल्या प्रेमापुढे मी नतमस्तक आहे,’ एवढेच म्हणू शकतो!

 पंचाहत्तर या वयाच्या टप्प्यावर पोहोचल्यावर मागे वळून पाहतो... माझ्याच एकूण प्रवासाचे आकलन, विश्लेषण करतो तेव्हा असे वाटते की  तारुण्यात प्रेमपूर्ण नात्यांची एक माळ गुंफायला घेतली होती, त्या कामाला परिपूर्तीचा आशीर्वाद मिळाला खरा! माझे जीवन आज मातीच्या सुगंधाने घमघमते आहे. या सुगंधाशी माझे घट्ट नाते जोडले ते माझे बाबूजी - ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जवाहरलाल दर्डा आणि जिला मी बाई म्हणतो ती माझी आई श्रीमती वीणादेवी दर्डा या दोघांनी! आयुष्यभरात अगणित डाव खेळलो, जीवनाच्या कितीतरी बाजू पाहिल्या, कित्येक वाटा-पायवाटा, रस्ते-हमरस्ते पायाखाली घातले, भाव-भावनांच्या हिंदोळ्यात रमलो, क्रीडांगणावर माझे कौशल्य अजमावले, वर्तमानपत्राच्या जगात स्थिर होता होता सामान्य माणसासाठी राजकारण करताना १८ वर्षे खासदार म्हणून काम करता आले. देश अगदी जवळून पाहण्याची, समजून घेण्याची  उत्तम संधी मिळाली. अंतःकरणातून कधी उत्स्फूर्तपणे कविता जन्माला आल्या तर कधी सहज कॅनव्हासवर कुंचला फिरत गेला... माझी सहप्रवासी ज्योत्स्ना मला संगीताच्या सुंदर आणि आध्यात्मिक जगात घेऊन आली.

आज मी माझ्या व्यक्तिगत जीवनातल्या या गोष्टींबद्दल मोकळेपणाने का लिहितो आहे, असा प्रश्न तुम्हाला पडेल. माझ्याबद्दल सांगणे मला महत्त्वाचे वाटते; कारण जगण्याचे इतके वेगवेगळे चेहेरे पाहण्याची, अनुभवण्याची संधी सगळ्यांनाच मिळते असे नाही. माझ्याजवळ जमलेल्या अनुभवाच्या पोतडीतले काही कुणाच्या उपयोगी पडू शकतात. तसेही आपण सगळे आपापल्या वडीलधाऱ्यांकडूनच खूप काही शिकत असतो. माझ्या आयुष्याच्या ७५ वर्षांतली किमान ५५ वर्षे मी सातत्याने काम करीत आलो आहे. जीवन किती दीर्घ आहे याला महत्त्व नसून ते किती गुणवत्तापूर्ण आहे, हे महत्त्वाचे. लहानपणी मी कबीर दास यांचा एक दोहा वाचला होता-
 बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड खजूर
 पंथी को छाया नही, फल लागे अति दूर

 याचा अर्थ असा की ज्याप्रकारे खजुराचे झाड कितीतरी उंच  असते   पण येणाऱ्या-जाणाऱ्याला ते सावली देऊ शकत नाही; आणि त्याची फळे तर इतकी उंच लागतात की सहजपणे तोडताही येत नाहीत; त्याच प्रकारे आपले वय वाढले तर असे काय मोठे झाले? समाजाला त्याचा फायदा काही झाला असेल तरच जगणे सफल झाले म्हणायचे! 

कबीराचा हा दोहा माझ्या जीवनाचे सूत्र कधीपासून झाले असेल?- सांगता येत नाही. पण,  बाबूजींची अखंड कर्मशीलता पाहून माझ्यामध्ये ती वृत्ती उपजली असण्याची शक्यता आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाला समर्पित केले होते. माझे जीवनही त्याच मार्गावर आहे. व्यक्तिगत आयुष्यातले यश हेही अखेर समाजासाठी, समाजाचेच असते ही आध्यात्मिक भावना नेहमीच माझ्या मनाशी राहिली आहे.

तरुण मित्रांना काही सांगावे असा अधिकार मी कमावला आहे. आज मी एवढेच सांगेन, की माझ्या वयाला किती वर्षे व्हावी हे गणित निसर्गाने ठरवलेले आहे खरे; पण आजही माझ्या मनाशी बालवयातले तेच औत्सुक्य, तेच चापल्य, तोच उत्साह मी कायम राखला आहे. जोवर तुमच्या मनातले बालपण अक्षय असेल, तोवर तुमच्या अंतरंगातले पावित्र्य जिवंत राहील आणि तुम्ही अखंड सक्रिय राहाल. चुपचाप स्वस्थ बसून राहिलेले छोटे मूल तुम्ही कधी पाहिले आहे का? मुले सतत काही ना काहीतरी करत असतात, उत्सुक नजरेने सतत नव्या गोष्टींचा शोध घेत नवे काही शिकत असतात. आणि आज विशी-पंचविशीत असलेली तरुण पिढी तर सतत बदलत्या  तंत्रज्ञानाच्या जगात जगते आहे. या जगात  ‘शिकण्याची इच्छा संपल्या’चा अर्थ आहे ‘रस्ते बंद होणे’. साफल्याच्या रस्त्यावर पुढे जायचे असेल तर शिकण्याची इच्छा कायम ठेवावी लागेल.

जीवनाचे उद्दिष्ट एखाद्याच्या कार्यातील सफलता किंवा असफलतेमध्ये नाही. उद्दिष्ट समोर ठेवून सातत्याने कर्तव्याचे पालन करण्यातच  जीवनाचे उद्दिष्ट सामावलेले आहे. भगवत गीतेचे  हे सार मला प्रेरणादायी वाटते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सल्ला देतात की ‘व्यक्तिगत लाभाची इच्छा न धरता किंवा पराभवाच्या भीतीने प्रभावित न होता काम करत राहिले पाहिजे’. आजवर मी संपूर्ण जीवनात याच धर्माचे पालन करत आलो. मी मोठी उद्दिष्टे ठेवतो असे माझे सहकारी अनेकदा म्हणत आले. खरेच आहे ते. मी मोठ्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करतो; कारण काहीही अशक्य नाही यावर माझा विश्वास आहे. आपण केले नाही तर दुसरा कोणीतरी ते करीलच. कुणी ना कुणी करणारच असेल तर मग आपणच का करू नये?- हे माझे तत्त्व आहे. समर्पण आणि जिज्ञासेची हीच भावना विज्ञानाचाही आधार आहे. त्याखेरीज आपले स्वप्न पुरे कसे होईल? बाबूजींनी ‘लोकमत’ ही संस्था मोठी करण्याचे स्वप्न पाहिले. त्यांच्यानंतर मी आणि माझे बंधू राजेंद्र यांनी ते स्वप्न साकार करण्याचा संकल्प सोडला. त्या स्वप्नाचे फलस्वरूप आज सर्वांसमोर आहे. देवेंद्र, ऋषी आणि करण यांचा संकल्प लोकमत परिवाराला आणखी मोठ्या शिखरावर घेऊन जाईल. या प्रवासात पूर्वा आपल्या तिन्ही भावांची प्रेरणा होईल.

आई-वडिलांचे आशीर्वाद, भावंडांचा जिव्हाळा आणि तुमच्या मुलांच्या प्रेमाची शक्ती पाठीशी नसेल, तर आयुष्यात यशप्राप्तीची अपेक्षा करणे कठीण आहे. कुटुंबाची शक्ती हीच सर्वोच्च असते. मी आवर्जून हेही सांगेन, की आपल्या पत्नीची उपेक्षा कधीही करू नका. त्याग, समर्पण आणि प्रेमाचे शिंपण करून तुमच्या कुटुंबाला आकार देणाऱ्या, तुमच्या आयुष्यात प्रेम-स्नेहाचे रंग भरणाऱ्या पत्नीची साथ नसेल तर तुमच्या जीवनाला काही अर्थ उरणार नाही. ज्याच्या पाठीशी कुटुंबाच्या प्रेमाची शक्ती असते, तोच आयुष्याचे शतक पूर्ण करू शकतो. 

भविष्य घाबरण्यासाठी नाही, तर या सुंदर जगाला आणखी चांगले करण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही घाबरता, चिंतेत पडता, तेव्हा आपले कौशल्य आणि सामर्थ्य तुम्ही स्वत:च कमजोर करीत असता. रागातून केवळ भ्रम उत्पन्न होतो आणि भ्रमित माणूस रस्त्यावरून भरकटतो. म्हणून क्रोधावर नियंत्रण ठेवा, अहंकारापासून दूर राहा आणि स्वतःला ओळखा. आपल्यामध्ये निसर्गाने एक संपूर्ण जग वसवले आहे. लोक नशिबाच्या गोष्टी करतात; मला ते फारसे पटत नाही. ज्ञानाने परिपूर्ण अशी आपली समर्पित कर्मशीलता हेच आपले नशीब होऊ शकते ही गोष्ट जरूर लक्षात ठेवा. जीवनाचे सार्थक ते किती दीर्घ आहे यात नसून, त्याची ‘गुणवत्ता’ काय यात आहे.

आपल्या सर्वांच्या शुभकामनांनी मला आणखीन गुणवत्तापूर्ण कर्मशीलतेसाठी प्रेरित केले आहे. सगळ्या जिवलगांचे आभार. आणखी एक विनंती. प्रत्येकाने आपल्या  छातीवर राष्ट्रध्वजाची पीन लावावी आणि  मनगटावर तिरंगा बँड जरुर बांधावा. तो तुम्हाला कुठे मिळत नसेल, तर मला जरुर कळवा.
 

Web Title: Lokmat Editorial How long we live is not important how we live is more important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.