शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नरेंद्र मोदी महाराष्ट्रात इतक्यांदा का येताहेत?

By यदू जोशी | Updated: May 3, 2024 08:22 IST

उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, कर्नाटकात प्रत्येकी पाच-सात जागांचा खड्डा पडला, तर तो भरून काढण्यासाठी महाराष्ट्रात भाजपची धावपळ चालू आहे!

यदु जोशी सहयोगी संपादक, लोकमत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंत महाराष्ट्रात १३ प्रचार सभा झाल्या आहेत.  शेवटच्या टप्प्यापर्यंत ते एकूण १८ ते २० सभा घेणार आहेत. अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनीही महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. सोलापूर आणि माढा हे  एकमेकांना खेटून असलेले मतदारसंघ; पण तिथे मोदींनी दोन वेगवेगळ्या सभा घेतल्या. २०१४ आणि २०१९ मध्येही मोदी महाराष्ट्रात इतक्यांदा आले नव्हते.

‘अब की बार चार सो पार’चा नारा भाजपने दिला असला, तरी उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, कर्नाटक या राज्यांमध्ये भाजपच्या एकतर्फी यशाबाबत साशंकता आहे. तिथे वेगवेगळ्या कारणांनी भाजपची डोकेदुखी वाढविली आहे.

उत्तर प्रदेशात सपा-काँग्रेसची आणि बिहारमध्ये राजद-काँग्रेस-कम्युनिस्ट आदी पक्षांची आघाडी यांनी भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आहे आणि सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे दोन तगडे काँग्रेस नेते, शिवाय मल्लिकार्जुन खरगे आहेतच. या राज्यांमध्ये गेल्यावेळच्या तुलनेत प्रत्येकी पाचसात जागांचा खड्डा पडला तर तो भरून काढण्यासाठी महाराष्ट्रात चाळीसचा आकडा गाठणे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊनच मोदींनी सभांचा धडाका लावला असावा.

दुसरा तर्क असाही दिला जातो की, काँग्रेस-शरद पवार-उद्धव ठाकरे या त्रयींनी उभे केलेले आव्हान मोडून काढण्यासाठी मोदी वारंवार येत आहेत. भाजपअंतर्गत नाराजी मिटवणे, तीन पक्षांमध्ये समन्वय राखणे, रुसवेफुगवे घालवणे, उमेदवार निश्चिती यात देवेंद्र फडणवीस अधिक गुंतून पडले. एकनाथ शिंदे यांनी जास्तीत जास्त लक्ष त्यांच्या १५ जागांवर साहजिकच केंद्रित केले आहे, तर अजित पवार बारामतीत अडकून पडले आहेत.

राज्यातील सत्तांतरात जे काही घडले त्यासाठी शिंदे-फडणवीसांवर टीकेची झोड उठवून उद्धव ठाकरे सहानुभूती मिळवू पाहत आहेत. ‘शिंदेंना सोबत घेणे समजू शकतो; पण ज्यांच्यावर तुम्हीच अनेक आरोप केले त्या अजित पवारांना सोबत घेतले हे पटत नाही,’ असे भाजपचे परंपरागत मतदारही बोलतात. शिवाय यावेळी मोठे जातीय ध्रुवीकरणही होताना दिसत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील राजकारणाचे संदर्भ लोकसभा निवडणुकीला चिकटू नयेत, उद्धव यांना सहानुभूती मिळू नये, जातीय समीकरणांपलीकडे निवडणूक घेऊन जावी आणि शेतकऱ्यांमधील नाराजीचा फॅक्टरही बाधक ठरू नये म्हणून महाराष्ट्रात अधिकाधिक येऊन मोदी ही निवडणूक राष्ट्रीय मुद्यांकडे घेऊन जात आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांवरील टीका भाजपला महागात पडली होती आणि पावसातील सभेनंतर पवारांना सहानुभूती मिळाली होती. आता पुन्हा शड्डू ठोकून असलेल्या पवारांवर थेट टीका टाळली पाहिजे, नाहीतर उगाच त्यांना पुन्हा सहानुभूती मिळायची असे मानणारा एक वर्ग भाजपमध्ये आहे; पण मोदींनी ‘भटकती आत्मा’सह विविध विशेषणांचा वापर करीत पवारांना थेट लक्ष्य करण्याची जोखीम स्वीकारली आहे. ती फायद्याची ठरू शकते किंवा फटकाही देऊ शकते! -  पण अशा गोष्टींची चिंता करतील ते मोदी कसले?

ये है मुंबई मेरी जान

मोदी-शाह यांना थेट नडणारे नेते म्हणून की काय उद्धव ठाकरे हे मुस्लिमांचे लाडके नेते झाले असल्याचे चित्र जागोजागी बघायला मिळत आहे. भेंडीबाजारात मशालीचे बिल्ले दिसत आहेत.

मुंबईत महाविकास आघाडीने सहाही मराठी उमेदवार दिले. महायुतीने चार मराठी चेहरे दिले. मराठी-मुस्लिम आणि दलित अशी मोट महाविकास आघाडी मुंबईत बांधताना दिसत आहे. मुंबईतली लढाई वेगळी असते. बीड, परभणीसारखे जातीचे संदर्भ इथे लागत नाहीत. ‘यह है मुंबई मेरी जान.’  या महानगरात बिगर मराठी मतदार ही भाजपची मोठी शक्ती आहे. त्याच वेळी मराठी मतदारांमध्ये भाजप अजिबात नाही असे म्हणता येणार नाही, आता राज ठाकरेंच्या इंजिनाचा उपयोग आपली गाडी विजयाच्या स्टेशनवर पोहोचविण्यासाठी भाजप नक्कीच करेल.

युती, आघाडी दोघांनाही सोपे नाही. मुंबईवरील ‘मातोश्री’च्या प्रभावाचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. त्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले तर विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत त्यांना नक्कीच फायदा होईल. महायुतीत १५ जागा घेऊन शिंदेंनी महाशक्तीबरोबर वाटाघाटीत आपण कमी पडत नाही, हे दाखवून दिले आहे. विधानसभा निवडणुकीत आपला पत्ता कटणार नाही, असा विश्वासही यानिमित्ताने त्यांनी सोबत आलेल्या आमदारांना दिला आहे. मुंबई, ठाणे, नाशिक या पट्ट्यात आपण ठाकरेंना भारी आहोत, हे सिद्ध करण्याच्या सर्वांत मोठ्या परीक्षेला आता शिंदे सामोरे जात आहेत. अजित पवार यांना त्यांच्या पक्षाच्या मर्यादा ठाऊक आहेत. चार जागा घेऊन आणि आपल्याच कोट्यातील एक जागा महादेव जानकरांना देऊन ते शांत बसले. त्यामुळे विधानसभेला आपले हेच हाल होतील का, अशी शंका त्यांच्या आमदारांच्या मनात येऊ शकते.

जाता जाता :

पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मतदान गेल्यावेळच्या तुलनेत फारच कमी झाले असा दावा करीत त्याआधारे विश्लेषणांची राळ माध्यमांनी उठवून दिली होती. मतदानाचाच टक्का कमी झाल्याचा फटका महायुतीला बसेल असा तर्क बहुतेकांनी दिला; मात्र दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीत मतदानाचा टक्का वाढल्याचे वास्तव पुढे आले. आता माध्यमे रिव्हर्स ॲनलिसिस करतील की, आपल्या आधीच्याच विश्लेषणांवर ठाम राहतील ते पाहायचे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४