बालबुद्धीची उठाठेव

By Admin | Updated: March 5, 2015 22:44 IST2015-03-05T22:44:30+5:302015-03-05T22:44:30+5:30

राजकारणातल्या सर्वोच्च जबाबदारीचे पद भूषविणाऱ्या व्यक्तींना मर्जीला येईल तेव्हाच निवृत्त होता येत नाही.

Lifting the hairline | बालबुद्धीची उठाठेव

बालबुद्धीची उठाठेव

राजकारणातल्या सर्वोच्च जबाबदारीचे पद भूषविणाऱ्या व्यक्तींना मर्जीला येईल तेव्हाच निवृत्त होता येत नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवून संघटनेत आलेली व राहिलेली माणसे जशी संख्येने मोठी असतात तसा त्यांच्या नेतृत्वाचा भरवसा वाटणाऱ्यांचा जनतेतील वर्गही मोठा असतो. दुसऱ्या वा तिसऱ्या पातळीवरील नेत्यांना त्यांच्या लहरीनुसार राजकारणातून हवे तेव्हा मुक्त होता येत असले किंवा त्यातून सुटी घेता येत असली तरी पक्ष वा राजकारण यांची मध्यवर्ती जबाबदारी असणाऱ्यांना ते स्वातंत्र्य नाही. देश, समाज, पक्ष, कार्यकर्ते आणि लोकमानस या साऱ्यांना विश्वासात घेऊनच त्यांना तसे करता येऊ शकते. त्याचमुळे सोनिया गांधींना राजकारणातून व पक्षकार्यातून निवृत्ती घेण्याचा सल्ला जे कुणी देत असतील ते नुसते बेजबाबदारच नाहीत तर बालबुद्धीचेही आहेत असे म्हणावे लागेल. काँग्रेस पक्षातील ज्या एका नेतृत्वाविषयीचा जनतेतील विश्वास अबाधित व ठाम राहिला आहे ते नेतृत्व सोनिया गांधींचे आहे. त्यांच्या नेतृत्वाला पर्याय ठरू शकेल असे दुसरे नेतृत्व त्या पक्षाला अजून पुढे करता आले नाही व तसे ते जनतेच्याही दृष्टीपथात नाही. राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत आणि ते पक्ष नेतृत्वाचे रीतसर वारसदारही आहेत. मात्र २०१४च्या निवडणुकीपासून आजतायागत त्यांना आपल्या नेतृत्वाला यशाची झळाळी चिकटविता आली नाही. त्यांचे नेतृत्व अजून ‘तयारीच्या’ अवस्थेतच राहिले आहे. निवडणुकीत झालेल्या प्रत्येक पराभवानंतर काही उत्साही काँग्रेस कार्यकर्ते प्रियंका गांधींचे नाव पुढे आणताना दिसले. मात्र प्रियंकाला आपल्या नेतृत्वाची चमक दाखविण्याची संधी अजून मिळाली नाही आणि तिच्या राजकीय घडणीविषयी हा देश अजूनही अनभिज्ञ राहिला आहे. मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे लोकसभेतील नेते आहेत. पण ती त्यांच्यावर टाकलेली बदली कामगिरी आहे हे उघड आहे. ज्योतिरादित्य शिंदे किंवा सचिन पायलट यांचे वय त्यांच्या नेतृत्वाआड येणारे आहे. शिवाय त्या दोघांना अजून राष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त व्हायची आहे. बाकीचे नेते आजतरी त्यांच्या राज्यापुरते मर्यादित राहिले आहेत किंवा त्यांच्या बोलघेवडेपणासाठीच लोकांना ठाऊक आहेत. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींच्या नेतृत्वाचा तेजस्वी व त्यागी इतिहास साऱ्यांच्या लक्षात येणारा आहे. राजीव गांधींच्या स्फोटक मृत्यूनंतर दीर्घकाळ राजकारणापासून दूर राहिलेल्या सोनिया गांधी त्यात उतरल्या त्याच मुळी पहिल्या क्रमांकाच्या नेत्या म्हणून. तेव्हा सत्तारूढ असलेल्या वाजपेयी सरकारशी त्यांनी जो जोरकस वाद घातला तो त्यांच्यातले लढाऊपण सिद्ध करणारा ठरला. पुढे २००४ची निवडणूक त्यांनी एकहाती प्रचार करून काँग्रेस पक्षासाठी जिंकली. यावेळी त्यांच्या पक्षाने व त्या पक्षाच्या नेतृत्वातील आघाडीने देशाचे पंतप्रधानपद त्यांना एकमताने देऊ केले तेव्हा ते नाकारण्याचे त्यागी साहस त्यांनी दाखविले व आपल्याऐवजी ते पद त्यांनी डॉ. मनमोहनसिंग यांना दिले. २००९ची निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वात काँग्रेसने लढविली व जिंकली. परिणामी मनमोहनसिंगांचे सरकार २०१४पर्यंत सत्तेवर राहिले. त्याच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात देशाने फार मोठी आर्थिक मजल गाठली व देशात धार्मिक सलोखाही नांदलेला जगाला दिसला. आज वय आणि प्रकृतीच्या कारणांमुळे सोनिया गांधींचा राजकारणातील वावर काहीसा कमी झालेला दिसत असला तरी संसदेतील त्यांची उपस्थिती त्यांच्या पक्षाला वा देशाला आश्वस्त करणारी आहे. त्यांच्या नेतृत्वाला तेवढ्याच वजनाचा पर्याय पक्षात उभा होत नाही तोवर त्यांना निवृत्तीचा सल्ला देण्याचा आगाऊपणा करणे ही नेतृत्वविरोधीच नाही तर पक्षविरोधी बाबही आहे. असे करणाऱ्यांचा संघटनेने वेळीच बंदोबस्त करणेही आवश्यक आहे. असे करणारी माणसे पक्षातच नव्हे तर गांधी कुटुंबातही बेदिली असल्याचा गैरसमज पसरू शकणारी आहेत व ती बाब सर्वथा अनिष्ट आहे. पक्षातले वृद्ध नेते निरुपयोगी वा निष्प्रभ झाले की त्यांना सक्तीनेही निवृत्त करता येते. तशी निवृत्ती नरेंद्र मोदींनी आता लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यावर लादलीच आहे. पण सोनिया गांधी म्हणजे अडवाणी नव्हे आणि मुरली मनोहर तर नव्हेच नव्हे. सबब माजी कायदा मंत्री अश्विनीकुमार किंवा त्यांच्यासारखी काही रिकामटेकडी माणसे सोनिया गांधींना तसा सल्ला देण्याचे धाडस करीत असतील तर त्यांचे तसे करणे हे धाडस नसून आत्महत्त्येचा प्रयत्न आहे हे त्यांनाही स्पष्टपणे सांगितलेच पाहिजे. सामूहिक नेतृत्वाची भाषा बोलणे गैर नाही मात्र पक्षात उभे होणारे सामूहिक नेतृत्व त्याच्या सर्वोच्च नेत्याचे बळ वाढविणारे असले पाहिजे याचीही खबरदारी पक्षातील जबाबदार म्हणविणाऱ्या पुढाऱ्यांनी घेतली पाहिजे. उठवळ लोक सगळ्याच पक्षात असतात आणि ते असा उतावीळपणाही करीतच असतात. त्यांना गप्प करणे अशावेळी आवश्यक ठरते. काँग्रेस पक्षात तरुण नेत्यांची कमतरता नाही. तसेच देशभरात त्याच्याविषयी सहानुभूती असणाऱ्यांचा वर्गही फार मोठा आहे. हा वर्ग एखाददुसऱ्या पराभवाने पूर्णपणे खचेल व संपेल असे समजण्याचे कारण नाही. या वर्गाला बळ देण्याची व संघटित राखण्याची क्षमता आजघडीला तरी एकट्या सोनिया गांधींतच आहे हे साऱ्यांनी समजून घेतले पाहिजे.

Web Title: Lifting the hairline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.