जीवन श्रद्धा
By Admin | Updated: June 28, 2016 05:51 IST2016-06-28T05:51:13+5:302016-06-28T05:51:13+5:30
तिन्ही ऋतु आणि समुद्राची भरती-ओहोटी निसर्गाच्या नियमानुसार होत असली तरी काही भोळ्या-भाबड्या लोकाना हे सारे देवाच्या कृपेने घडते असे वाटते.

जीवन श्रद्धा
तिन्ही ऋतु आणि समुद्राची भरती-ओहोटी निसर्गाच्या नियमानुसार होत असली तरी काही भोळ्या-भाबड्या लोकाना हे सारे देवाच्या कृपेने घडते असे वाटते. त्याच बरोबर लहान-मोठे भूकंप, महापूर त्सुनामी लाटा इत्यादी देवाचा कोप आणि वाढत चातलेले पाप व घटत असलेले पुण्य याचा परिणाम असल्याचेही ते समजतात. पण त्यांना विविध कारणांनी होणाऱ्या निसर्गाच्या ऱ्हासाला आपण कारणीभूत आहोत असे वाटण्याऐवजी त्यांना तो देवाचा कोप वाटतो. परंतु घडणाऱ्या घटनांची शास्त्रशुद्ध, विवेकशील चिकित्सा न करणे अंतिमत: हानिकारक असल्याने अध्यात्मातील शाश्वत मूल्यांना (दया, क्षमा, शांती, करुणा) नख न लावता वैज्ञानिक मनोभूमिका तयार होणे आवश्यक आहे.
अध्यात्मिक मन आणि वैज्ञानिक कृतीच्या समन्वयातून निर्माण होणाऱ्या जीवन श्रद्धेचे, कालसुसंगत अध्ययन आणि अध्यापन अपेक्षित आहे. अन्नात विशिष्ट प्रमाणात मीठ असले तरच ते अन्न खावेसे वाटते. ते मीठरहित असेल वा त्यात प्रमाणापेक्षा अधिक मीठ असेल तर ते खावेसे वाटणार नाही. ‘जीवन श्रद्धे’बाबत जे कृष्णमूर्ती मिठाचे अन्नाशी असलेल्या प्रमाणाचे उदाहरण देऊन जीवन श्रद्धेबाबत म्हणतात, ‘बुद्धी मनातील भाव-भावना-संवेदना, डोळस श्रद्धा आणि बुद्धी-प्रामाण्यच जीवन श्रद्धेला बळकटी प्राप्त करून देते.’ ‘जीवन-श्रद्धा’ वाढीस लावणारे शिक्षण असावे असाही ते आग्रह धरतात. आजच्या स्थितीत अनुभवसंपन्न, सशक्त, सद्-सद् विवेकी जीवन-श्रद्धाच सुख-समाधान-शांती स्थापित करू शकेल.
देव-देवतांवरील डोळस श्रद्धा, मानसिक ताकद, मनोबल वाढवते हे खरे आहे. पण भाबडा देव-भोळेपणा, त्यातले अनुकरण ‘मन’ कमकुवत करते हे वास्तव आहे. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम त्यांच्या विविध भाषणात आणि संवादात अध्यात्मिक मानसिकता आणि वैज्ञानिक दृष्टी आणि ह्या दोहोंच्या विवेकी समन्वयाच्या कृतीचा आग्रह धरीत. तशी प्रेरणा देत. जीवन श्रद्धा तरी काय? अध्यात्म आणि विज्ञानाचा विवेकी मेळ.
-प्रा. यशवंत पाटील