भारतीय अवकाश संशोधनाचे जनक: डॉ. विक्रम साराभाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 04:21 AM2019-08-10T04:21:38+5:302019-08-10T04:21:42+5:30

रशियाने त्यांचे स्फुटनिक यान अवकाशात सोडले होते, तेव्हा साराभाईंनी भारत सरकारला अवकाश संशोधनाचे महत्त्व पटवून दिले होते.

life journey of The father of Indian space research dr Vikram Sarabhai | भारतीय अवकाश संशोधनाचे जनक: डॉ. विक्रम साराभाई

भारतीय अवकाश संशोधनाचे जनक: डॉ. विक्रम साराभाई

googlenewsNext

- जोसेफ तुस्कानो, ज्येष्ठ विज्ञानलेखक

सध्या आपल्या भारत देशाचे चांद्रयान-२ चंद्राच्या दिशेने यशस्वीपणे झेपावत आहे. त्या आधी १५ फेब्रुवारी, २०१७ रोजी श्रीहरीकोटा तळावरून एकाच वेळी १०४ देशी-परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. या घटनांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रोने) आकाशाला गवसणीच घातली. इस्रोची स्थापना (१९६३) हा डॉ. विक्रम साराभाईच्या कारकिर्दीचा कळस होता. रशियाने त्यांचे स्फुटनिक यान अवकाशात सोडले होते, तेव्हा साराभाईंनी भारत सरकारला अवकाश संशोधनाचे महत्त्व पटवून दिले होते.



ते सांगत, विकसनशील देशाला अवकाश संशोधनासंबधी लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याची गरज काय, असा सूर जगभर सर्वत्र निघतो आहे, पण आमचा हेतू पारदर्शक आहे. आम्हाला चंद्रस्वारी किंवा अन्य ग्रहावर याने पाठवून, तसेच मानवसहित याने पाठवून विकसित देशांशी आर्थिक स्पर्धा मुळीच करायची नाही. एक गोष्ट आम्हाला स्पष्टपणे जाणवते, ती म्हणजे मनुष्य आणि समाज विकसित करायचा असेल, तर आमचा देश अवकाश संशोधनात पिछाडीवर राहून चालणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ उठवून, आम्हाला आमच्या देशाचे प्रश्न सोडवायचे आहेत.



विक्रम साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथील एका सधन कुटुंबात १२ ऑगस्ट, १९१९ रोजी अंबालाल आणि सरलाबेन या दाम्पत्याच्या पोटी झाला होता. तो पारतंत्र्याचा काळ होता व स्वातंत्र्याची चळवळ जोम घेऊ लागली होती. विक्रमच्या कुटुंबाचे स्वातंत्र्य चळवळीशी संबंध होते, त्यामुळे रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, जे. कृष्णमूर्ती, व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री, मोतीलाल व जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, मौलाना आझाद, सी.एफ.अँड्रूज; या ज्येष्ठ-श्रेष्ठ मंडळीची त्यांच्या घरी ऊठबस होत असे. या थोर व्यक्तीच्या सहवासाचा नि विचारांचा तरुण विक्रमच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव पडला. विक्रम यांचे प्रारंभीचे शिक्षण घरीच झाले. त्यांच्या मातोश्री सरलाबेन मोंटेसरी शिक्षण पद्धतीवर द रिट्रीट शाळा चालवत, तिथेच ते शिकले. त्यांचे पुढचे शिक्षण गुजरात कॉलेजमध्ये झाले. नंतर, ते इंग्लंडला गेले व केंब्रिज विद्यापीठातील सेंट जोन्स कॉलेजातून ते १९३९ साली रसायन आणि भौतिक या विषयातील ट्रायपास परीक्षा उतीर्ण झाले. तद्नंतर, १९४० साली,तेथील बी.ए. व त्याच्या दोन वर्षांनंतर एम. ए. पदव्या पदरात पाडून घेतल्या.



डॉ. होमी भाभा आणि डॉ. विक्रम सारभाईंनी आपल्या देशातले पहिले रॉकेट लौंचिंग केंद्र बांधण्यासाठी केरळातील तिरुअनंतपुरममधील थुंबागाव निवडले होते. त्या प्रदेशावरून विषुववृत जाते व अवकाशयाने सोडण्यास तीच जागा योग्य होती. शिवाय, तिरुअनंतपुरम विमानतळ पंधरा-वीस मिनिटांच्या अंतरावर होता. समुद्रकिनारा व रेल्वेलाइन्स यात पसरलेला थुंबाचा तो ६०० एकरचा पट्टा या कामी उपयोगी होता. थुंबा गावातील मेरी माग्दलेनच्या चर्चमध्ये अवकाश संशोधन करणारी प्रयोगशाळा थाटायची होती, पण त्या थुंबा गावात गरीब ख्रिस्ती कोळी लोकांची वस्ती होती. त्रिवेंद्रमचे बिशाप राइट रेव्हरंड डॉ.पीटर बर्नड परेरा त्यांचे मेंढपाळ (आध्यात्मिक नेते) होते. त्रिवेंद्रमचे कलेक्टर के. माधवन बिशाप परेरांना भेटले आणि त्यांच्याकडे थुंबागावाची मागणी केली. बिशाप परेरा आध्यात्मिक नेते होते, तरीही त्यांची वृत्ती विज्ञानवादी होती. त्यांनी आपल्या भाविकांना विश्वासात घेऊन त्या प्रकल्पाला मान्यता दिली व त्या शास्त्रज्ञाचा मार्ग सुकर झाला झाला होता. तेथूनच २१ नोव्हेंबर, १९६३ रोजी सोडियम बाष्प पेलोड तंत्र वापरून भारताचे पहिले रॉकेट यशस्वीरीत्या आकाशात रवाना झाले होते.



डॉ.विक्रम साराभाई यांनी देश-विकासासाठी विविध क्षेत्रांत केलेली कामगिरी अचंबित करणारी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील नाना संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ऑपरेशन रिसर्च ग्रुप, तिरुअनंतपूरचे विक्रम साराभाई स्पेस सेंटर, अहमदाबादमधील त्यांच्या स्वत:च्या सहा संस्थांचे विलीनीकरण करून उभारलेले स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर, कल्पकम येथील फास्टर ब्रीडर टेस्ट रिएक्टर, कोलकोतातील व्हेरियबल एनर्जी सायक्लोट्रोन प्रोजेक्ट, हैद्राबादमधील इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, बिहारमधील जादूगुडा येथे उभारलेली युरेनियम कार्पोरेशन ऑफ इंडिया इ. संस्थाच्या निर्मितीत ते आघाडीवर होते. अशाप्रकारे त्यांनी सुरू केलेल्या भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाला जागतिक कीर्ती लाभली. ३० डिसेंबर, १९७१ रोजी तिरुअनंतपुरम इथे ही महान विभूती झोपेत असताना वयाच्या अवघ्या ५२व्या वर्षी अनंतात विलीन झाली.

Web Title: life journey of The father of Indian space research dr Vikram Sarabhai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :isroइस्रो