चला गड्यांनो सोलापूर विकू या
By Admin | Updated: May 27, 2015 23:32 IST2015-05-27T23:32:51+5:302015-05-27T23:32:51+5:30
भाषा आणि शब्दप्रयोग यांचा मेळ बसला नाही की गोंधळ उडतो. राजकारणात अनेकांचा हा गोंधळच त्यांचे वैशिष्ट्य ठरल्याची राज्यात अनेक उदाहरणे आहेत.

चला गड्यांनो सोलापूर विकू या
भाषा आणि शब्दप्रयोग यांचा मेळ बसला नाही की गोंधळ उडतो. राजकारणात अनेकांचा हा गोंधळच त्यांचे वैशिष्ट्य ठरल्याची राज्यात अनेक उदाहरणे आहेत. मग कुणी ‘चला गड्यांनो, सोलापूर विकू या’ असा नारा देऊ लागले तर कसे...
भाषा आणि शब्दांची जादू, तिचा वापर करणाऱ्यांच्या कौशल्यनिपुणतेवर अवलंबून असते. मनाला थेट भिडणारे टोकदार शब्द, शब्दांची पखरण, शब्दच्छल आणि द्विअर्थी शब्द सामर्थ्याचं आचार्य प्र. के. अत्र्यांपासून बाळासाहेब ठाकरेंसारख्या दिग्गजांशी असलेलं जवळचं नातं नेहमीच चर्चिलं गेलं. त्याच कारणाने महाराष्ट्राच्या राजकारणात मैद्याचं पोतं, टी. बाळूसारखे शब्दप्रयोग अनेक वर्षे तुमच्या-आमच्या चांगल्या परिचयाचे बनून अंगवळणी पडले होते. वेगळी भाषाशैली आणि अफलातून शब्दप्रयोगामुळे राज्यातील सर्वच विभागात काही नेते प्रसिद्धी पावले. मराठवाड्याचेच उदाहरण घ्या. एका जमान्यात बीड जिल्ह्यातील बाबुराव आडसकर यांचा ‘हाबाडा’ हा शब्द खूप गाजला. तो आडसकरांची ओळखही बनून गेला !
आता सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातही भाषा आणि आगळ्या शब्दफेकीमुळे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार सुभाष देशमुख गाजत आहेत. ‘मी गरीब माणूस, भोळा माणूस, छोटा माणूस’ अशा शब्दांची गुंफण केल्याशिवाय देशमुखांचे भाषणच होत नाही, हे आता सोलापूरकरांच्याही सवयीचे झाले आहे. परवा मात्र त्यांनी कडीच केली. त्यांनी चक्क, ‘चला गड्यांनो... आपण सोलापूर विकू या’ असे आवाहनच पत्रकारांना केले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर स्वत:ला विकायला शिका, असा प्रेमळ सल्लाही त्यांनी उपस्थित पत्रकारांना दिला. स्वत:च्या कर्तबगारीने शेकडो कोटी रुपयांची उलाढाल असणारा ‘लोकमंगल’ उद्योग समूह उभा करणाऱ्या देशमुखांच्या या भाषा आणि शब्दांमुळे सगळेच अचंबित झाले. पण देशमुख सतत ‘विका, विकणे’ म्हणत असले तरी त्यांच्या भाषेतील ‘विकणे या शब्दाचा अर्थ ‘गुणवत्तेचे मार्केटींग करणे’ असा पत्रकारांनी खिलाडूवृत्तीने समजून घेतला. ‘सोलापूर विकू’ याचा अर्थ ‘सोलापूरचे मार्केटींग करू...’
पंढरीचा विठूराया, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, सोलापूरचे श्री सिद्धरामेश्वर, बार्शीचे श्री भगवंत, करमाळ्याची कमलादेवी, नीरा नरसिंगपूरचे श्री दत्त, मोहोळ व वडवळचे श्री नागनाथ, अरणचे सावता माळी, जिल्ह्याच्या शेजारीच महाराष्ट्राची कुलदेवता तुळजापूरची आई तुळजाभवानी आणि गाणगापूरचे श्री दत्त अशा सोलापूर जिल्ह्याच्या समृद्ध दैवत परंपरेची किती म्हणून उदाहरणे द्यावीत? त्यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असल्याने नीरा नरसिंगपूरचे महत्त्व आणखीनच वाढलंय!
राज्यातील काही देवस्थानं बाराशे कोटी रुपयांच्या ठेवी जतन करू शकतात; मग सोलापूर जिल्ह्याला हे का शक्य नाही, हे शल्य व्यक्त करण्यासाठी आमदार देशमुखांची ‘अशी’ भाषा ! भाषा चुकीची असली तरी भावना मात्र निर्मळच आहे, असे आपण म्हणू या. त्यांच्या निर्मळ भावनेला पुष्टी देणाऱ्या घटना-घडामोडीही जिल्ह्यात घडत आहेत.
‘जलयुक्त शिवार’ या महत्त्वाकांक्षी अभियानात सोलापूर जिल्हा सर्वोत्कृष्ट काम करीत असल्याने परवा मुख्यमंत्री फडणवीस त्या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात येऊन गेले. पाहणी करून त्यांनी तोंड भरून कौतुकही केले. साखर उत्पादनात राज्यात नव्हे तर देशात सोलापूर जिल्हा नंबर १, फलोत्पादनात नंबर १, वीज निर्मितीत नंबर १, जिल्ह्याच्या पतपुरवठा आराखड्यात देशात नंबर १, ठिबक सिंचनात नंबर २ असे अनेक विक्रम सुरू असताना जिल्ह्याबद्दलची नकारात्मक चर्चा होऊ नये, ही देखील भावना देशमुखांच्या भाषेत निश्चितपणे दडलेली आहे. टॉवेल निर्मिती असो वा सोलापूरची खास चादर निर्मिती असो, सोलापूर शहरानेही आपल्या उत्पादनांचा दबदबा कायम राखलेला आहे. तरीही सोलापूरला नवे उद्योग येत नाहीत. बंद पडलेल्या सूत गिरण्या सुरू होण्याची आशाही मावळतीला टेकली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या बलस्थानांचे मार्केटींग होणे महत्त्वाचे आहे. हेच आमदार देशमुख यांच्या ‘विकणे आहे’ या शब्दांचे सार!
- राजा माने