नेतृत्व आणि नटवेपण...
By Admin | Updated: June 5, 2014 08:57 IST2014-06-05T08:57:19+5:302014-06-05T08:57:19+5:30
एखाद्याच्या अंत्ययात्रेला किती लोक असतात, त्यावरून त्याची लोकमान्यता लक्षात येते, मुंडे आणि देशमुख या दोघांच्याही अंत्ययात्रांनी महाराष्ट्राचे खरे लोकनेते कोण, हे सार्यांच्या लक्षात आणून दिले.
नेतृत्व आणि नटवेपण...
गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन त्यांना श्रद्धांजली वाहायला आलेला प्रचंड जनसमुदाय पाहून स्व. विलासराव देशमुखांच्या अंत्ययात्रेचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. लोकनेतृत्व म्हणजे नेमके काय, याचा अर्थही त्यातून उघड झाला. एखाद्याच्या अंत्ययात्रेला किती लोक असतात, त्यावरून त्याची लोकमान्यता लक्षात येते, असे एक दुष्ट वचन आपल्यात प्रचलित आहे. त्यातला दुष्टावा वजा केला, तरी मुंडे आणि देशमुख या दोघांच्याही अंत्ययात्रांनी महाराष्ट्राचे (केवळ मराठवाड्याचे नव्हे) खरे लोकनेते कोण, हे सार्यांच्या लक्षात आणून दिले. मातीतून जन्माला येणारे नेते, समाजात रमणारे पुढारी आणि जनसामान्यांच्या आवडीनिवडीत सहभागी होणारे स्नेही अशीच या दोघांची प्रतिमा होती व ती दुर्दैवाने पुन्हा एकवार अशी अधोरेखित झाली आहे. गोपीनाथ मुंडे यांना सार्या देशाने श्रद्धांजली वाहिली. परळीसारख्या लहानशा गावचा माणूस देशव्यापी कसा होतो, हा राजकारणाचा अभ्यास करणार्या सार्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक नेताच गेला नाही, तर एक मित्र, स्नेही, आप्त आणि शेजारचा वाटावा, असा माणूस आपल्या समाजाने गमावला आहे. समाजाचे हे दु:ख राजकारणात मात्र फारसे न उमटणारे आहे. ते क्षेत्र नको तसे निर्ढावलेले व दुष्टाव्याने व्यापलेले आहे. राहुल गांधी राजकारणाला विष म्हणतात. त्यातला अतिशयोक्त भाग वजा केला, तरी त्यात तथ्य मात्र बरेच आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या चितेची राख शांत होण्याआधीच त्यांच्या उत्तराधिकार्याची चर्चा राजकारणात सुरू होणे हा आपल्या राजकारणाचा उथळपणा व त्याचे बालिश स्वरूप सांगणारा भाग आहे. गोपीनाथ मुंडे हे केंद्रात ग्रामीण विकास या महत्त्वाच्या खात्याचे मंत्री होते. त्या पदाची शपथ घेऊन एक आठवडाही उलटायचा होता. मुंडे यांची महाराष्ट्रविषयक महत्त्वाकांक्षा सार्यांच्या लक्षात होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद आपण भूषवावे व या मराठी मुलुखाची सेवा करावी, हे त्यांचे दीर्घकाळचे स्वप्न होते. नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या उपस्थितीतच ‘राणेसाहेब देतील तर त्यांचे पद घ्यायला मी आत्ताच तयार आहे,’ असे ते एकदा नागपूर अधिवेशनाच्या काळात जाहीरपणेच म्हणाले होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर दावा लावून बसलेली दोन माणसे सध्याच रिंगणात उभी आहेत आणि आपल्या कमीअधिक ताकदीनिशी त्यात ती तलवारी फिरवीत आहेत. मी मुख्यमंत्री व्हावे, अशी माझ्या लाडक्या शिवसैनिकांची फार इच्छा आहे, ही उद्धव ठाकरे यांची वाणी आहे. त्यांना स्वत:ला मुख्यमंत्रिपदात फारसा रस नसला, तरी सैनिकांच्या इच्छेपुढे त्यांचा असलेला नाईलाज त्यांनी असा उघड केला आहे. तिकडे राज ठाकरे यांनी माझ्या पक्षाला निवडून द्या आणि मला सत्ता द्या, असे मुंबईकरांना सांगितले आहे. प्रत्यक्ष मुंडे यांच्या भारतीय जनता पक्षातही अनेकांनी आता या आखाड्यात उतरण्यासाठी लंगोट कसायला सुरुवात केली आहे. दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र ही घोषणा मुंडे यांच्या हयातीतच काही उत्साही स्वयंसेवकांनी करून टाकली. मुंडे राहिले नाहीत आणि नितीन गडकरी राष्ट्रीय राजकारणातून मुंबईच्या राजकारणात येण्याची शक्यता उरली नाही, ही स्थिती अनेकांच्या महत्त्वाकांक्षा पालवणारीही आहे. दु:ख याचे की या पालवणार्या महत्त्वाकांक्षा घाईत आहेत आणि आपण कधी उघड व्हायचे, याचे भानही त्यांच्यातल्या काहींनी गमावले आहे. महाराष्ट्रात विधिमंडळाच्या निवडणुकीला अजून काही महिन्यांचा अवकाश आहे. त्या निवडणुकीत राज्याचे नवे सरकार व नवा मुख्यमंत्री निवडला जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची अनिवार इच्छा असलेला एक लोकनेता काळाच्या पडद्याआड गेला एवढीच एक बाब गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूने घडली आहे. मात्र, तेवढ्यावर आपल्या पुढे उरलेल्या अंतराची गणिते मांडली जाणे व तशा मोर्चेबंदीला सुरुवात झालेली पाहावी लागणे हा खंत करायला लावणारा विषय आहे. गोपीनाथ मुंडे यांना दीर्घायुष्य लाभून मुख्यमंत्री या नात्याने महाराष्ट्राची सेवा करण्याचे भाग्य त्यांच्या वाट्याला आले असते, तर ते अनेकांना आवडले असते. दुर्दैवाने तसे झाले नाही. या पार्श्वभूमीवर आताच आपल्या चेहर्यांची रंगरंगोटी करण्याच्या उद्योगाला लागलेली माणसे त्यांचे नेतृत्वगुण दाखवीत नसून नटवेपण दाखवीत आहेत, हे लक्षात घ्यावे.